माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७


आज मी थोडा...!!!


झुगारून तुमच्या कट्टरतेच्या भिंती,
आज मी थोडा माणूसच होतो...
नाही तुमची कोणतीच भीती,
आज मी थोडा लिहूनच घेतो...

पेलून माझ्या न केलेल्या गुन्ह्यांचा भार,
आज मी थोडं विचारांना मांडतो...
फिकीर कधीच संपलीए हो,
आज मी थोडं तुमच्या विचारांशी लढतो...

भोगून सर्व झालेय आता,
आज मी थोडं तुमच्या द्वेषाला रिचवतो...
द्यूत आणि शकूनी तुमचाच असला तरी,
आज मी थोडा विचारच मांडतो...

कट करून गोळीच घालताल ना,
आज मी थोडं उरलेलं आयुष्य तुम्हाला देतो...
पण लक्षात ठेवा माणूस संपेल पण विचार तसाच राहिल,
आज मी पुन्हा तेच थोडं सांगतो...


गणेशदादा शितोळे
(२७ ऑक्टोबर २०१७)


बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

ती...!!!

कधीही स्पर्श न होता,
हळूवारपणे जाणवणारी...
कधीही बंध न ठेवता,
अलगद ओढ लावणारी...

अबोल असतानाही,
नजरेने बोलणारी...
भाषा तिची भलतीच असूनही,
डोळे मिटूनही उमलणारी....

शब्दाविना ती काहीच नसूनही,
जगण्याचं बळं देणारी...
सगळं काही ठप्प झाले की,
धडपडण्याची जिद्द देणारी...

कितीही सांगितलं तिच्याबद्दल तरीही,
आकाशासारखीच न मावणारी...
आता इथे ती संपली वाटलं तरी,
क्षितिजासारखीच अथांग भासणारी...
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)

(टीप :- ह्यातील ती म्हणजे केवळ एक कवी लिहीतो ती कविता आहे. उगाच ग्रह करून घेऊ नयेत.)



मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

उत्तर....!!!

मनातल्या मनात आढेवेढे घेतले तरी,
कधीकधी अपेक्षित उत्तर मिळत नाही...
दरवेळी नवीन प्रश्नाला जन्माला घालत जाते,
उत्तर मात्र सापडत नाही....

मनाच्या गाभाऱ्यात उगीच कुढंत बसतो...
पण उत्तर मात्र सापडत नाही...
कितीही वीट आला तरीही,
मन शोध घेणे थांबवत नाही...

वाटतं मग मनाचीही अडगळ झाली पार,
कितीही उचकापाचक केली तरी उत्तर मात्र सापडत नाही....
जे असतं तेच समोर असूनही,
फक्त आपल्याला उत्तर दिसत नाही....

शेवटी मनातलं काहूर शांत झालं की,
स्थिर नजरेतून उत्तर दिसल्याशिवाय रहात नाही...
एवढ्या सगळ्या आटापिटा करून उत्तर सापडलं की,
स्वतःवर हसावं की रडाव कळत नाही....


गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)






तिची चाहूल
...!!!

कधी निवांत बसलो की,
तिच्या वाटेकडे बघत असतो...
डोळे पसरून अन भान विसरून,
जणू तिच्या येण्याची वाटच बघत असतो...

तिच्या आठवणी उचंबळून आल्या की,
मनाचा मोर थुईथुई नाचतो...
वीजांसारखा कडकडाट नसला तरीही,
जणू तो काळ तिची चाहूलच देतो...

सांजवेळी प्राजक्ताचा सडा पडावा तसा,
तिच्या येण्याने शब्दांचा सडा पडतो...
अन बैचेन झालेले मन आणि मी,
मनाच्या भोवती नाचू लागतो...

तिच्या आल्याची जाणीव झाली की,
मी मनमुरादपणे एकटाच हसतो...
तिच्या येण्याची अन माझ्या शब्दांची,
नवीन रेशीमगाठ बांधत जातो..


गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)

(टीप :- ह्यातील ती म्हणजे केवळ एक कवी लिहीतो ती कविता आहे. उगाच ग्रह करून घेऊ नयेत.)




मी लिहित गेलो...!!!

मला वाटलं तस तसं,
मी माझं लिहित गेलो..
कुणाला आवडलं अन कुणाला नावडलं,
मी मात्र फक्त मांडत गेलो...


कधी कुणाला बाजूचे वाटले
अन कधी कुणाला विरोधी म्हणून खटकले...
वाद अन विवाद गाजले  तरीही
मी मात्र माझी भूमिका घेत गेलो...


अमुक लिहातमुकच लिहिले नाही,
नाना प्रकारच्या वादात अडकलो...
पादत्राणांच्या प्रसादाच्या धमक्यांना भीक न घालत,
मी शब्दांसोबत लिहीतंच गेलो....


भीतीपर्वा अन काळजी जिवाची,
किती दिवस करायची...
मुर्दाडांच्या मेंदूतील गाभाडलेल्या विचांरांना साक्ष ठेऊन,
मी एका गोळीची जागा राखून ठेवत लिहित गेलो...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)





डागधब्बे…!!!

आजवर अनेक डागधब्बे चिकटले,
जळमटांसारखे इथून तिथून मिळत गेले...
न जाणताच माझ्यातल्या मला..
अमुकतमुक ठरवत गेले...


कधी धर्मद्रोही तर देशद्रोही,
अजब गजब शिक्के मिळाले....
जातधर्मपंथपलिकडचं माणूसपण,
कधीच कुणाला नाही कळाले....


ज्याला मी जसा भासलो,
त्याने तसे प्रतिमेत गुंतून टाकले...
ज्याला माझे विचार जसे वाटले,
प्रत्येकाने त्या साच्यात बांधले...


फरक एवढाच केला प्रत्येकाने,
कुणी पुसट तर कुणी पक्के मारले...
काहींचे डागधब्बे बराच काळ टिकले,
अन काही मीही मुद्दामच टिकवले...


गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)




डाग...!!!

काही डाग मुळात,
असतातच असे,
कितीही मिटवले तरीही,
दिसणाराला दिसताच...


किती पुसणार अन किती मिटवणार,
मनावरचे डाग मनाला पक्के दिसतात...
लपवायचे म्हणून जगाला दिसणार नाहीत,
स्वतःच्या मनापासून लपवायला थोडीच येतात...


काही डागांचं हे असंच असतं...
ना पुसतात ना मिटतात...
त्यांचं असणंच एवढं सवयीचं होऊन जातं की,
रोजच्या जगण्याचा भाग बनत जातात...


आपण फक्त आपल्याला सुधारत रहायचं,
बाकी काहीच नसतं आपल्या हातात....
उजाळलेल्या प्रतिमेत दिपून जाईल तोही डाग,
कारण कवडशाने प्रकाशवाटा निर्माण होतात...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)





गुंता...!!!

कुणी कंगवा किंवा फणी देता का,
थोडंस नात्यांना विंचरायचंय...
कितीतरी गुंते झालेत,
थोडंस सोडवायचंय...


एक पदर सुटला की,
दुसरं गुंतत जातंय...
एक नातं सुटलं की,
दुसरं नवं नातं अडकत जातंय...


नात्यांना किती जपलं तरीही,
अधूनमधून नातं एकमेकांत गुंततंय...
एक टोक सोडवलं असं वाटत गेलं की,
दुसरं टोक हरवतंय...


सगळीच नाती हवी हवीत,
पण एक सोडवलं की दुसरं तुटतंय...
कितीही हळुवार गुंता काढायचं ठरवलं तरी,
सुटण्याऐवजी अधिकंच गुंतत जातंय...


एकदा कंगवा अन फणीनं विंचारलं की,
सगळं सुरळीत होईल वाटतंय...
थोडा वेळ कसंनुसं होईल,
पण गुंता हमखास सुटेल वाटतंय...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)




मोठेपणा…!!!

अनेकदा वाटतं मोठेपणाचा आव आणून,
इतरांना नेहमीच का सांगतो आपण....
खरंच इतरांना जो पण सांगतो तो,
कधी तरी तोही पण मोडतो ना आपण...


कुणी ह्याची जाणीव करुन दिली की,
मनातल्या मनात पोखरून जातो आपण....
खरंतर मनातून खचून गेल्यासारखंच होतं...
पण मोठेपणा दाखवण्याकरता ताठ मानेने उभे रहातो आपण...


दुःखाच्या असंख्य वेदना मनाला ढोसत असतात,
पण उगाचंच मोठेपणाचा शहाणपणा दाखवत असतो आपण...
कोंडमारा झाला कितीही मनातल्या मनात,
मात्र जगाकरता खोटं हसत असतो आपण...


तत्वनिष्ठा आणि आपलं मत,
एवढंच टिकवण्याकरता ठाम असतो आपण...
पण मोठेपणा टिकवण्याच्या नादात,
स्वतःलाच विसरून जात असतो आपण...


गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)




दोन घोट रिचवले म्हणून…!!!

दोन घोट रिचवले म्हणून,
दुःख कमी होतं असं असतं का..?
खरंच का दुःख विसरणं,
इतकं सहज आणि सोपं असतं का..?


बैठकीत बसून ग्लास मोकळे झाले की,
खरंच दुःख हलकं होत असतं का..?
स्वतःच स्वतःच्या जीवाला त्रास केली म्हणजे
दुःखाचं वादळ एका प्याल्यात शमतं का..?


सुखदुःखात जुनं अन नवं,
काही काहीच नसतं...
फक्त जखमा जून्या असल्यातरी नव्याने विव्हळतात
पण म्हणून घोटभर पिल्याने जखमांचं विव्हळणं थांबतं का..?


एकमात्र नक्की खरं आहे,
दुःख एकमेकांना सांगितले की लढण्याचं बळं येतं...
पण म्हणून दुःख एकमेकांना सांगायलाही,
ग्लासाच्या बैठकीत रंगावंच लागतं का..?


दुःख विसरायला खरंच,
दोन घोटांना रिचवायला लागतंच का..?
मनाचं ओझं वाटायला,
क्षणभर का होईना बैठकीला हजर रहावंच लागतं का..?



गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)






सरकारी दुर्दशा


खड्ड्याची धडधड वाढली की, 
गावाच्या रस्त्याची चाहूल लागते...
मातीचा गंध येण्याअगोदरंच तुंबलेल्या गटारीचा दुर्गंध,
गावाच्या वेशीचा इशारा देऊन जाते...


पारावरची उनाड पोरं पाहिली की,
हाताला काम नसल्याचे सांगून जाते...
पिचकाऱ्या अन धुराचे लोट दिसले की,
स्वच्छता अभियानाची तत्परता जाणवते...


झेंडे, फ्लेक्स अन जाहिराती पाहिल्या की,
ढोंगीपणाचं अन थापांच पीक जोमात आलेले दिसते...
पण सडलेली पिकं अन ओसाड रानं दिसली की,
शेतकऱ्याचं मरण फासासहीत उभे रहाते....


माझा देश बदलतोय,
पुढारी दिसला की आरोळी अन हाक ऐकायला येते...
अच्छे दिन म्हणून भारताचा इंडिया होतोय,
पण माझ्या भारताची कृषिप्रधान ओळख र्‍हास पावते...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)


सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७


मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...



रस्ता मोकळाठाक आहे,
अगदी चिटपाखरूंही दिसत नाही. 
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...


वळणं येतायेत अन जातायेतही, 
अगदी आडोशाला काही दिसत नाही.
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...


संकटाचा सूर्य तेवत आहे इथंही,
सावलीला कुठं थांबावं असं ठिकाण नाही. 
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...

समोर क्षितिज वाकुल्या दाखवतंयही,
पण कवेत येईल इतक्या सहज वाटत नाही.
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...

शेवटी एकच आशा आहे लागेल असंही एक गाव,
जिथे भेटतील मला असंख्य हातांची साथ...
म्हणूनच असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...



गणेशदादा शितोळे
(१६ ऑक्टोबर २०१७)



रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७


पाठीमागे वळून पहाताना....!!!




                               देव, धर्म, जात, पंथ अशा कोणत्याही गोष्टींपासून चार हात दूर राहणेच पसंत करतो. त्यामुळे आपसुकच सण संस्कृतीच्या नावाखालचा ढोंगीपणा माझ्या मानगुटीवर सहसा बसत नाही. कुणी नास्तिक, धर्मद्रोही अमुक तमुक अशी लेबलं लावत गेलं पण त्याचा अगोदरही कधी फरक पडला नाही अन नंतरही पडणार नाही याची खात्री आहे. अनेकदा या विचारांना घरूनही विरोध होतो. पण ते बदलतील याची शंकाही मला कधी वाटत नाही.
प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे सहाजिकच घरच्या आणि आप्त स्वकियांच्या मनावर जून्या प्रथा, परंपरा ह्यांच गारूड आहे. त्याला बदलण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिलाए. लहानपणी पासून अगदी काल परवाचा महाविद्यालयीन काळ या दरम्यान या मंडळींकडून अनेकदा माझे मित्र कोण ह्याची चौकशी व्हायची. पण मुळ मुद्दा ते नंतर सांगायचे, अडनावावरून जात, धर्म कळला नाही तर विचारून घेतील. पण त्या त्या प्रत्येकवेळी त्यांना समाजावत गेलो. आणि तोच माझा काय़म प्रयत्न राहिलाय.

                               मी कायम म्हणत असतो आयुष्यात सगळ्या गोष्टी केल्या ज्या करून पहायच्या होत्या. गणेशोत्सवात पुढाकार घेऊन नाचणारा जसा मीच होतो तसा एक तांदुळ डोक्यावर लावून नशीबाची गुलामी करणाराही मीच होतो. पदविका अभ्यासक्रमादरम्यानची तीन वर्षे न चुकता विशाल गणपतीची भक्ती केली अन एका रात्री प्रचंड वेदना झाल्या तरी पन्नास किमी चालून मोहटा देवीला प्राथनाही केली. पण आयुष्यात एक अशी वेळ येती की ह्या सगळ्याचा वीट येतो आणि चिकित्सक बुद्धीतून अनेक थोतांड गोष्टी सुटल्या त्यापैकी ही पण एकचं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यापलिकडे जाऊन वैज्ञानिकेतेची कास धरली गेली अन कर्मकांड सुटत गेली.

                                        एका काळ असाही होता की हिंदु असल्याचा आणि त्यातही देशमुखी पण मिरवण्याचा माज होता. पण आय़ुष्यात असंख्य माणसं भेटली. सगळ्या जातीची अन धर्माची, अगदी माझ्यासारखीच. काहीच फरक नव्हता आमच्यात. पण जात,धर्म, पंथ ह्या जळमटांनी आम्हाला इतके दिवस वेगळे ठेवले होते. रक्ताने कधी रंग न बदलता जाती धर्म असा भेदभाव केला नव्हता. तर तो आपण करणे कसे चूक आहे हे लक्षात आल्याने ही धार्मिक गुलामगीरीही सुटली. माणूस म्हणून जन्माला आलो आहे. आणि माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न आहे. जगाला माणूस ह्या चष्म्यातून पाहिचे एवढंच माहिती आहे. 



                                     मुळात मला जमेल जितकं साधेपणा जपता येईल तितका साधेपणा जपण्याकडे कल असतो. त्यामुळेच जगण्यातला साधेपणा टिकवण्याकरता मी कायमच प्रयत्नशील राहिलोय. अमुक ब्रॅण्डच्या गोष्टी वापरल्याने कोणी लय भारी असल्या फालतू न्युनगंडाच्या गोष्टी कधा मनात आल्याच नाहीत. फार फार तर काय अशा ब्रॅण्डच्या गोष्टी वापरणारांच्या बैठकीत बसायला यायचं नाही एवढांच तो फरक. बहुतेक त्यामुळेच अनेक असे #ब्रॅण्डेड मित्र सुटले. पण त्याचं दु:खही नाही. माझ्यासारखी अनेक माणसं भेटलीच की. पार्ट्या, धांगडधिंगा कधी केला नाही असं मी म्हणणार नाही. ज्या वयात समज नव्हती तोपर्यंत सगळं काही केलं. पण आता समजदार वयात आपल्याला आपली प्राधान्यता जपता आली पाहिजे. अनेकदा त्यामुळेच मित्रांना टाळायलाही लागते. अनेकदा मित्र चेष्टेने म्हणतातही, "काय दादा, दरवेळी तुम्ही अशीच टांग मारता". पण त्याला नाईलाज असतो. एकीकडे नात्यांचे बंध असतात अन दुसरीकडे तत्वांची साथ दोन्ही जपायलाच लागतं. 

                                  अनेकदा आयुष्याचं धेय्य काय आणि तुमचा प्रवास कोणत्या दिशेने चाललाय असा प्रश्न विचारण्यात आलाय. आणि मी दरवेळी मी तेच सांगत आलो. आजवर आयुष्यात अनेक वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केला. कधी शासकीय अधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत चाललो. कधी आपलं क्रिकेटच्या पंचगिरीच्या कौशल्याला वाढवण्याकरता त्या दिशेनेही दोन पावलं टाकली. गेल्या दोन वर्षापासून एस ए पी ह्या नव्या क्षेत्रातही  पाऊल टाकलं. पण ह्यापैकी धेय्य असं काहीट नाही. ही तीनही क्षेत्र माझी कितपत असतील ह्यावर शंका आहे. एस ए पी हे केवळ काही काळापुरती अन घरच्यांच्या समाधानाकरता चाललेली वाट आहे. ती अर्ध्यावर थांबणार आहे हे निश्चित आहे. मुळात मी कायम बाबांच्या प्रकाशवाटेवर चालण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले आहेत. ह्या वाटेचा प्रवास खडतर आहे याची जाणीवही आहे. त्यामुळेच अजून काही काळ प्रतिक्षा करतोय. पूर्णपणाने झोकून देेण्याकरता. तोपर्यंत बाकी वाटा चाचपडून पहायच्यात. शेवटी त्यातूनही मुळ वाटेवर जाण्याकरताच प्रयत्न सुरू आहेत. शासकीय सेवेतून बाबांच्या प्रकाशवाटेचा मार्ग साधता येईल असं वाटतंय. पुढील वर्षी नवी सुरवात करण्याच्या दृष्टीनेच आता पावले टाकली जात आहेत.

                                        माझ्या बाबतीत चर्चेचा सगळ्या मित्रपरिवाराचा आवडता विषय म्हणजे माझा लेखन प्रवास. लेखक किंवा कवी होणे हे माझे कधीही धेय्य नव्हते नाही आणि नसणार. तो छंद होता आहे आणि छंदच रहाणार. आयुष्यात विरंगुळा म्हणून छंद जपायचे असतात तसाच तो मी जपतोय. त्यामुळेच ह्या वर्षी हे करू ते करू असे संकल्प मी करत नाही. वेळ मिळेल तसे आपले विचार मांडण्याचा हा प्रयत्न असतो. अनेकदा मला फेसबुकचं वेसन लागलंय असंही मित्र म्हणतात. कदाचित ते असेलही. कारण फेबुने मला व्यक्त होण्याचं माध्यम दिलंय. तेही क्षणात. फेबुमुळेच मी प्रतिक्रियावादी आलो हा मित्रांचा आरोपही तितकाच खरा आहे. जे पटेत तेही अन जे पटत नाही त्यावरही आपलं मत द्यायला फेसबुकनेच शिकवलं. आयुष्याकडे चिकित्सक पद्धतीने बघत दोन्ही बाजू बघण्याचा गुण फेबुनेच दिलाय, बाकी लेखन आणि त्यातही शब्दांच्या मोरपिसांचा प्रवास काल जसा चालू होता तसाच तो उद्याही चालूच रहाणार आहे.  धेय्य आणि छंद ह्यांची सांगड घालत आयुष्य जगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.




गणेश शितोळे
(०८ ऑक्टोबर २०१७)