माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

वधू परीक्षा की व्यंग परीक्षा...!!!

 

   


                                    घरातील तरूणाने विशी पंचवीशी ओलांडली की घरातील जेष्ठांना तरूणाच्या लग्नाचे डोहाळे लागतात. मग सुरू होते गोत्र, देवकं आणि पत्रिका-कुंडल्या बघण्याची लगबग. स्थळ पहाणे आणि दाखवण्याच्या कार्यक्रमापूर्वी या संस्कृतीच्या नावाखालच्या उठाठेवी चालू असतात. यातून एखाद्या भटजीकडून परीक्षेपूर्वीच गुणतपासणी झाली आणि उत्तीर्ण झाले की पुढचे सोपस्कार पार पाडायला मोकळे. मंगळ, राहू, केतू च्या घरातून सुटलं की मग येतो पाहुणे होऊन जाण्याची वेळ. वधू परीक्षेला जाण्याची वेळ. 

                                       घरातील जेष्ठ, गावातील एखादी मोठी व्यक्ती, मामा आणि शेवटी ज्याच्या लग्नाच्या नावाखाली या परीक्षेचं आयोजन केलं जातं तो तरूण. सगळ्या मंडळींने पाहुणे होऊन होणार्‍या वधूच्या घरी जाण्याचा कार्यक्रम ठरतो. या मंडळींमधे सगळे प्रश्न ठरवलेले असतात. म्हणजे कुणी काय विचारयचं ते. पाहुणे होऊन गेले. चहा, नाश्ता झाला की वेळ येते मुख्य परीक्षेची. वधू परीक्षा. घरातील मुख्य जागेत, मोकळ्या जागेत हा परीक्षेची व्यवस्था करण्यात आलेली असते. पाहुणे होऊन आलेले सगळे मुख्य अतिथी असल्याने मध्यभागी बसलेले असतात. त्यांच्या पासून समोरच जवळच्या जागेत एका गालिचावर पाठ मांडलेला असतो.

                                       समोर आणलेला नारळ आणि एखादा गोड पदार्थ ठेवलेला असतो ताटात. पाटाचीही दिशा ठरलेली असते. तो पूर्व-पश्चिम दिशेलाच तोंड करुन बसता यावे असा असावा. घरातील एका कोपर्‍यात मुलीचा बाप पडक्या चेहर्‍याने उभा असतो.  सगळे जण आपापल्या जबाबदारीने तयारीत असतात.  नवर्‍या मुलीने साडी नेसून मोकळ्या जागेत मांडलेल्या पाटावर बसायचे. मुलगी आतल्या दारातून पाटावर बसण्याकरता येण्यासाठी निघाली की वधू नव्हे व्यंग परीक्षेचा पहिला अंक सुरू होतो. या मंडळींपैकी नेमुन दिलेल्या जबाबदारी सारखे काहीजण तिच्या चालण्याच्या लकबीकडे बघत असतात. उद्देश काय तर म्हणे मुलगी पायने आधू (लंगडी) आहे का पहाण्याचा हा सोपस्कार. यात उत्तीर्ण होऊन पुढे पाटावर बसताना कशी बसते, डोक्यावर पदर घेऊन बसते, की अमुक तमुक प्रश्नाच्या अंदाजावर मुलीवर केलेल्या संस्काराची परीक्षा होते.                              

                                       पाहुणे होऊन आलेल्यापैकी एक जण मान लावून पाटावर बसलेल्या वधूच्या परीक्षेचा पुढचा अंक घेण्यासाठी पुढे येतो.                               

                                       ताटात ठेवलेल्या पंचपाळातील हळदी कुंकू लावून पहिल्या प्रश्नाला सुरवात होते. 

                                       नाव काय...?                              

        वधूच्या माहिती असलेल्या उत्तराकडे या मंडळींचं टक लावून लक्ष असतं. ती बिचारी उत्तर देते. त्यावरून आलेली मंडळींची खात्री होते की मुलगी बोलण्यात बोबडी नाही, ऐकण्यात कानाने बहिरी नाही. व्यंग परीक्षेचा दुसरा अंक संपतो. प्रश्नोत्तराच्या दरम्यानच आलेल्या मंडळी कडून वर्णतपासणी, नाकशारपणाचीसुद्धा तपासणी केली जाते. या सगळ्या व्यंगतपासणी नंतर निरोप कळवतो सांगून ही परीक्षा संपते. कोपर्‍यात बसून असलेला मुलीचा बाप सुटकेचा निश्वास सोडतो आणि या सगळ्या व्यंगतपासणीला मुकसंमतीने स्विकारतोही.

                                       एकंदरीत दीड दोन तास चालणाऱ्या या प्रकराला सोज्ज्वळपणे संस्कृती ह्या गोंडस नावाखाली सर्रास स्विकारले आहे. पण या सगळ्या प्रकाराला संस्कृती म्हणावे की विकृती हे न समजणारे आहे. ही नेमकी वधू परीक्षा केली जाते की व्यंग परीक्षा...? कारण या सगळ्या प्रकारात केवळ व्यंगाचीच तपासणी केली जाते. मुलगी लंगडी आहे की नाही म्हणून चालवले जाते. अगोदरच उत्तरं माहिती असलेल्या प्रश्नांना विचारून बोबडेपणा अन बहिरेपणा तपासढ्यापलिकडे काहीही केले जाते नाही. हा गैरसमज असता तर चांगले असते. पण पाहुणे म्हणून जाणार्‍यांमधील अनेक जेष्ठांकडून यापलिकडे दुसरे उत्तर मिळत नाही. काहींनी तर केवळ याच कारणासाठी वधू परीक्षा केली जाते.

                                       दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या मागे अजून एक गोष्ट असते तो म्हणजे अविश्वास. ज्या व्यक्तीशी नवीन नाते जोडायचे आहे त्याच व्यक्तीवर अविश्वास दाखवून नव्या नात्याची सुरवात करणे म्हणजे धक्कादायक बाब आहे. आणि हा असा प्रकार संस्कृतीच्या नावाखाली चालणे तर अजूनच धक्कादायक आहे. वधू परीक्षेच्या नावाखाली हा चाललेला व्यंगतपासणीचा प्रकार नक्कीच क्लेशदायक आहे.

गणेश दादा शितोळे
(२६ डिसेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा