माझी मलाच पत्र लिहीताना...!!!
काळोख आणि शोकांतिकेच्या ओझ्याखाली पिचलेलं मोडकळीला आलेलं
हे मन
आता अस्वस्थ करणाऱ्या आठवणीचं संग्रहालय बनलं आहे.
धूळ झटकल्याने त्या आठवणीही पुसून जातील
या भीतीमुळे मनाची खोली स्वच्छ करणंही सोडून दिलं आहे.
बाहेरच्या भिंतीवर असलेल्या एका पोटमाळ्याच्या जागेत
पुसटशा तपकिरी रंगाची धूळ साचलेली पानं अस्तावस्त पडलेली
आहेत.
दाराबाहेर अर्धवट उघडा असणारा पेन
अजूनही तसाच पडलेला आहे.
जरा मळला, काळवंडला आहे.
पत्र लिहीण्यासाठी घेऊन ठेवलेली कोरी पत्रं
कोपऱ्यात अजूनही उभी आडवी पडलेली आहेत.
काचेचं दार असलेल्या कपाटात
जुन्या कवितेत्या वह्याही तशाच आहेत.
त्यातली मोराची पिसं,
कुरमजायला ठेवलेली पिंपळाची पानं,
गुलाबाच्या पाकळ्या सगळं जिथच्या तिथंय.
टेबलावर बसून जी काही चित्र काढली.
ती चित्राची वही,
अन रंगात अर्धवट बुडलेला ब्रश देखील हलवलेला नाही.
अन सोबतच आहेत माझ्या जगण्याची असंख्य औषधं...
गणेश सुवर्णा तुकाराम
०४ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा