माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७


वळणावरचा पाऊस....!!!


खरतर तो अनेकदा यायचा,
मीच दरवेळी त्याला टाळत आलो...
अन काल अचानक तो,
पाठशिवणीच्या खेळात भेटलाच...

कालही वाटलं आजही याला टाळावे
अन क्षणभर एका झाडाखाली थांबलो...
पण त्याचा भलताच वेग पाहून, 
त्याला पुन्हा चालायला लागलो...

खूप दिवसांनी,
मी त्याला भेटलो...
एकमेकांना कवेत घेऊन,
चिंब भिजून गेलो...

त्याच्या सोबतीचा प्रवास,
कायमच मला हवाहवासा वाटतो...
कालही त्या दोन तासांच्या साथीत,
आनंदाने मी तृप्त झालो....

एवढं सगळं चांगलं चाललं असताना,
तो जसा अचानक आला तसाच गेला...
अन मी मात्र त्याच्या परत येण्याच्या आशेने, 
रस्त्याकडे टक लावून बघत राहिलो...

गणेश शितोळे
(३० सप्टेंबर २०१७)


शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

एलफिन्स्टन्सची दुर्दैवी घटना, वाढदिवस आणि मी


                                    नुकताच ऑफिस मध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन होतं. महिनाभरातील सर्वांच एकत्रित.  एकतर हाफ डे घेऊन पण कामाअभावी ऑफिसमधेच दिवस गेल्यानं कंटाळा आला होता. त्यातच आपलाही याच महिन्यात वाढदिवस असतो याचा विसरंच पडला होता. त्यामुळेच अनेकदा बोलावून पण मी निघायला तयार नव्हतो. नंतर लक्षात आले पण मुंबईत घडलेली सकाळीची घटना डोळ्यासमोरून हटली नव्हती. दुपारच्या वेळी जेव्हा बातमी वाचली तेव्हा क्षणभर हायसं वाटलं. पण पुढच्या क्षणी मनाला धस्स होऊन गेलं. कारण काही काळाकरता का होईना मो पण मुंबईकर म्हणुन जगलो होतो. मुंबई लोकल च्या गर्दीचा भाग होतो. पण जेव्हा जेव्हा मुंबईत अशा काही घटना घडतात तेव्हा तेव्हा मुंबईकरांचं स्पिरीट वाखाणण्याजोगं असतं. अन ते त्या दिवशीही दिसलं. 

                                    एलफिन्स्टन्सची दुर्दैवी घटना मनाला चटका लावून जाणारी होती. त्यात ऑफिसात हे असं सेलिब्रेशन करणं माझ्याच्याने कदापि शक्य नव्हतं. पण ही वेळ अशी असते की अनेकांच्या वेगवेगळ्या भावना आणि दृष्टीकोन असतो. त्यात आपण आडकाठी घालण्यापेक्षा मी सहजपणे वाढदिवस साजरा करत नाही सांगून टाकलं. पण एलफिन्स्टन्ससारखी दुर्दैवी घटना घडली असताना मीही त्या गर्दीचा एक भाग असतो त्या गर्दीतीलच एका व्यक्तीवर बळावलेला हा दुःखद प्रसंग आणि सेलिब्रेशन करणं माझ्या तत्वात बसणारं नव्हतंच. त्यामुळेच मनोजच्या आग्रहानंतरही मी त्यापासून दूर झालो नाही. क्षणभर त्याच्या मनात प्रतिक्रिया उमटली असेल. पण त्यापेक्षा ही हे अधिक महत्वाचे वाटलं.


गणेशदादा शितोळे
(२९ सप्टेंबर २०१७)


सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७



भोवताली असते माणसांची गर्दी,
पण माझं असं कोणीच तिथं नसतं...
ढिम्मच उभा असतो फक्त गर्दीत,
पण गर्दीतही मनाला एकटेपण भासतं...



असतो मग मी जेव्हा जेव्हा एकटा,
खरंतर खुप खुप बोलायचं असतं...
मनात साठलेलं बोचरं सर्व काही,
क्षणात रितं करायचं असतं...



गणेशदादा शितोळे
(२५ सप्टेंबर २०१७)


शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

वाढदिवस ०९ सप्टेंबर २०१७

                            नुकताच वाढदिवस येऊन गेला. दरवर्षी सारखा याही वेळी तो वेगळाच अनुभव देणारा होता. मुंबई पुणे मुंबई असा नियमित प्रवास करताना त्यादिवशी बसमध्ये होतो. बसमधे असणाऱ्या बाकी ऑफिसमधील मित्रांना दुसर्‍या दिवशी सकाळी इमेल आल्यावर वाढदिवस असल्याचे कळणार असल्याने त्यांनी सोबत असूनही शुभेच्छा दिल्या नाहीत. पण मागच्या वाढदिवसासारख्या याही वाढदिवसाला रात्री बाराच्या ठोक्याला मित्रांच्या शुभेच्छा आल्या. अगदी अनपेक्षित मित्रमैत्रीणींकडूनही. म्हणजे मागील पाच वर्षांत विसरले की काय अशी भिती ज्या मित्रमैत्रीणींबाबत वाटत होते त्यांनीही न चूकता फोन केल्याने वेगळाच आनंद झाला होता. मागील वर्षी सारखेच याही वर्षी वाढत्या वयानुसार कमी होण्याच्या शुभेच्छाही मिळाल्या. फक्त ह्या वेळी व्यक्ती वेगळी होती. पण एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही यंदाचा वाढदिवस मला वेगळ्याच कारणांमुळे लक्षात राहीला. 

                           रक्तदान केल्याची सुरवात तशी २००८ ची. पदविका अभ्यासक्रमादरम्यान पहिल्यांदा सुरू केलेला तो संकल्प दर तीन चार महिन्यांनी मी आजवर पाळत आलो. पण कधीही वाढदिवसाला रक्तदान करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे दरवर्षी वाढदिवस साजरा करताना बर्थडे डोनेरचा टॅग लावून कधीही सेलिब्रेशन झाले नाही. यंदा मात्र आजोबांना मंगेशकर हॉस्पिटल मधे डॉ. रमेश कुलकर्णी यांच्या ओपीडी करता रात्री रांगेत उभे रहायला जायचंय असल्याने ह्यावेळेस संधी मिळणार नक्की होते. दुपारी आजोबांचे एकूण तपासणीच्या सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि मी औषधे घेण्याकरता आजोबांना थांबवून रक्तदान करण्याकरता गेलो. दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीत पहिल्यांदाच रक्तदान करत असल्याने अर्ज आणि इतर बाबींची पूर्तता करून मी रक्त तपासणी करून घेतली. मी सांगतलेला रक्त गट आणि तपासणी मधील रक्त गट हे एकच असल्याची खात्री झाल्यावर मला समुपदेशन केंद्रात पाठवले. तिथे एक वयस्कर परिचारिका मला अर्जामधील गोष्टींची माहिती विचारून खात्री करून घेत होत्या. रक्तदान केल्यावर होणारे फायदे सांगितले. त्यानंतर एकूण उंची नुसार वजनावर घसरल्या आणि इतरांच्या सारखी वजनावरून होणारे आजार आणि इतर गोष्टीचं पारायण घातलं. शेवटी त्यांनी वय आणि जन्म तारीख ह्याची खात्री केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला मी रक्तदान करतोय. त्यानंतर माझी त्यामागची एकूण भूमिका समजावून घेतली. रक्तपेढीतर्फे माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आणि मी वेगळ्याच आनंदाने मनातल्या मनात उड्या मारून घेतल्या. रक्तदान वगैरे झाल्यावर अपेक्षित एक छोटा केक कापून वाढदिवस साजरा झाला. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ. 

                           एकूण आठ नऊ वर्षात तीसच्या आसपास वेळा रक्तदान करता आले याचा आनंद वेगळाच होता. समाजाचा एक भाग म्हणून आपल्याला जे शक्य असेल ते देण्याचा हा प्रयत्न होता. ह्यातून कोणाचा जीव वाचेल इतकीच अपेक्षा होती. रक्ताची नाती नसली म्हणून काय झालं ती अशाही पद्धतीने जोडता येतात. माणूस म्हणून जगताना एवढा छोटा विचार करून आपल्या अनाहूतपणे कोणाचा जीव वाचत असेल तर हे केव्हाही चांगलेच आहे. आजवर अनेकदा ऐकलं रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान. ते सर्वश्रेष्ट आहे की नाही माहित नाही. पण दान नक्की आहे. रक्तदान करताना लिहिलेल्या अर्जातील शेवटच्या काही ओळी हेच सांगत होत्या. कोणत्याही प्रकारचा मोबदला घेऊन, आमिषाला बळी पडून होणारे रक्तदानाचे प्रकार हा केवळ स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक असते. ते दान कधीच ठरत नाही. त्यामुळेच नेतेमंडळींच्या किंवा इतर कुणी जाहीर रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित केले तर मी कधीही जात नाही. अशा कार्यक्रमातून असे प्रकार सर्रास घडतात. मध्यंतरी माझ्या वाढदिवसासारख्या दिवशी एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त असाच रक्तदान शिबिराच् कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि जाहिरातबाजी करतानाच हा किळसवाणा प्रकार घडणार आहे हे दिसून आले. जाहिरातीतच एक बाटली रक्तदान करा आणि एक पेनड्राईव्ह भेटवस्तू घेऊन जा. हे सरळसोट महाविद्यालयीन तरूणांना आमिष दाखवले होते. मलाही ह्याचे निमंत्रण मिळाले. पण आयोजकांनी ही भूमिका समजून पण उमजली नाही. त्यांना आमिष दाखवून गेल्या वर्षीचा रक्तदानाचा विक्रम मोडीत काढण्याकरता रक्तदान शिबिराचा खटाटोप केला. त्यामुळेच मला रक्तपेढीत जाऊन रक्तदान केल्याने वेगळा आनंद झाला होता. 

                           आता पुढच्या वर्षी वाढदिवसाला काहीतरी वेगळं असं सादरीकरण असेल हे नक्की. रक्तदानापासून सुरू झालेला हा संकल्प पुढच्या वाढदिवसाला मरणोत्तर अवयवदान आणि देहदान करण्याचा आहे. तूर्तास इतकेच.
नवीन वर्षाचा नव्या संकल्पपूर्ती करता आपल्या माणसांचं पाठबळ मिळावं.



गणेशदादा शितोळे
(१६ सप्टेंबर २०१७)


शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

रक्त म्हणजे...?


आज मी दाखवतो
रक्त म्हणजे नक्की काय असतं...
आपलेच विचार आपणच मांडल्याचं,
चुकवलेलं मोल असतं...

आज मी दाखवतो
रक्त म्हणजे नक्की काय असतं...
विचारांच्या लढाईत
गोळीच अंतिम लक्ष्य असतं...

आज मी दाखवतो
रक्त म्हणजे नक्की काय असतं...
लढण्यासाठी उमेद देणारं,
जाज्वल्य प्रेरणेचं प्रतिबिंब असतं...

गणेश शितोळे
(१५ सप्टेंबर २०१७)


गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७


मी माझाच किनारा शोधतोय...


आयुष्याच्या समुद्रात झोकून दिलंय स्वत:ला,
कंटाळा येत नाही तोपर्यंत पोहून घेतलंय....
आता घ्यावा  जरासा आराम, 
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...

संकटांच्या लाटांशी भिडणं रोजचंच,
तेही जणू सवयीचंच झालंय....
आता घ्यावा खळखळाटापासून शांत विराम, 
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...

लहान मोठे माशांशी भेटणं रोजंचच,
तेही जणू सवयीचंच झालंय....
आता घ्यावा जरासा मोकळा श्वास, 
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...


मावळतीचा सूर्य पहाणं रोजचंच,
तेही जणू सवयीचंच झालंय....
आता टाकावा जरासा निश्वास, 
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...



गणेशदादा शितोळे
(१४ सप्टेंबर २०१७)


शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

माझंघर :- भोईटे रेसिडेन्सी



                                  महाविद्यालयामध्ये गेलेला प्रत्येकजणच म्हणत असतो की, महाविद्यालयामधलं जीवन खूप सुंदर असतं. महाविद्यालयाचे ते दिवस, महाविद्यालयाच्या त्या आठवणी, सारं काही खूपच रम्य असते. महाविद्यालयामध्ये असणारे वातावरणच भन्नाट असते. तिथे मित्रांसोबत केलेला कल्ला असतो, सर्वांनी मिळून केलेला "बंक' असतो, मित्रांसाठी अन मित्रांच्या प्रेमप्रकरणाकरता केलेला नको तो उद्योग असतो. हे सारं काही कुठं तरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात साठवलेलं असतं. पण महाविद्यालयामधील धमाल मस्तीचा एक अविभाज्य भाग असतो ते म्हणजे वसतिगृह. जो शाळा महाविद्यालयात गेला अन त्याच्या या जागेशी आठवणी नाहीत असं होणार नाही. आणि नसतील तर तो काय आयुष्य जगला यावरच प्रश्नचिन्ह आहे. ज्याने वसतिगृहातील वात्सव्य अन जीवन अनुभवलेलं नाही तो काय महाविद्यालयीन जीवन जगला मगं. थोडक्यात त्याशिवाय महाविद्यालयीन जीवनाला अर्थ नाही.

घर म्हणजे असतं आपलेपण, 
घर म्हणजे असतं माया, 
घर म्हणजे असतं जीवाला लावणारी ओढ
घर म्हणजे अशी जागा जिला नसते कशाचीच तोड.


                                  असंच काहीसं अनेकांच घर म्हणजे वसतिगृह. माझ्या आजवरच्या महाविद्यालयीन शिक्षणात दोन्ही वेळेस वसतिगृहात रहाण्याचा योग आला. पदविका अभ्यासक्रमात घरापासून महाविद्यालय दूर होतं म्हणून तर पदवीला जवळ होतं म्हणूनही वसतिगृहात राहिलो. म्हणजे एकून काय तर महाविद्यालयाचं अंतर हे कारण ठरवण्यास अर्थ नाही. तर असंच माझ्या पदवीच्या शिक्षणादरम्यानच्या प्रवासातील अविभाज्य ठरणारं वसतिगृह होतं, भोईटे रेसिडेन्सी. मी त्याला वसतिगृह म्हणणार नाही तर ते माझं दुसरं घरंच होतं. माझंघर होतं ते आमच्या सगळ्यांकरताच. शिक्षणाकरता बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येकाकरता ते घरासारखंच होतं. या घराने घरातली प्रेम देणारी माणसं दिली. असंख्य अशा आठवणींचा साठा दिला की ज्या ओंजळीत मावायच्या नाहीत. ह्याच माझघरांबद्दल आपुलकीचे दोन शब्द लिहावेत म्हणून खूप दिवसापासून मनात होतं. आज थोडा मोकळा वेळ आहे तर घेतले आठवणीतल्या शब्दांच्या मोरपिसांना शोधायला. जे सापडेल ते शब्दात उतरेल.

                                  नुकतेच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या माझघरांची बिकट अवस्था पाहिली अन कसंतरींच झालं. सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. आमच्या मैदानाची दैना पाहून तर मन सुन्न झालं. छतावर पाणी साठून शेवाळ आलेले. कठड्यांना भेगा पडलेल्या. माझंघरांची अवस्था पाहून वाटत होतं की आम्ही निरोप घेतल्यापासून त्याच्यातला जीवच निघून गेला. आजही आठवतं पदवीच्या दुसऱ्या वर्षानंतर जेव्हा पहिल्यांदा भोईटे रेसिडेन्सीला आलो तेव्हा आपला लवाजमा घेऊन आलो होतो. शोकेसचं कपाट. गादी, खेळायला कॅरम, पत्ते अन गाणी ऐकायला एक ध्वनीषेपक. मधल्या खोलीत जागा नसल्याने मग शेजारच्या खोलीत सामान ठेवलं आणि ती जागा हक्काची होऊन गेली. रोहीत आहिरराव च्या सोबतीने प्रवास सुरू झाला होता. नंतर प्रताप गवळी अन अक्षय खैरे, अक्षय कदम असे एकेक मित्र भेटत गेले. जस जसा मी ह्या माझंघरात रमत गेलो तसतसा माझंघराचा परिवार वाढतंच गेला.

                                  रोहीत आहिररावपासून झालेली ही सुरवात अक्षय खैरे, प्रताप गवळी, अक्षय कदम, प्रशांत चांदगुडे, विकास तावरे, दादासाहेब करपे, बाळासाहेब सुरसे, मनोहर रोहकले, अक्षय लगे, अमोल लगे, विकास सांगळे, लक्ष्मण सानप, प्रशांत खिलारी, विलास पुंड, अविनाश निंभोरे, अशोक चांडे, अविनाश कुसमुडे, महेश थोरात, सोमनाथ जाधव, प्रवीण कुसमुडे, प्रवीण जामदार, कैलास कोरडे, संदीप सोनटक्के, युवराज कुद्री, निलेश म्हात्रे, मयुर दळवी, संदीप धायगुडे, देवेश सरोज, अतुल लवटे, अजय पवळ, योगेश कारंडे अशा अनेक मित्रांपर्यंत सुरूच आहे. इथे भेटलेला प्रत्येकजण माझ्या वर्गातलाच होता असाही भाग नव्हता की खोलीमित्रही नव्हता. पण त्या प्रत्येकाशी माझं एक वेगळंच नातं होतं. इथल्या प्रत्येकाकरताच मी कोणीतरी होतो. सुरवातीला असणारा खोलीमालकांचा भाचा हे नातं जावून मैत्रीचं नातं चिकटलं तशी आमची ओळख सलगीत बदलली.

                                  माझ्यातला दादा ते भाऊ हा प्रवास खऱ्या अर्थाने झाला तो याच मित्रांमुळे. महाविद्यालयाच्या दिवसांत प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घडत असतात. खरा जडणघडणीचा काळ तो हाच. महाविद्यालयामधला. याच महाविद्यालयच्या कट्ट्यापासून, वसतिगृहापासून स्वत:ला स्वत:ची नवी ओळख होते. मलाही माझी एक वेगळी ओळख मिळाली ती इथेच. माझ्या नावामागे खरं तर दादा हे बिरूद, महाविद्यालयात ते जपलं गेलं.  पण माझंघरात मला कायम मोठ्या भावाची वागणूक मिळाली. आणि महाविद्यालयात गणेशदादा अन भोईटे रेसिडेन्सीकरता मी गणूभाऊ झालो. त्यामुळे मला या महाविद्यालयीन काळात झालेले संस्कार म्हणा किंवा आठवणी म्हणा आयुष्यभराची शिदोरी देणाऱ्या वाटतात. असं म्हणतात माणूस चांगला किंवा वाईट होणं हे त्याच्या संगतीवर अवलंबून असतं. पण मला या माझघरात जी जी माणसं भेटली ती चांगलीच भेटली असं मी मानतो. कारण त्यांच्या वाईट असं नव्हतं हे मी म्हणणार नाही. पण मी त्यांच्यातील चांगलं घेऊ शकलो नाही हा माझा दोष असावा असे मी मानतो. या माझंघरात भेटलेले मित्रच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरले. कारण आज मी जो आहे ते त्यांच्या बळावर. 

                                  आजही आठवतंय माझंघरासमोरच्या पटांगणात रोज आमचा क्रिकेटचा डाव रंगायचा. एकवेळ महाविद्यालयात एखादा तास बुडेल पण आमचं क्रिकेट खेळणं थांबेल असं कधीही झालं नाही. इतकं की परीक्षेच्या काळात सुद्धा एखादा तरी सामना खेळला तरच पास होऊ असं काही असल्यासारखं खेळण्याच वेड होतं. क्रिकेट खेळतानाचे माझंघराचे नियमही भलतेच होते. सुरवातीला कंपाउंडच्या पलिकडे उंचावरून मारलं की बाद असा नियम असल्याने षटकार नावाचा प्रकारच गायब होता. फक्त उजव्या बाजूला चेंडू गेला तरच धावा. नंतर रस्त्याच्या बाजूने धावपट्टी केली अन नियमही बदलले.  नंतर समोरच्य़ा भिंतीला बाद ठेवण्यास सुरवात झाली तर उजव्या बाजूला चेंडू मारायच्या सवयीने शेजारच्या विहीरीने अनेक चेंडू गिळले. काही शेजाऱ्यांनीही चोरले तो भाग वेगळा. धावबादचा निर्णय म्हणजे माझं कौशल्य़ असल्यासारखं अंतिम निर्णय माझाच होता. कधी कधी दादा भाऊ असल्याचा फायदाही झाला तो असा.

                                  अशोक भाऊ चांडे घडले ते याच मैदानात. निलेश साळुंखेसारखा फलंदाज कितीही चिडला तरी सांभाळून ठेवला तो याच मैदानाने. युवराज कुद्रीचं अष्टपैलुत्व निखारलं तेही याच मैदानात. मनोहर रोहकले आणि मी वेगाने फेकायलाही याच मैदानात शिकलो. अक्षय लगे भोईटेचा युवराज सिंग घडला तेही श्रेय याच मैदानाचे. आशुतोष लांडे यष्टीसमोर उभे राहून खेळायला याच मैदानामुळे शिकला. दादासाहेब करपे यांना पंचगिरी करत मार खावा लागला तोही याच मैदानात. विलास पुंड ह्यांनी छोटंसच कर्तुत्व गाजवलं तेही इथेच. अविनाश निंभोरे उर्फ गुल्लुदादा, अविनाश कुसमुडे उर्फ छोट्या, अक्षय खैरे, विकास सांगळे उर्फ काका, प्रशांत चांदगुडे उर्फ आण्णा हे घडले ते या मैदानातच. ह्या मैदानाचं वैशिष्टच असं होतं की मैदानावर ज्याने पाऊल ठेवलं त्याला त्याने खेळायला भाग पाडलं. अगदी अतुल लवटे उर्फ मास्तरांपासून ते संदीप धायगुडे उर्फ बारक्या पर्यंत सगळ्यांना. बाळासाहेब सुरसे यांना अध्यक्षपद संभाळताना त्रास झाला पण त्यामुळे ते राहून गेले नाहीत. 

                                  क्रिकेट खेळतानाच्या एकेक आठवणींकडं मागे वळून पाहिलं की सगळं काही तराळून येतं. निलेश साळुंखे आणि युवराज कुद्री यांची जुगलबंदी रोज अनुभवताना सगळ्यांना येणारी मजा अवर्णनणीय आहे. खुनशी खेळ करता करता ताबा सुटून झालेले अनेक पराभव पाहिले, अनुभवले. अशोक भाऊंची अन प्रवीण जामदार यांनी दोन्ही बाजू मध्यस्थींप्रमाणे सांभाळल्याने अनेक वादविवाद मिटले. सामानाधिकारी म्हणून आमची भूमिका कायम राहिल्यानेही त्याला हातभार लाभला.

                                  क्रिकेट इतकाच माझंघरात दुसरा खेळ रंगला तो कॅरमचा. मी माझंघराच पाऊल टाकलं तेच कॅरम घेऊन. सुरवातीला मी, प्रताप गवळी, अन दोन्ही अक्षय असा डाव रंगायचा. नंतर रोहीत शिकल्यानंतर एक अक्षय कमी झाला अन त्याची जागा रोहीतने घेतली. कॅरम खरा रंगला तो प्रशांत चांदगुडे (आण्णा) माझंघरांचा भाग झाल्यापासूनच. प्रशांत, विकास, मी आणि रोहीत ही चौकडी आणि कॅरम. रात्री झोप येईपर्यंत डाव सुरू असायचा. नंतर विकास गेल्यानंतरही मी आणि प्रशांत दोघे रात्री दोन वाजेपर्यंत खेळायचो. नंतर संपूर्ण माझंघरंच कॅरमवर तुटून पडायचं. कॅरमच्या रेषांचे रंग निघून गेले पण खेळ सुरूच राहिला. कधीकधी तर गुप्तहेर खात्याला शोध घ्यायला लागायचा कॅरम कोणत्या खोलीत आहे. कॅरम ही माझघरांचाच एक भाग होऊन गेला होता.

                                  दरम्यानच्या काळात सगळ्यांचाच अधिक गुण मिळवण्याकरता प्रयत्न सुरू झाले आणि कॅरमला रामराम ठोकला. दिवसा क्रिकेट आणि रात्री पत्ते हा अजून एक खेळ आमच्या दररोजच्या वेळापत्रकाचा भाग झाला होता. अभ्यासाकरता वाचनालयात जायला दूर पडायचं म्हणून अनेक मित्रांनी माझंघरही सोडलं होतं. पण नव्या ठिकाणी क्रिकेटची जागा पत्त्यांनी घेतली होती. सकाळी गणिताचा ज्यादा तास झाला की दिवसभर आम्ही मोकळे. नितीन जाधव, अक्षय खैरे, गणेश पाटील, दादासाहेब करपे, प्रशांत चांदगुडे असा चार पाच जणांचा समुह रोज दहा अकरा वाजले की खेळायला तयार. तिथे कोणाताही पैशाचा व्यवहार नव्हता. दिवसभराच्या खेळानंतर हरणाराने फक्त कपभर चहा प्यायला देणे एवढंच नाममात्र. नाहीतरी तेवढा नियमित खर्च होताच. रोजच्या खेळात हरल्यावर उद्यापासून सगळं बंद म्हणत नितीन पत्ते फाडून एका खोक्यात भरायचा.  पण सकाळी पुन्हा नवीन डाव. असे पत्ते फाडत फाडत खोकं भरून गेलं पण डाव चालूच राहिला. अगदी गणित विषयात प्रविण्य मिळेपर्यंत पत्ते खेळण्यातही प्राविण्य मिळाले असंच झाले.

                                  शेवटच्या वर्षी भोईटेपासून दूर गेलेली सगळी मंडळी जशी माझंघरात परतली तसा मीही आलो. महाविद्यालयीन काळाचा सर्वात आनंद देणारा कालवधी म्हणजे शेवटचं वर्ष होतं. महाविद्यालयातील अनेक गोष्टींची सुत्र माझंघरातून हलवली जात होती. भांडण तंट्यापासून ते मुली पटवण्यापर्यंत सगळी. विलास पुंड आणि अविनाश निभोरे ह्यांची प्रकरण मिटवताना गावतल्या अनेकांशी वाईट घेतलं. अगदी शालेय मित्र वैभव पाचपुते ते मावस भाऊ शशिकांत पाचपुते पर्यंत. नंतर प्रकरणाचा काहीच फायदा नसल्याने पश्चाताप झाला तो वेगळाच. 

                                  भोईटेवरून दौण्डच्या मित्रांना सतावल्याचाही किस्सा मोठा रंजक होता. अशाच एका संध्याकाळी महाविद्यालयातील जिएस ग्रुप दौण्डच्या फ्लॅटवर जमला होता. फक्त मीच त्यात नव्हतो. जरा खेचावी म्हणून आणि तसंही मोबाईलचा बॅलंस संपवायचाच होता म्हणून दादासाहेब कर्पेला श्रीकांत नागवडेला  फोन करायला लावला. नंतर तासभर श्रीकांत, जयदीप, स्वप्निल, रोहीत, प्रवीण अशी एकेकाची दादासाहेब कर्पेने खेचली की आम्ही शेजारील मंडळी हसू हसू जाम झालो होतो. आज जर ती रेकॉर्डिंग ऐकली तरी पोट धरून हसू येतं. जयदीपची दाददाने सांगितलेली जागा मजेशीर होती. मेरगळवरची धर कोंबडी पिरगळ ही चारोळी पण बरीच साधली होती. प्रवीण गाडे आणि दादा ह्यांच्यातील पप्पा बोलतोय तो संवादही चांगलाच साधला होता.

                                  माझघरांचा परीक्षेचा काळ काहीसा वेगळाच असायचा. उल्लेख करण्याजोगं बरंच काही आहे. तिसऱ्या वर्षाचा परीक्षेचा काळ होता. पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्याने गर्दी तशी तुरळकंच होती. अक्षय लगे आणि मनोहर दिवसरात्र अभ्यासिकेत असल्याने माझंघरात मी आणि दादासाहेब कर्पे एकटे असल्यासारखेच होतो. बाकी मंडळी एकीकडे आणि आम्ही दोघं एकीकडे. आम्ही दोघे  मिळून माझंघरातच अभ्यास करायचो. त्यावेळी नुकताच जॉन अब्राहमचा शुटआऊट अॅट वडाळा आणि श्रद्धा कपूरचा आशिकी २ झळकला होता. आशिकीची गाणी एवढी सुपरहीट झाली होती की अभ्यासासोबत त्याचंही पारायण व्हायचं. माझंघरात त्या रात्री बाकी मंडळींनी शुटआऊट अॅट वडाळा आणि आशिकी २ पाहिल्याची कुणकुण आम्हाला कुठून तरी लागली होती. सकाळी मी पेनड्राईव्ह घेऊन दोन्ही चित्रपट प्रतिलीपीत करून घ्यायला गेलो. पण ज्याच्या लॅपटॉप मधे होते त्याने कृष्णा ने ते आम्हाला दिले नाहीत. त्यामुळे मी खूप संतापलो. मला नाही ऐकून घ्यायची सवयच नव्हती. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. चिडून मी आणि दादा ने ऐन परीक्षेत त्या मंडळींना त्रास देण्याकरता वीज गायब केली. वीजेची एक जोडतार घेऊन आम्ही त्या रात्री राहुल मेरगळच्या घरी जत्रेचं जेवायला जायचं असल्याने निघून गेलो. त्यानंतर मामांना फोनाफोनी झाली. पण उपायच आम्हाला माहित असल्याने त्यांना न येण्याचा सल्ला दिला. आम्ही येईपर्यंत सगळी मंडळी अंधारात बसून होती.

                                  राहुल मेरगळच्या घरी यथेच्छ जेवल्यानंतर एक स्प्राईट घेऊन येताना दौण्डमधील मित्रांकडून  दोन्ही चित्रपट प्रतिलीपीत करून आणले. आम्ही माझंघरात परतताना आमच्या हातात स्प्राईटची बाटली पाहून अनेकांनी आज हे दारू पिऊन आलेत असा अंदाज बांधत आमच्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला. आल्यानंतर वीज सुरळीत करून बाहेरच्या मोकळ्या मैदानात गादी टाकून आमचं चित्रपटगृह सुरू झालं. एकदम दणदणाटात आम्ही चित्रपट पहात होता. काही वेळीने छतावर झोपलेल्यांनी काहीतरी फेकून मारल्याचे जाणवल्यावर मग यथेच्छ शिवीगाळ हासडूनही झाली. निखील नवले आणि त्याला साथ द्यायला प्रतिक रोहकले विरूद्ध मी आणि दादा. बराच वेळ ही लढाई चालू होती. मध्यरात्री पर्यंत दणदणाट सुरूच होता. आशिकी २ ची गाणी मनमुराद ऐकली जात होती. सोबत नवीन ग्रुपही तयार झाला होता. नाव होतं सी जी. त्याचा अर्थ जरा अश्लिल होता. पण तो समोरच्याने घेईल कसा बदलणारा होता. 

                                  एकंदरीत माझंघरात त्यानंतर महीनाभर जोपण अभ्यास झाला तो  शुटआऊट अॅट वडाळा आणि आशिकी २ चित्रपटांच्या रोजच्या पारायणानेच. दिवसरात्र दोन चित्रपट लॅपटॉपवर झळकत असतं. अनेकांना त्याचा त्रास झाला. पण आम्ही त्याच्या साथीनेच अभ्यास केला. नंतर नंतर माझंघरावरील इतर मंडळींना अभ्यासिका हाच एकमेव पर्याय ठेवला होता. एका प्रकरणाचा राग दुसऱ्या ठीकाणी अन तेही महिनाभर तसाच धुमसत होता.

                                  माझंघरात अभ्यास करताना असे वादाचे प्रसंग घडण्यासह आनंदाचे प्रसंगही घडले.  तिसऱ्या वर्षात अनेकदा पेपर फुटीच्या अफवा पसरत होत्या रात्रीच माझंघरात अशी अफवा पसरायची आणि रात्रभर त्याच प्रश्नोत्तरांचा एकत्रित अभ्यास सुरू व्हायचा. माझंघराने अभ्यासातही अनेक आनंदाचे क्षण दिले. माझ्यामुळे माझंघरातील मित्रांना अगोदरच सबमिशन मिळायचं त्यामुळे आदल्या रात्री पूर्ण करा असा प्रकार कधी करायला लागला नाही. माझंघरात अनेकांना विविध विषयांकरता मार्गदर्शन केले. श्रीकांत इंगवले ने कटीया करता रात्री जागवल्या. ह्या सगळ्यापेक्षाही माझंघरात शेवटच्या वर्षीचं वातावरण काहीसं वेगळंच होतं. सगळे मिळून मिसळून अभ्यास करत होते. कधी अभ्यासिकाची जागाही माझंघराने घेतली. 

                                  भोईटे म्हणजे माझंघरावरून सगळ्यात महत्वाची म्हणजे अंतरंग ह्या स्नेहसंमेलानाची सगळी सुत्र हलली होती. गणेशखिंडचा एनएसएस कॅम्पपासून खरी तर ह्याला सुरवात झाली होती. मंगेश मोरेचा विद्यार्थी प्रतिनिधी करता फॉर्म भरायला जाताना गर्दीतली दर्दी माझंघरातील पण होती. नंतर विद्यार्थी प्रतिनिधी होईपर्यंत झालेल्या राजकारणात तितक्याच तोडीची सुत्र हलवली गेली तीही माझंघरातूनच. महाविद्यालयातील प्रशासनाला आव्हान उभं करण्यामागं माझंघर होतं हे लक्षात यायला अनेकांना वर्ष गेलं. स्नेहसंमेलनाचे पंधरा दिवस माझंघराने अनेकांना सामावून घेतलं. स्नेहसंमेलानाच्या सजावटीची अंतरंगची सुरवात जशी माझंघरातून झाली होती तसा शेवटीही तिथेच झाला. 

                                  माझंघर अनेक प्रेमप्रकरणांचं साक्षीदार आहे. कोणाचं एकतर्फी तर कोणाचं नुसतंच मनातलं आकर्षण. माझंघराने असे अनेक प्रेमवीर पाहिले. विलास पुंडची प्रकरण निस्तरताना अनेकांशी वाईटपणाही घ्यायला लागला. सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण महाविद्यालयीन शिक्षण संपलं आणि त्या दोघांच्यातली ओढही अन प्रेमही. आता उगाच नसत्या उठाठेवी केल्याचा पस्तावा येतो. निलेश साळुंखे ह्यांच प्रेम फक्त वास घेण्यातच गेलं. त्यापेक्षाही उल्लेख करावा असे प्रेमवीर म्हणजे मनोहर रोहकले. त्याच्याल पुनवेचा चंद्र कायम मनातच उगवत राहिला. तावातावाने भांडणारा मनोहर एकतर्फी प्रेम करत करत झुलत राहिला. वर्षे गेली. शिक्षण संपले. पण एकदा तिला मनातल्या भावना बोलून दाखवता आल्या नाहीत. सोमनाथ जाधव ह्यांची प्रेमाची गोष्ट मनातच राहीली.

                                  प्रवीण जामदार आणि दादा कर्पे ह्यांच महाविद्यालयीन आयुष्य न्याहाळन्यातच गेलं. दादासाहेबांच्या अभिलाषा पूर्ण झाल्या नाहीत अन आशाही. अविनाश निंबोरे ह्यांच्या प्रेमापेक्षा भलत्याच गप्पा व्हायच्या. अक्षय खैरेंनी जपून ठेवलेला प्रेमाची भेट असणारा रूमाल वहात्या पाण्यात सोडून गोष्टीचा शेवट केला. तुम भी तनहा थे हम भी तनही थे पलिकडे आमचं काही नव्हतंच पण अफवांचं पीक जोरात रंगलं माझघरात.  बाळासाहेब सुरसे ह्यांची राणी अधूरी एक कहाणीच होऊन बसली. निलेश म्हात्रे ह्यांची प्रेमाची गोष्ट लग्नाची गोष्ट झाली. विकास सांगळे काका फक्त झुरत राहीला. पण प्रेमाचा बंगला बांधण्याची संधी नाहीच साधता आली. रोहीत आहिरराव ह्यांच प्रेमात शेजारधर्म आल्याने काहीच झालं नाही. 

                                  महाविद्यालयीन काळात एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू फुलवू शकलात तर तेच तुम्हाला येणाऱ्या काळात समाधान देणारं ठरेल. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो. नाव कमावलं. पैसा कमावला. तरी देखील महाविद्यालय जीवनामधून मिळालेला आनंद, समाधान हा नेहमीच या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा असतो. हे सर्व जण खुल्या दिलानं मान्य करतील. माझ्या महाविद्यालयीन काळात मला आनंद, समाधान देणारं ठिकाण जसं महाविद्यालय होतं तसंच माझं हे माझंघरंही होतंच. आयुष्यातल्या सर्व बऱ्या अन वाईट गोष्टींचं साक्षीदार आहे माझंघर. इथेच मनमुराद क्रिकेट खेळलो. भांडणेही केली अन मिटवलीही. अनेकांशी वाद घातले आणि नवीन वाद निर्माण पण केले. भोईटे रेसिडेन्सी परिवारापासून सुरवातीला सी जी ग्रुप नंतर गणेशदादा शितोळे मित्रमंडळ हा प्रवास माझंघराच्या आठवणींप्रमाणेच बदलत राहिला.

                                  माझंघरात हळू हळू दिवस जात गेले. अभियांत्रिकी झेपायला लागलं अन पास व्हायची कला आम्हाला अवगत झाली. हो हो नाही नाही म्हणता म्हणता आम्ही सगळे झालो. खूप यातना झाल्या. बाकी विद्यापीठा सारखं भरभरून गुणही आले. माझंघरातील या काही वर्षांनी खुप काही दिलं. सगळ्यात महत्वाच म्हणजे चांगले मित्र, आणि कुठल्याही परिस्थितीत लढायची ताकत दिली. कुठलीही गोष्ट आम्हाला आयती मिळाली नाही. इथे प्रत्येक गोष्ट आम्ही कमावलेली आहे आणि त्याचाच आम्हाला अभिमान आहे.

                                  आज आयुष्याच्या एका वळणावरून माझंघराकडं डोकवून पाहिलं आणि हिशोब केली की माझंघरानं काय काय दिलं तर ओंजळीत मावणार नाही. माझंघराशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच वाढदिवसादिवशी माझंघराची अवस्था पाहून कसंनुसं झालं होतं. कदाचित आमच्या सारख्या वेदना त्यालाही होत असाव्यात. इथं राहिलेला प्रत्येकजण या माझघरांपासून काही ना काही घेऊनच गेला. रित्या हाताने कधी त्याने पाठवलंच नाही. आज हे लिहीतानाही माझंघराने गालावर ओघळणाऱ्या आसवांसह ओंजळीत मावणार नाहीत इतक्या आठवणी दिल्या. आयुष्याच्या प्रवासात आम्ही सगळे पुढे निघून गेलो आहोत पण माझंघर आजही तिथेच आहे. आमची वाट पहात गेट टु गेदर साठी सगळे पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या उत्साहात टुण्णकन उडी मारून तयार होत येऊ जीवन आणि मैत्री दोन्हीचा अनुभव घ्यायला...! माझंघराच्या आठवणी, गमती-जमती, भोईटे रेसिडेन्सीमध्ये केलेला वात्रटपणा, बावळटपणा आठवणीत साठवायला....!





(भोईटे रेसिडेन्सिचा निरोप घेताना
डावीकडून अशोक चांडे, मनोहर रोहकले, अमोल जाधव)




(रॉयल वरून घेतलेला फोटो)


(संयमी खेळाडू आशितोष लांडे)


पदवीदान समारंभात युवराज कुद्री)

(पदवीदान समारंभात सोमनाथ जाधव)



(अभ्यासिकेत गाणी ऐकत अभ्यास करताना मी)

(परीक्षा संपल्यावरचा आनंद. डावीकडून युवराज कुद्री,
सोमनाथ जाधव, गणेश शितोळे रोहीत आहिरराव)

(परीक्षा संपल्यावरचा आनंद. डावीकडून युवराज कुद्री,
सोमनाथ जाधव, गणेश शितोळे रोहीत आहिरराव)


(परीक्षा संपल्यावरचा आनंद. डावीकडून युवराज कुद्री,
सोमनाथ जाधव, गणेश शितोळे रोहीत आहिरराव)

(एन एफ एस खेळताना डावीकडून
गणेश शितोळे,रोहीत आहिरराव)

(रात्री चहाचा आस्वाद घेताना डावीकडून रोहीत आहिरराव,
युवराज कुद्री, संदीप सोनटक्के, मयुर दळवी, दत्ता पावणे)



(हे भोईटे रेसिडेन्सीचे फकीरचंद फाके 
उर्फ निलेश साळुंखे)

(सूर्य मावळताना भोईटे रेसिडेन्सीवरून)

(भेळीवर ताव मारताना डावीकडून मनोहर रोहकले उर्फ लाळगे,
फकीरचंद फाके उर्फ निलेश साळुंखे आणि इतर)

(मयुर दळवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना)

(युवराज कुद्री चा वाढदिवस डावीकडून गौरव गलांडे,
रोहीत आहिरराव, दत्ता पावणे, युवराज कुद्री, अविनाश बिरारीस,
मयुर दळवी, शुभम जाधव, आणि सोमनाथ जाधव)


(युवराज कुद्री चा वाढदिवस 
मी आणि युवराज)


(माझा आणि निलेशच्या वाढदिवसाचा केक)


(वाढदिवसाचा केक कापताना मी आणि निलेश )


(वाढदिवसाचा केक भरवताना मी आणि निलेश )

(माझा आणि निलेशचा वाढदिवस :- डावीकडून विलास पुंड
निलेश साळुंखे, गणेश शितोळे, अशोक चांडे

आणि अशोक भाऊंचे मित्र  )



(मला आणि निलेश ला केक भरवताना
संदीप धायगुडे उर्फ भोईटेवरील बारीकराव
)

(मला आणि निलेश ला केक भरवताना
विलास पुंड आणि अशोक चांडे
)


(अशोक भाऊंना केक भरवताना मी)

(रोहीतला केक भरवताना मी)

(माझा आणि निलेशचा वाढदिवस साजरा करताना,
डावीकडून रोहीत आहिरराव, विलास पुंड, प्रवीण जामदार
संदीप धायगुडे, निलेश साळुंखे, मी, अशोक चांडे
आणि अशोक भाऊंचे मित्र)

(मला आणि निलेश ला केक भरवताना
प्रवीण जामदार आणि दादासाहेब करपे
)


(प्रवीणला केक भरवताना मी)


(मला केक भरवताना अशोक भाऊ)


(मला केक भरवताना रोहीत)

(अशोक चव्हाण ह्यांच्या चहाच्या टपरीवर घेतलेला सेल्फी
डावीकडून विलास पुंड, रोहीत आहिरराव, प्रवीण जामदार,
निलेश साळुंखे, अशोक चांडे, अशोक भाऊंचे मित्र,
गणेश शितोळे, संदीप धायगुडे आणि दादासाहेब कर्पे)



(अशोक चव्हाण ह्यांच्या चहाच्या टपरीवर घेतलेला सेल्फी
डावीकडून विलास पुंड, रोहीत आहिरराव, प्रवीण जामदार, 
निलेश साळुंखे, अशोक चांडे, अशोक भाऊंचे मित्र, 
गणेश शितोळे, संदीप धायगुडे आणि दादासाहेब कर्पे)







गणेशदादा शितोळे
(०९ सप्टेंबर २०१७)


शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७


माणसं मारून विचार थोडीच संपतो हो...!!!



माणसं मारून विचार थोडीच संपतो हो,
आज मी थोडं कलबर्गी होतो...
तुमच्या अचूक नेमाइतकाच त्वेषाने फोफावेल,
आज मी थोडे खरंच बोलतो....

सांगतो शिवाजी कोण होता पुन्हा,
आज मी थोडं पानसरे होतो...
फार तर फार एका गोळीचा प्रश्न आहे ना,
तोपर्यंत आज मी थोडं जगून घेतो....

उधळून टाकू तुमचा प्रत्येक डाव,
आज मी थोडं दाभोळकर होतो...
सांडतील ना रक्ताचे दोन थेंबच,
आज मी थोडं मनातलंच बोलतो...

असली तुमची गिधाडांची टोळी,
आज मी थोडं गौरी लंकेश होतो...
अंगार नाहीत हो शब्द माझे,
आज मी थोडे शब्दच बोलतो...



गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)


आपण अजूनही मित्र आहोत... 

                           आज दुपारी ऑफिस मध्ये कामाच्या गडबडीत नेहमी सारखाच गुंतलो होतो. इतक्यात फोन वाजला. खरंतर उचलायची मुळातच इच्छा नव्हती. आणि त्यात कामावर असताना अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन घेणे मी टाळत होतो. पहिल्यांदा रिंग वाजून वाजून फोन कट झाला. पण मी उचलला नाही काही वेळानंतर पुन्हा फोन आला. पुन्हा तेच.  शेवटची रिंग वाजेपर्यंत उचललाच  नाही. तिसऱ्यांदा पुन्हा फोन आला आणि मी मग शेवटी एकदाचा उचलून कानाला लावला. जमेल तितक्या चिडक्या आवाजात हॅलो म्हणालो. खरंतर ऑफिसमधे असल्याने मी फोनवर हळू आवाजात बोलतो. पण कामाचा सगळा ताण त्या फोनवर निघला आणि मी ओरडतच बोललो. क्षणभर खूर्चीवरून उठून आजूबाजूला कोणी ऐकलं का ते पाहिलं. 
                         माझ्या ओरडल्यानंतर पलीकडून कोणी बोललंच नाही. समोरून आवाज येत नसल्याचं पाहून माझी चीड चीड जास्तच वाढली. असं वाटलं की चार चांगल्या शब्दात समजून सांगवं. कामाच्या वेळी असा वेळकाढूपणा नको. दोन चार सेकंद झाले पण समोरून काहीही प्रतिसाद नव्हता. आजूबाजूला पाहून मी सावरून पुन्हा बोलू लागलो. पलीकडची शांतता खूपच गंभीर वाटत होती. पहिलं वाक्य कानावर पडलं. 
"मी तुला फोन का केलाय तुला कळणार नाही." 
                               त्या वाक्यासोबत मला चटकन लक्षात आलं. आठवड्यापूर्वी आपण सुरू केलेल्या सोशल नेटवर्कींग साईट्सवरील तुला कळणार नाही चा हा पहिला प्रतिसाद होता. ते वाक्या मला ह्या तुला कळणार नाहीच्या ट्रेण्डचीच आठवण करून देत होते. त्या वाक्यावरोबर जाणवलं की कोणीतरी जवळी व्यकती आहे. जवळची व्यक्ती असल्याने जाणीव वाढत चालली होती. मनातल्या मनात कोण असेल कोण असेल हा प्रश्न एकसारखा विचारून मनाला भांडावून सोडत होतो. पण मनाकडून कोणताही प्रतिसाद मिळतच नव्हता. क्षणभर ह्याच विचारात हरवलो. पण लगेच सावरलो. कामाचा ताण असल्याने नंतर बोलू म्हणून फोन ठेवणार इतक्यात पुढचं वाक्य कानावर पडलं. 
" का रे, कसा आहेस आता.? मधे आजारी होता ना ? माहिती होतं मला !" 
                                 ह्या फक्त दोनतीन वाक्यातील संवादातून सगळच सांगून गेले. त्याचा आवाज ऐकून मन कधीच जुन्या आठवणींच्या मागे धावत सुटले होते. थेट पदविका अभ्यासक्रमाच्या वेळीच्या दिवसांत जाऊन थांबले होते. दीड वर्षाचा सोबतचा प्रवास. मैत्रीचा हमरस्त्यावरची साथ. अन आठवणींच्या जगात घेऊन जाणारी पायवाट. पदविका अभ्यासक्रमादरम्यान जुळलेल्या मैत्रीतील एक रेशीमगाठ होती ती. खरंतर ही रेशीमगाठ बांधून ठेवणारा ज्या दिवशी निघून गेला तेव्हाच मैत्रीची ही रेशीमगाठ पडद्याआड गेली. ज्या दिवशी अहमदनगर सोडलं त्यादिवशी जणू मी श्रीला सोडलं. मला रेल्वेस्टेशनर सोडल्यानंतर मी निघताना साठलेलं त्याच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या आठवणींसारखंच तराळून आलं. अन आज ओसांडून डोळ्यातून वाहत होतं. ऑफीस मधल्यांची नजर चुकवून पटकन डोळे पुसले अन फोन घेऊन बाजूला निघून गेलो. 
                                 श्रीकांत आणि मला बांधून ठेवणारी ती फोनवर बोलत होती. सुरवातीला काही पुढे बोलणं दोघांनाही जमत न्हवतं. कारण इतक्या वर्षांनी मनात खोलवर आत काहीतरी दुखत होतं. आमची मैत्री श्रीच्या अनुपस्थितीत कधीच पूर्ण होणारी नव्हती. दोन मिनिटांनी तिने पुन्हा तो प्रसंग सांगितला. मैत्रीची काळरात्र ठरणारा. माणसाच्या आयुष्यात अपघाताने माणसं येतात.तशीच अपघात माणसाच्या आयुष्यातून माणसंही घेऊन जातो. तो अपघातही असंच काहीसं करून गेला होता. श्रीकांतच्या साथीच्या आठवणी जागवून आमचं चालू होत फक्त श्वासांच संभाषण. मनातल्या मनात हुंदका देत. मन गहीवरून गेलं होतं.  
                         ऑफिसमधे असल्याने कामाची आठवण होती. फोन तसाच अर्धावर ठेवून मी वॉशरूमला गेलो. पापण्यांमधील पाणी गालांवर ओघळण्याआधी मी तोंडावर पाणी मारून चेहरा धुवून घेतला. कदाचित वाटत होतं दोन्ही पाणी एकमेकांत विरघळून जातील. जुनी प्रत्येक आठवण जागी झाली होती अन हजारो प्रश्नांना ओठांवर घेऊन येत होती. मैत्रीच्या कितीतरी क्षणांची गोळा बेरीज करायची राहिली होती.
                               हजार प्रश्नांना बाजूला सारून पुन्हा फोन केला. अगदी काहीच वाटलं नसल्यासारखं बोललो. तिच्या प्रश्नावरचं  फक्त "बरा आहे म्हणत उत्तर दिलं. फोन ठेवण्याअगोदर एक महत्वाचं वाक्य ती बोलली. "आपण अजूनही मित्र आहोत." त्यानंतर फोन ठेवला गेला. अनंत आठवणींना वळसा घालून पुन्हा कधी न भेटण्याकरताच.  पुन्हा कधी भेट होईल की नाही याची खात्री नव्हतीच. सोशल नेटवर्किंग साईटसचा उपयोग काय असतो याची जाणीव तेव्हा झाली.  

                       आजवरच्या प्रवासात अनेक माणसं जोडली गेली. पण कोणत्याही व्यक्तीला श्रीकांतची जागा घेता आली नाही आणि ती येणारीही नाही. ती तशीच त्याच्यासारखीच स्पेशल आरक्षित आहे. सर्वात जवळची व्यक्ती कोण असा प्रश्न पडला की कोणत्या एका मित्राचे नाव येत नाही. त्याचं कारण आणि उत्तर माझं मलाच मिळालं होतं. तुला कळणार नाहीच्या माध्यामातून मनातलं हे कोडं सुटलं याचा आनंद आहे. बाकी अजून बरीच नाती रिफ्रेश करायचीत. तूर्तास इतकंच. 

गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)  


तुला कळणार नाही आणि मी...


                             काही दिवस झाले चालेलेल्या तुला कळणार नाही ट्रेण्डवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना नेमकं काय चालंल आहे याचा प्रश्न पडला. पण सगळ्यांना हे कोड्यात टाकणारं होतं. हा ट्रेण्ड ज्यांच्याकरता होता त्यांच्याकडून नेहमीसारखंच काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. खरंतर अशा माणसांच्या प्रतिक्षेत होतो. आजवर आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटली. काही आपली झाली तर काही आपली होऊन दुरावली देखील. यात दोष कोणाचा या वादात मला पडायचे नाही. कारण त्यातून फक्त वाद निर्माण होतात. खरंतर या दूरावलेल्लाय मनांना जोडण्याकरताच हा सगळा खटाटोप होता. 
                                तुला कळणार नाही चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुलाखतीतून एकंदरीत चित्रपटामागची भूमिका लक्षात आली. वाचक मित्रांची चर्चासत्रात दूरावलेल्या नात्यांना रिफ्रेश करून पुन्हा एकदा पालवी फुटावी म्हणून तुला कळणार नाही हा ट्रेण्ड करण्याची कल्पना सुचली. आणि याच कल्पनेतून गेल्या आट दिवसांपासून फेसबुक पेजच्या माध्यमातून चारोळ्या लिहीण्याचा प्रयत्न सुरू होता. ८ सप्टेंबर ला चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो कसा आहे हे लक्षात येईलच. पण मुळात हा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा काहीही भाग नव्हता. 
                              एकूण तुला कळणार नाही ह्या ट्रेण्डमागची भूमिका मांडताना खरंतर दुरावलेल्या माणसांना भेटण्याचा प्रयत्न करायचा होता. पण कामाअभावी ते जमेल की नाही यावर शंकाच आहे. तरीही ज्या होईल त्या माध्यमातून तो प्रयत्न केला जाईल. पदविका अभ्यासक्रमापासून प्रत्येक वळणावर मैत्रीच्या कक्षा रूंदावत राहिल्या. पण या कक्षांमधे फक्त माणसांचा भरणा झाला. प्रत्यक्ष दोन तीन वर्षात फक्त मोजक्याच माणसांच्या संपर्कात राहिलो. पण मेकॅनिकल की कंप्युटर की इ अॅण्ड टिसी अशा वादात अडकलो नाही कधीच. ज्या माणसांसोबत जगलो वाढलो तीही आभियंत्रिकीच्या प्रवासात दूरावली. एकूणच काय तर ना इकडचा ना तिकडच्या ह्याच भूमिकेत राहिलो याची सल कायम आहे. 
                           पदवीचे शिक्षण घेतानाचा प्रवासही सुखकर होताच. घरंच महाविद्यालय असल्याने सुरवातीचा आपलं राज्य करण्याचं स्वप्न अल्पावधीत साकार झालं. भांडण तंटे करून भीतीचं अधिराज्य गाजवता येतं. पण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची ताकद फक्त मैत्रीतच होती आणि ती असतेही. पदविका अभ्यासक्रमासारखीच इथंही अनेक माणस कमावली. मैत्रीची ओंजळ अगदी ओसांडून वाहिली. पण सरते शेवटी महाविद्यालय सोडताना हिशोब केला तर वाळूच्या कणांसारखी ओंजळीत सामावलेली मैत्री ओघळून गेली. आजही अनेकदा प्रश्न पडतो की आपला सर्वात जवळची व्यक्ती कोण. जुन्या आठवणीत उत्तरे शोधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी हाती काहीच लागत नाही. कारण उत्तर सोपं होतं. आजवर भेटलेली माणसं मला कायम समांतर राहीली. आमच्यात ओढ होती मैत्रीची. संवाद होता. पण तो सैल गाठीतच गुंतलेला. वास्तवाने अंतर आलं आणि ती सैल गाठ आपसूकच सुटली. 
                               आज पदवीचं शिक्षण घेतलेले महाविद्यालय सोडून दोन अडीच वर्षे उलटली. प्रत्येक जण आयुष्याची लढाई लढत झगडत पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय. सोशल नेटवर्कींग साईट्स ने नात्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला असं कितीही वरवर वाटत असलं तरीही वास्तविक नात्यांमधील संवाद संपण्याचं कारणही सोशल नेटवर्किंग साईट्सच ठरल्यात. नात्यांमधील अंतर कमी झाले असे वरवर दिसत असले तरीही नाते दूरवल्याची खंत प्रत्येक मनाला आहे. 
                          व्हाट्सअप आणि फेसबुकवरील रोजच्या संवादाने माणसातली समोरच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्याची शक्तीच हरवली आहे. कोणतंही नातं गरजेशिवाय जन्माला येत नाही अन वाढतंही नाही. आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे नातं असतं. पण आजकाल ह्याच भावना सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यामातून व्यक्त करताना नात्यांची ती खोल जाणीव आढळत नाही. माणसांसोबतच्या नात्यांची जागा आता सोशल साईट्सने घेतली आहे. याला मीही अपवाद नाही हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच त्याच सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून सुरू केलेला तुला कळणार नाही हा ट्रेण़्ड तीच हरवत चाललेली नाती पुन्हा रूजवण्याच प्रयत्न करणार आहे. 
                        खरंतर हा उपक्रम वैयक्तिक पातळीवर होता. पण चर्चासत्रातून सार्वजनिक करण्यात आला. म्हणूनच या ट्रेण्डच्या माध्यमातून आपल्या नात्यांना रिफ्रेश करून आपल्या जवळच्या व्यक्तींची आपल्या आयुष्यातील किंमत कळणार नसली तरी तिचं मोल जाणवून द्या. एखाद्या विषयी इतके दिवस मनात असणारे गैरसमज बाजूला सारून घ्या एक गळाभेट. राहून गेला असेल फोन तर आज करू उद्या करू म्हणण्यापेक्षा मनात आलं तर मन मोकळं करून टाका. बोलायचं असेल खूप पण समोरून बोलता येत नसेल तर लिहा सोशल नेटवर्कींग साईटसवर. पुन्हा एकदा सुरू करा थांबलेला संवाद. 
तुला कळणार नाही च्या माध्यामातून करूया 
आपलीच नाती आपणच रिफ्रेश 
जोडू या नवीन दूवा जून्याच नात्यांना. 
घेऊया नात्यांच्या मुरांब्याची चव पुन्हा एकदा.  

गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७) 


तुला कळणार नाही


                              गेली अनेक दिवस झाले माझ्या टाईमलाईवर तुला कळणार नाही हा ट्रेंड सुरू होता. माझं नेमकं काय चाललंय हे अनेकांना काही कळत नव्हतं. मुळात ते तसंच होतं. त्यांना कळण्यासाठी नव्हतंच. या दिवसांत मला विचारणार्‍या प्रत्येक करता ते तुला कळणार नाही होतं. हा मराठी सिनेमाच्या पब्लिसिटीचा प्रकार आहे का असंही विचारलं गेलं. अनेकांनी तुला मधे आमची ती शोधण्याचा प्रयत्न केला तोही वाखाणण्याजोगाच आहे. एकूण हा सगळा खटाटोप बुचकळ्यात टाकणाराच होता.  
                           खरंतर हा होता एका आव्हानाचा अन आवाहनाचा प्रतिसाद. ज्या दिवशी तुला कळणार नाही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यानंतरच्या सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रतिक्रियेमधून चित्रपटामागची एकूण कल्पना लक्षात आली. आणि मग सर्व मराठी चित्रपट प्रेमी असणार्‍या मित्र मैत्रीणींच्या ग्रुपच्या चर्चेत एक भन्नाट कल्पना सुचली. आपापल्या टाईमलाईच्या माध्यमातून ही एक ओळ वापरून जे काही लिहिले जाईल ते पोस्ट करायचे. अन हा तुला कळणार नाही चा खेळ सुरू झाला. 
                              वास्तविक हा खेळ वेगळ्याच कारणाकरता होता. तुला कळणार नाही हा चित्रपटच मुळात म्हणजे आपल्या आयुष्यातील थांबलेल्या नात्यांना रिफ्रेश करून पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करायची. आजपर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर कुणी ना कुणी भेटत राहिले. मित्र मैत्रिणींचा परिवार जोडला गेला अन आपल्यातील प्रत्येक जण परिपूर्ण होत गेला. पण ह्याच प्रवासादरम्यान अनेक नात्यांच्या फक्त आठवणी साठत राहिल्या. मोबाईलच्या काॅन्टक्ट लिस्टमधे क्रमांक जोडत राहिले. पण नात्यांमधला संवाद थांबला तो थांबलाच. अशी थांबलेली नाती प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. 
                          माझंही आजवरच शिक्षण फिरस्ती असल्यासारखं विविध ठिकाणी झाले अन त्यामुळेच असंख्य मित्रपरिवार जोडला गेला. पण प्रत्येक वेळी जूनी शाळा किंवा काॅलेज बदलले तशी जवळच्या मित्रांची जागा बदलत राहीली. मैत्रीच्या कक्षेतील हे फेरबदलच नात्यांना रिझ्युम करू लागले. म्हणूनच अशा थांबलेल्या नात्यांना सुरवात करण्यासाठी तुला कळणार नाही च्या माध्यमातून एक प्रयत्न आहे. जेव्हा हा खेळ सुरू झाला तेव्हा अट होती की यामागचं रहस्य आठ सप्टेंबर पर्यंत तसंच ठेवायचं. आज ही पोस्ट लिहीतानाच हे रहस्य उघडकीस येणारंच आहे. पण हाही खेळाचाच भाग होता. ह्या पोस्टच्या नंतर थांबलेल्या नात्यांच्या प्रवासाच्या साचलेल्या आठवणी अन काॅन्टक्ट नंबर आठवून प्रतिसाद म्हणून आठवण करून देत थांबलेली नाती रिफ्रेश करून रिस्टार्ट करावीत. हा प्रतिसाद फोन करून असेल, प्रत्यक्ष भेट घेऊन असेल. अथवा या पोस्टला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया भागात असेल.


गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)


रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

आमचे आभियांत्रीकीला असतानाचे मित्रासारखे असणारे मार्गदर्शक असणाऱ्या चि. अविनाश घोलप सर यांचा साक्षगंध झाला. त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता ही कविता. 

नवीन नात्यात प्रवेश करताना आमच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा




योग घडवून भेटला आहात तुम्ही,
पतीपत्नी पेक्षा एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण रहा...
आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक वळणांवर,
एकमेकांचे सखे सोबती रहा...

काचेवरच्या ओघाळत्या थेंबासारखे,
आनंदाच्या ओघात रहा...
मनातल्या भावनांचे दवबिंदू असून तुम्ही,
नात्यांच्या मैफिलीत चमकून रहा...

जमिनीवरती रोवून घट्ट पाय अन घेऊन हाती हात,
आयुष्यात गगनभरारी घेत रहा...
यशोशिखरांची उघडतील दारे अनेक,
स्वप्नांच्या मार्गावर दोघे पादाक्रांत करत रहा...

नवीन नात्यात प्रवेश करताना आमच्या शुभेच्छा,
आयुष्याभर एकत्र सोबत रहा...
थोरमोठ्यांचा घेऊन वर अन आशिर्वाद,
नवीन जबाबदार्‍यांचा ओलांडून उंबरठा पुढे जात रहा....


गणेशदादा शितोळे
(३ सप्टेंबर २०१७)