माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६


पेन आणि टोपण




एकदा पेन आणि टोपणाचे झाले भांडण,
अन घ्यावा वाटला त्यांना काडीमोड....
दोघेही एकमेकांना निर्वाणीचे म्हणाले,
मला आता एकटं जगायला सोड...

पेन म्हणे टोपणाला,
झिजायचं मी अन मिरवत फिरायचं तू...
मला ठेवणार खिशात झाकून,
अन जगभर दाखवत हिंडायचं तू...

न रहावून टोपण म्हणाले पेनाला,
अडकून लटकायचं मी अन लिहायचा मान घेणार तू...
लोकांच्या दाताखाली चिरडण्याचं दुःख,
नेहमी हातात विसावणारा काय समजणार तू...

सुखदुःख समजल्यावर एकमेकांची,
भांडत म्हणणारं कोणीच उरलं नाही मी आणि तू...
पेन म्हणे मिठीत घेत टोपणाला,
लिहायचा मान घ्यायचा मी अन मुकुटाचा मान घ्यायचा तू...

मिटले एकदाचे पेन आणि टोपनाचे भांडण,
जरी घ्यावा वाटला होता त्यांना काडीमोड....
नव्याने शिकत सुखदुःखाची व्याख्या, 
दोघांनीही सांधला मनामधला निखळलेला जोड...


गणेशदादा शितोळे
(२६ फेब्रुवारी २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा