माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

आयुष्यं कसं व्यवस्थित सुरू होतं...





टि. व्ही बघणे, लैपटॉप, फेसबूक ह्या कक्षा
मनाला कायमंच फार अरूंद वाटू लागल्यात...
त्यापलीकडचं जग खुणवू लागलं अन
चार भिंतीच्या साम्राज्यातली घुसमट चिथऊ लागलीए...

श्वासासोबत मनात
प्रलयकारी प्रश्नांची सरबत्ती होऊ लागते
अन मग श्वासांनाही
ते प्रश्न झेलणे अवघड होऊन जाते...

असं कितीही असलं तरी
मी मात्र काहीच बोलणार नाही....

मन आतूर झालं की वाटत रहातं,
कुणाला तरी सांगावं काहीतरी....

मनातून ते सर्वकाही बाहेर यायचा प्रयत्न करतंय
पण मीच आता ते निघू देत नाही...
अशाने डोह साचलाय मनातल्या मनातच...

भीती वाटत होती म्हणून त्यातलं काही लिहीयला घेतलं तर
मीच माझ्या प्रश्नाचं उत्तर लिहून ठेवलं...
" नको, आज नको, नंतर बघू."
कारण आता अगणित अनुत्तरीत प्रश्नांची
उत्तर लिहायला खूप उशीर झालाय....

त्यानंतरच्या कितीतरी वेळ मन केवळ नि:शब्दच,
भावनांच्या ओलाव्यात कुठलाही संवाद नव्हता
अन त्याची गरजही भासली नाही....

काही समज गैरसमज असले तर
खुलेपणाने सोप्या भाषेत मांडायचे...
अन तशाच काही लक्ष्मणरेषा आखून घेतल्या की
त्याही ओलांडायच्या नाहीत तर पाळायच्याच....

बस्सं एवढं ठरले की
आयुष्यं कसं व्यवस्थित सुरू होतं...


गणेश सुवर्णा तुकाराम
१८ नोव्हेंबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा