माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८


पुतळ्यांचे स्तोम कशासाठी...?


प्रस्तावित बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारकं

प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक

सरदार पटेलांचा पुतळा

राज ठाकरेंचे शालजोडे...

कालच गुजरात मध्ये स्व. श्री वल्लभभाई पटेल याच्या स्मारकाचं जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण झालं. लवकरंच महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारके अन पुतळे बांधण्यासाठी आंदोलन, भूमिपुजनं अन आश्वासनंही झाली.
मध्यांतरी मुख्यमंत्री म्हणाले, प्रसंगी राज्य गहाण टाकू, अजून कोणी म्हणाले राज्याची तिजोरी मोकळी करू. हे नेमकं काय चालूयं. अशा या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? हा सरकारी अन पर्यायाने पण जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ? जनतेच्या काडीलाही हात लावण्याचा अधिकार नाही असा आदर्श घालून देणाऱ्या शिवछत्रपंतीच्या स्मारकाकरता  जनतेच्या तिजोरीला मोकळं करण्यात नक्की कुठलं शहाणपण. शेतकरी आत्महत्या करतो. त्याला जगण्याकरता पुरेशी मदत करायला तिजोरीत पैसा नसताना हा असला अपव्यय कशाकरता.?
यात निव्वळ राजकारण आहे.  हल्ली सरळसोट धार्मिक अन जातीयवादी भाषणे करून दंगे भडकावता येत नाहीत ना म्हणून मतांसाठी अशा पद्धतीने याचा पुतळा बांधा, त्याचा पुतळा काढा, याच्यासाठी निधी उभारा, त्याच्या करता आंदोलन कर असे राजकारण चालू आहे. मधल्या मधे होतो तो जनतेच्या पैशाचा अपव्ययंच.
 नव्या पिढीला पुतळ्यातून, स्मारकांमधून इतिहासाची, महापुरूषांच्या विचारांची, त्यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा मिळावी, या हेतूनेच हे पुतळे उभारले जावेत हे एक वेळ मान्य करू. पण मग अमुकच उंची हवी हा अट्टहास कशाकरता. पटेलांचा पुतळा १०० फुट बांधला असता तरीही तोच विचार मिळाला असता ना. १८२ फुट पुतळा बांधून आपण उगाच का पुतळ्यांमधे उंचीची स्पर्धा तयार करतोय. उलट यामुळे आपण महापुरूषांची उंची खालीवतोय. 
बरं ते महापुरूषांची लांब राहीलं, आजकाल राजकारण्यांचेही पुतळे उभारले जाऊ लागलेत. काय योगदान दिलं आहे पुढाऱ्यांनी...? राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळण्यापलिकडे काय केलंय.? लोकनेता म्हणजे नेमकं काय..? जनतेच्याच पैशातून पुतळे किंवा  धार्मिक स्थळे उभारण्याने नेमके काय साध्य होते? पुढाऱ्याचे असे उदात्तीकरण करण्यापेक्षा, स्मारक उभारण्यापेक्षा हाच पैसा गरीबांच्या कल्याणासाठी का वापरला जात नाही? पुतळ्यांची भाऊ गर्दी कशासाठी?
मध्यांतरी त्रिपुरामधल्या विजयानंतरचा उन्माद तिथला लेनिननचा पुतळा पाडून व्यक्त झाला. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. यापूर्वी तामिळनाडूत पेरियार यांचाही पुतळा पाडण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. काय साधलं आपण पुतळे बांधून...?
पुतळे, स्मारके बांधण्यामागचा उद्देशच आपण कधी नीट समजून घेतला नाही. केवळ भावनिक राजकारणाकरता पुतळे किंवा स्मारके उभारले जात नसतात. कुठल्या विशिष्ट समाजाचा किंवा विचारांचा आदर करण्यासाठी हे पुतळे अन स्मारके बांधायची नसतात. ज्या व्यक्तींनी अलौकिक काम केलेले आहे. ज्यांचे कर्तृत्व सर्वप्रकारच्या समाजाला आणि विचारांनाही पुरून उरणार आहे, किंबहुना सर्व समाजाला एकत्रित करणारे आहे, अशांचाच सन्मान करण्यासाठी पुतळे उभारले जात असतात. त्या पुतळ्यांच्या निमित्ताने समाजाला किंवा येणार्‍या पिढीला प्रेरणा मिळावी, सर्वसमावेशकता किंवा सामाजिक सौजन्याचा वसा जपला जावा हा हेतू त्यामागे असतो.  आपल्या इथे कुठलाही राजकीय नेत्याचं निधन झालं की उभारा पुतळा. रस्त्याला, चौकाला द्या नावं. भले मग तो सार्वजनिक सभातून शिवराळ भाषेत बोंबलाना का..? त्याने लोकांच्या झोळ्या मोकळ्या करून भीकेला लावले असेल तरीही त्याचे अनुयायी बोंबलत रहाणार. आंदोलन करणार. सर्व कशाकरता..?
पुतळे, स्मारंकाचा वापर 'प्रेरणा' कमी अन 'द्वेष' पसरवून माणुसकीच्याच छाताडांचं रक्त पिण्यासाठी होतोय. किती पुतळ्यांचं संवर्धन खरंच होतं. पक्षांनी केलेली विष्ठाही आपण जयंती पुण्यतिथीशिवाय साफ करत नाही अन कसल्या गप्पा हाणतोय आपण स्मारकांच्या. कोणाचा किती उंच पुतळा उभा केला गेला यावर त्यावर आता महापुरूषांची महती मोजली जाणार का....?
म्हणूनंच पुतळे स्मारके आयुष्यात कधीच मला अभिमानस्पद वाटणार नाहीत. पुतळे स्मारके आयुष्यात कधीच मला स्फुर्ती, प्रेरणा देणार नाहीत. कारण शेवटी ती निर्जीवंच. त्यातून विचारांची प्रेरणा जन्मला येईलंच याची खात्री नाही...
काल उदघाटन झालेल्या एकतेच्या पुतळ्याच्या ओझ्याखाली देश तीन हजार कोटी रुपयांनी दबला. हजारो आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त करून आदिवासींना देशापासून वेगळं करणारा एकतेचा पुतळा किती दिवस पुरणार अन उरणार ? उद्या परवा लवकरंच शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे असेच उभा रहातील. अनेकांची आयुष्याची पुंजी खर्ची घालून शेवटी अमितेची ढोंगी भूक शमवण्याकरताचा निरर्थक खर्च म्हणजे पुतळे, स्मारके...
शेवटी हेही तितकंच खरंय की महापुरूषांचे विचार त्यांना मोठे करून गेले. फुटातली दगडं त्यांच्या पायाच्या धूळीची देखील ऊंची गाठू शकत नाहीत...

गणेश सुवर्णा तुकाराम
३१ ऑक्टोबर २०१८




शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८


माझी मलाच पत्र लिहीताना...!!!

तुला तुझा मार्ग योग्य वाटतोय अन मला माझा. काहीही झालं तरी मी तु माझ्या सोबत असशील ही खात्री होतीच. अन तू कधीच माझी साथ सोडणार नाही हा विश्वास होता माझा. पण ठरलं होतं ना आपलं. अगदी काल परवा. हातात हात धरून आपण सुर्यास्त पहात बसलो होतो तेव्हा.

आपल्यात मतभेद होतील, आपण रागवू, रुसू, अगदी भांडू सुद्धा. पण काही झालं तरी पुन्हा एक होऊ. मग का असा वागतोयस. खरेपणा आपल्या एकत्र जगण्याचा आत्मा आहे. तिथेच तडजोड करायची वेळ आली की संपलो ना माझ्यातला मी. नाही का मी नाराज होणार? नाही का मी माझं म्हणणं तुला पुन्हा पुन्हा सांगणार.

खरं आणि खोटं असे करकरीत दोन भाग नसतात आयुष्यात. ते एकमेकात मिसळलेलं असतं अनेकदा.

दूध आणि पाणी देखील मिसळलेलं असतंच की, पण तरी ही राजहंस ते वेगळं करतोच ना. अनेकदा कठीण प्रश्नांची उत्तरं देताना तू राजहंस झालाय.

एका गोष्टीवर आपली मतं वेगळी आहेत. आपण त्याचा आदर राखू शकतो. पण ती मतं एकमेकांच्या विरोधी असतील तर.? ते सगळं विसरून आपण आयुष्यात काहीच नाही करू शकत. कारण तो विचार म्हणजे आपण. त्याला पूरक गोष्ट असती तर आपण स्विकारली असती.

दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत हे जसं खरं आहे तसं दोन विभिन्न विचारांना घेऊन आपण पुढे वाटचाल करू शकत नाही. शेवटी काय तर आपला आतला आवाज काय सांगू लागलाय हे महत्वाचे. तो कधीच खोटं बोलत नाही. भावनिक होऊन गुंतून पडत नाही. तो केवळ स्वार्थी असतो. अन केवळ आपल्या भल्याचाच विचार करतो.

आधी मी अर्ध्या रस्त्यात आलो तरी कळायचं की मी आलोय. विचारांसह तुझी चालण्याची लय सुद्धा बदलली आहे. नाही पटली ओळख.

पण तू तर पुर्ण पणे माझाच आहेस. सुरवातीपासूनच आपण आपल्या माणसांना नाकारत असतो. स्वतःच्या आयुष्याला स्वतःच घडवायचं असतं. असं कुणी हताश झाले की मला राग येतो. दुसर्‍यानं काय केलंय यापेक्षाही मी स्वतः सर्व पूर्ण केलंय का हे खूप महत्वाचं.

गणेश सुवर्णा तुकाराम
२७ ऑक्टोबर २०१८



गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८


माझी मलाच पत्र लिहीताना...!!!

कवी ग्रेस यांनी एकदा म्हटलं होतं की, कवी हा निश्चितपणे समाजाशी बांधलेला असतो. पण तो समाजधार्जिणा नसतो तो समाजशील असतो. त्यामुळे जरी कुणाला पटलं नाही तरी मी ठाम रहाणार माझ्याच विचारांवर. मी बोलत रहाणार माझ्या विचारांनीच अगदी जगाच्या अंतापर्यंत. कवीचं लिहिणं म्हणजे एक स्वयंभू झरा असतो त्याचा प्रवाह एका विशिष्ट विचारांच्या प्रभावाखाली चालू असतो. त्याने फक्त वहात जावं कारण आपला मार्ग निश्चित करणे त्या झऱ्याच्याही हाती नसतं. मग कवीचं लिहिणं त्याला कसं ठरवता येईल .? वागणं तर मोठ्ठं प्रश्नचिन्हंच.

जे मी आज बोलतोय त्याला किंमत कदाचित नसेलही, पण उद्या ते तसंच घडणारं हे निश्चितंच. उद्याचं सत्य डोळ्यांना दिसून न दिसल्यासारखे करताही येईल. पण पण सत्य बदलणार नाहीच मुळी. कशात तरी मी नसणं , म्हणजेच कशाचं तरी मी भाग नसणंच असतं कायमचं.

मी नाकारतो धर्माला. मी कचऱ्यात फेकतो जातीला. मी जाळून टाकतो प्रथा, रूढी, परंपरांच्या जळमटांना. देव, ईश्वर थोतांडाला फेकून देतो माझ्या वेशीबाहेर. कारण या कशाचाही मी कधीचं भाग होऊ शकत नाही. जाती, धर्म, देव अन त्यावर आधीरीत सण उत्सव माझ्याकरता कालही नव्हते, आताही नाहीत अन पुढेही नसणार. जाती, धर्म, देव अन त्यावर आधीरीत सण उत्सव ही जळमटंच. याबाबती कुणी नालायक म्हणत असेल तर मी कालपण नालायक होता, आजही आहे अन उद्याही तसाच नालायक असेल.

आपल्या लोकांकडून किंवा लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी एकवेळ चालतं. पण  आपल्या आपल्याकडून  असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की मग मात्र सगळ्यात जास्त त्रास होतो !!

मी कालही बरोबर होतो, आजही आहे अन उद्याही रहील. माणसाने स्वतःच्या नजरेत कायम बरोबर असावं.  बाकी कुणाला काय वाटतंय देणं ना घेणं. कुणाच्याही आनंदाकरता चुकीच्या गोष्टी स्विकारणे अन पाठीशी घालणे योग्य नाहीच. चुक हे चुकंच असते, आपल्या माणसाकरताही ते बदलत नाहीच. माझ्या आयुष्याच्या वर्तुळात उरणार नसेल भले कुणीच. मी कायम टिकून असेल तेव्हाही एकटाच. मावळतीच्या सूर्याला न्याहाळत नवी पहाट होण्याच्या आशेच्या किरणाकडे.

अस्त होईल माझा.
अंतही होईल माझा.
पण तोपर्यंत मी बोलत रहाणार
माझ्याच विचारांनी.


गणेश सुवर्णा तुकाराम
२५ ऑक्टोबर २०१८



सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८


आदर करणे अन स्विकारणे....
आदर करणे अन स्विकारणे यात तितकाच फरक असतो जितका कानाने ऐकून समजण्यात अन मिटलेल्या पापण्यातून उमजण्यात. भावनांचा आदर करणे, विचारांचा आदर राखणे हे बोलताना काहीच बंधन वाटत नाही. परंतू प्रत्यक्षात ते काटेरी बंधन मनाचा मोठेपणा भेदून आपल्याला विव्हळणं देऊ शकतं.
विचार अन कृती समांतर असू शकत नाही तर समरुप असावी वागते. दोन समांतर रेषा कधीच एकमेकांना भेटत नसतात. अन त्याच रेषांना लंब काढला तर तो छेद देत प्रवास थांबवतो. पण त्याच रेषा परस्परांना विरोधी दिशेने वाटचाल करणाऱ्या असल्या तर लंब फक्त मार्गदर्शक ठरतो...
स्विकारणे अन आदर राखणे हा अशा लंब असणार्‍या रेषा आहेत. म्हणूनच आदर राखणे अन ठेवणे या पेक्षा समर्पण हा समतोल साधतो. समर्पण म्हणजे आदर राखत स्विकारणे. माणूस आहे तसा स्विकारणे तसं कठीणं काम. पण समर्पण असेल तर अशक्य काहीच नाही. आयुष्य म्हणजे वर्तूळ अन समर्पण ही त्याची स्पर्शिका. जगण्याच्या परीघाला स्पर्शून जाणे म्हणजे समर्पण अन हा आयुष्याचा प्रवास फक्त याच करता असतो.

गणेश सुवर्णा तुकाराम
२२ ऑक्टोबर २०१८



शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८


अजून एक झालेला थांबा...!!!

खूप दिवसांनी असा भरभरून आनंद देणारा अन खळखळून हास्य फुलवणारा Weekend गेलाय. कॉलेज संपून आता वर्ष उलटली तरी नाती तशीच निरागस अन आहेत. त्या सर्व मित्रांना पुन्हा भेटून त्या तशाच गप्पा मारता येतील का असा प्रश्न घेऊन काल घराबाहेर पडलो होतो.
A friend is someone who gives you total freedom to be yourself.
There is nothing better than a BEST Friends

दरवेळी येतो म्हणून भेट झाली नाही म्हणून अचानक ठरवलं, चाललोय तर जाता जाता भेटू म्हणून मध्यरात्री मेसेज केल्यानंतर प्रतिसाद येईल का हा प्रश्न होताच मनात. पण दहा मिनिटे गेली नसतील की भाऊ हजर. राहूल ने मी केलेल्या मेसेजला उत्तर दिलं अन शिरूरवरून घरी जाताना अजून एक थांबा झाला कायमचाच.

राहुल अबोलीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच भेटलो आम्ही. अन तेही घरी. पुणेकर झालाच तो शेवटी. आष्टी (बीड) वरून अहमदनगर अन पुणे असा तीन जिल्हांचा झाला. सकाळी घरी पोहचून पाणी पीत नाही की, अबोलीचा पहिलाच बाऊंसर.

“लग्न कधी करतोएस. ?

तसा हा प्रश्न मला आता नवखा उरलाच नव्हता. आणि त्यातही अंपायराच्या भूमिकेची सवय असल्याने चाचपडत वेळ मारून नेली. अबोलीची लवकरंच इच्छा पुर्ण व्हायची दिसतेय. कारण संपुर्ण दिवसभर भेटेल तिथे हाच विषय होता. बहुतेक तिच्या घरी खाल्लेल्या पोह्यानंतर आता फक्त लग्नाचेच पोहे खातोय बहूतेक. मला पुढे जायचं होतं म्हणून जेवायला थांबलो नाही. आता चहाने गोड झाला तरी पुढच्यावेळी नक्की जेवायला येईल. काका, काकूंची भेट पण व्हायचीच होती बहुतेक. तिही त्या दोघांच्या लग्नानंतरच. राहुलसोबत कामामुळे नाही जमलं फार बोलायला. पण तो भेटलास हेच खुप झालं. मनापासून धन्यवाद. राहुल आणि अबोली. आणि एका गोष्टीकरता राहुल आभारी आहे. मी येतोय म्हणून एक दिवस जरा लवकर उठलास.
😊😊😊

संतोष भाऊ कायम खळखळून हसवतोस तू. भेटला तेव्हा तब्बेत बरी नव्हती. काळजी घे जरा. अजून बरंच हसायचंय भाऊ. आणि तू कितीही म्हणाला तरी कवितेची वही संपली असेल पण थांबली नक्कीच नसेल. कदाचित आता पहिल्यासारखे निमित्त राहीले नसेल बस्स एवढंच. गौरी अजून आपली फारशी ओळख नसल्याने बोलणं झालं नाहीच. त्यात संतोषची तब्बेत बरी नसल्याने फार नाही जमलं बोलायला. पण तरी एकदोन पंच झालेच. तसा मी चहा कॉफी फारशी पीत नाहीच. पण कॉफी नाही टाळता आली. गौरी आणि संतोष मनापासून धन्यवाद.

अबोली, गौरी तुमचे नवरे काही वाढणार नाहीत अन मी कमी पण होणार नाही. यात बदल अशक्यच दिसतोय. संतोष, गौरी, अबोली, राहुल पुन्हा एखाद्या निवांत संध्याकाळी भेटू. जमवू परत तीच आपली मैफील.

घाई होती म्हणून लवकर निरोप घेतला. निरोप तसा खुप महत्त्वाचा शब्द दोघांसाठी देणाऱ्यासाठी आणि घेणाऱ्यासाठी सुद्धा. कारण देणारा देतच असतो आणि घेणारा घेतच असतो. कारण निरोप त्यांना द्यायचा असतो जे जाणार असतात. खरतरं निरोप हा निरोप नसतोच मुळी. पण आपली माणसं कुठे आपल्या पासून दुर जात नाहीत किंवा आपण त्यांच्या पासून दुर जात नसतो. कसं असतं ना जीवनाचा हा प्रवास अखंड प्रवास कायम सुरूच असतो.

नुकताच आपल्या गप्पातील नाना सोबत आज फोन झाला. खूप खूप बरं वाटलं. अंगावर जबाबदारी पडली की माणूस आयुष्य घडवत जातो. कुठं नेवाश्यावरुन आलेला तो अन कुठं आज फोनवर बोललेला मुंबईकर झालेला तो. परिस्थिती माणसाला घडवते, शिकवते अन पुढे घेऊन जाते. पिल्लू असतं पिल्लू, लहान असतं तोपर्यंत काहीही करतं. वाट्टेल ते अन तसं वागतं. तेच पिल्लू कालांतराने मोठ्ठ होतं, त्याला पडलेल्या जबाबदार कळायला लागतात. आता पिल्लू कधीच मोठं झालंय, पंख पसरून आकाशी आपली झेप घेतंय. एक फोन होतो अन दहा वर्षांचा काळ चटदीशी डोळ्यासमोर तराळून जातो. मनापासून धन्यवाद. नाना


खरंच कसे होतो ना आपण.
अन आज.?
इतका बदल.?

बिघडलो आहोत का आपण अशी शंका वाटणारे आपण आज आपापल्या आयुष्यात आनंदी आहोत हेच खुप आहे. अजून काय हवं आयुष्याकडून. आजचे अन आठ दहा वर्षापुर्वी असणारे आम्ही सगळे आठवलं की हा इतका बदल जाणवतो. तेच जुने आपले मित्र भेटले की भरून पावतं. कारण मित्र कधीही अन कसेही भेटले तरी आनंदच देत असतात.
ते जूने दिवस आठवले की खळखळून हसत मन भरून येतं.

लवकरंच पुन्हा एकदा सर्वजण भेटू.
पुन्हा त्याच कॉलेजच्या गप्पा.
असंख्य आठवणींची उधळण.

आजारी असतानाही संतोषसह एक सेल्फी...

मी येणार आहे म्हणून लवकर उठला तरी किती फ्रेश आहे राहुल.....



गणेश सुवर्णा तुकाराम
२० ऑक्टोबर २०१८



मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८


#MeToo – गरज तुमची आमची मानसिकता बदलण्याची



#MeToo वर गरळ ओकणं, विनोद करणं, अन खाली दिल्यासारखे जावाईशोध लावणे सुरुच आहे. #MeeTo चळवळीवरून रोज सोशल मिडिया वर ढीगाने जोक्स चा पाऊस पडतोय.

काय तर म्हणे “#MeToo मोहीमेचा उद्या कदाचीत खाजगी व्यावसायिक किंवा उद्योजक आपल्या कंपन्यांमध्ये महिलांना रोजगार देण्याचं टाळायला लागेल.. तो विचार करेल नकोच ती भानगड, आपण आपले पुरूष कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवू.
भविष्यात दहा पंधरा वर्षानी नसते उपद्व्याप व्हायचे....

#MeToo सारख्या चळवळीची आवश्यकताच का पडतेय याकडे कधी लक्ष देणार ही मंडळी. स्वतःचं घर पेटल्याशिवाय ठिणगीची आग होऊ शकत नाही हे लक्षातंच येणार नाही का...?
कामधंद्यापेक्षा ही स्त्रियांचा आदर सन्मान महत्वाचा. अन भविष्यात भारतीय व्यावसायिक किंवा उद्योजक आपल्या कंपन्यांमध्ये महिलांना रोजगार देण्याचं टाळायलाच सुरवात केलीच तर ती त्यांच्या खुज्या मानसिकता अजुन काय करू शकते....? कारण परदेशी कंपन्या आपली यंत्रणा कार्यान्वित करून स्त्रियांच्या सुरक्षिततेकरता प्रयत्न करत आहेत. भारतीयांची विक्रुत मानसिकतेला #MeToo ने धक्का बसलाय हे नक्की...



प्रत्येक वेळी महिलांशी संबंधित मुद्दा हा विनोदाचा अन विरोधाचा का होतो. महीलांची चळवळ पुरूष प्रधान म्हणण्यापेक्षा पुरूषसत्ताक असणाऱ्या समाजाला सुरूंग लावते म्हणून..? हे आजचे नाही. सतीच्या प्रथेवर बंदी घातली तेव्हा ही विरोधंच झाला. विधवापुनर्विवाह असो की महिलांना शिक्षणाची दारं उघडली गेली प्रत्येक वेळी हा पुरूषसत्ताक समाज विरोध करत राहिला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नाही. महिलांना राजकारण,  नोकरी शिक्षण आरक्षण द्यावे लागले ही त्याचीच प्रचिती. आरक्षणाने परिस्थिती आमुलाग्र बदल होत नाही हे खरं असल तरी कासवाच्या गतीने बदल होतोय हे नक्की.

सध्याच्या परिस्थितीत महिला सुरक्षितेबाबतीत भारतीय लोकांची मानसिकता ररसातळाला गेली आहे इतकी खालावली आहे. स्त्री भ्रूण हत्या बंदी करता भारतीयांवर कायदा लादवा लागतो ही शरमेची गोष्ट आहे. चार चार वर्षाच्या चिमुकल्यांपासून ऐंशी वर्षाची वृद्ध महिला देखील आज तेच भोगतेय.  विनयभंग, बलात्कार, लैंगिक शोषण संबंधित बातमीशिवाय रोजची सकाळ उगवत नाही. कुठेतरी प्रतिक्रिया म्हणून मोर्चे काढले जातात. आरोपींना अटक होते. पण पुरूषसत्ताक समाजाच्या मानसिकतेचं काय..? त्याकरता काय प्रयत्न केले जातात.?

महिला म्हणून फक्त पुरूषाची वासना शमण्याची सोय अन अपत्य निर्माण करणारं यंत्र ही विचारसरणी कधी बदलणार...? रस्त्यावरून चालणार्‍या महिलेकडून बघून खवळणारी विकृत मानसिकता कधी अन कशी बदलणार...? शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नुसती नावं घ्यायची अन कल्याण च्या सुभेदाराचं उदाहरण फेकण्यापलिकडं आपण काय करतोय..? कुठेही चर्चा रंगताना महिलांसंबंधित अश्लाघ्य भाषा का निघते. कुठेतरी विचार व्हायला हवाच. कायदे करून गुन्हेगारांना शिक्षा होते. चळवळीतून गुन्हे उघडकीस येतात. परंतु या सगळ्याच्या मुळाशी जाऊन गुन्हांच घडू नये या पेक्षा तशीच मानसिकतांच तयार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मी आजवर अनेक मैत्रिणींकरता दादा झालो. भाऊ झालो. मित्र झालो.  गरज पडली तिथं पाठीशी उभा राहिलो. अनेकांना समजावलं प्रसंगी कित्येकांना मारलंही असेल. प्रत्येक वेळी ती सोबतची व्यक्ती ही माझी मैत्रिण, बहीण, मावशी, आजी झाली. तिथे आदर उभा राहिला. कारण समाज अन संस्कृती मी माणूस म्हणून जगतोय. म्हणूनच आजही #Meeto वरून विनोद होताना पाहून चीड येतेय.

जो पर्यंत समाज अन संस्कृती म्हणून लोकांची मानसिकता बदलत नाही तोवर #Meeto सारख्या कितीही चळवळी उभ्या राहिल्या अन महिला सुरक्षेचे कायदे केले तरी परिस्थिती तितकी बदलेल वाटत नाही. फक्त एक होईल की थोड्याफार प्रमाणात का होईना अटकाव लागेल.


गणेश सुवर्णा तुकाराम
१६ ऑक्टोबर २०१८



सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८


मला भेटलेला आनंदयात्री – महेश जाधव
 


आजही तो दिवस तसाच लख्ख आठवतोय. जसा तो लकाकणारा तारा आहे. डोमेन नावचं भूत तेव्हा डोक्यावर गाजत असताना इंटर्नशीपला असाच डोमेन असणारा एक नवा मुलगा दाखल झाला होता. डोमेन म्हणजे थोडक्यात अनुभव असणारी अशी त्रोटक व्याख्या आमच्या मनात होती. परंतु त्या मुलाचं सुरवातीच्या दिवसात एस ए पी या नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्याची धडपड पाहूनच कळंलं की डोमेन असणारी माणसं आपल्याला या क्षेत्रात कशी पाचोळ्यासारखी भिरकावून लावतील. महेश जाधव नावाची ही हस्ती समोरून हसऱ्या चेहऱ्याची दिसत असली तरी ती तितकी सोपी अन सहज नसणार याची खात्री तेव्हाच झाली.

तो आला, वातावरणात सामिल झाला अन वातावरणाचाच भाग बनून गेला. सुरवातीला आम्हाला एस ए पी या नव्या क्षेत्राची वाटणारी भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तो एक धैय्य घेऊनच आला होता की ज्याचा आमच्यात अभाव होता. ओळख झाल्यानंतर हळूहळू बोलणं वाढलं. एकूण एस ए पी विषयी असणारी बरीत गृहीतकं लक्षात आली. तो ऑफिसमधल्या सगळ्यांना धरून खोदून खोदून विचारत एस एपी ची जोरदार अभ्यास करत होता. दरम्यानच्या काळात ऑफिसमधे डमी प्रोजेक्ट सुरू झाला होता. तो आमचा क्लायंट होता. त्याने एकूण चर्चेदरम्यान अशा काही गोष्टी करून मागितल्या की चर्चा कमी अन हमरीतुमरीच होत होती. डोमेनचा काय परिणाम होतो हे तेव्हा जवळून पाहिलं. नंतर तो प्रोजक्टही बारगळला. अन मी तिथेच ट्रेनिंग सेंटरला एस डी शिकून जॉईन झालो.

क्लायंट-कन्सलटंट, ज्युनिअर-सिनिअर मधून आमचा प्रवास मैत्रीच्या प्रगतीपथावर सुरू झाला होता. ट्रेनिंग सेंटरला जॉईन झाल्यापासून मग रोज नवीन काही शिकण्याकरता दिवस दिवस आमची चर्चा रंगायची. अगदी पैजा लावून काही गोष्टी शिकत होतो. एस ए पी सारख्या नवख्या क्षेत्रातही सुरवातीला वाटणारा बेरंग महेशमुळे पुन्हा रंगछटेत बदलला. नव्या क्षेत्रात पाऊल टाकताना आपण कसं झोकून द्यायचं हे त्याने शिकवलं. एस ए पी सारख्या नवख्या क्षेत्रात आज टिकून आहे यामागचं एक कारण महेश जाधव ही व्यक्ती आहे हे नाकारू शकत नाही. कारण नवख्या क्षेत्राचा आनंद घेत आपलं काम कसं करायचे याची प्रेरणा देणारा तोच. म्हणूनच एस ए पी सारख्या नव्या क्षेत्रात अनोळखी वाटेने प्रवास करताना भेटलेला तो एक आनंदयात्रीच आहे.

नोव्हेंबर नंतर तो मगरपट्टा ऑफिसला गेला आणि आमची रोज होणारी भेट संपली. आमची मैत्री घट्ट होत होती. त्यात अजून दोन वाटेकरीही झाले होते. आशिष मोगल आणि वैभव जाधव. चार मित्रांची ही जोडी घट्ट मैत्रीच्या बंधाने बांधली गेली होती. नंतर काही दिवसात त्याला गुजरातला पाठवल्याने आमची भेट झाली नाही. अधूनमधून काही कामानिमित्ताने पुण्यात आला तर तो भेटत होता. क्लायंट साईडला आलेले विविध अनुभवांवर रोजच्या गप्पा रंगत होत्याच. कालांतराने मीही मगरपट्ट्यात गेलो. परंतु गुजरातला असल्याने आमची भेट झाली नाही. आणि त्यात जिएसटीचं भूत मानगुटीवर बसल्याने मीही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतो. ऑफिसची कामं चालूच राहिली. आमच्या गप्पाही चालूच राहिल्या. वास्तवातली अंतर वाढली, बदलली. पण आम्ही मित्र म्हणून कायम टिकून राहिलो.

आमची मैत्रीला खऱ्या अर्थाने पालवी फुटली ती जीएसटी संपल्यावर मगरपट्टा ऑफिसला आल्यावर. बसायलाही शेजारीच जागा. त्यामुळे दिवसभर एकत्रंच. रोज नव्या विषयावर गप्पा रंगत. मैत्रीच्या वटवृक्षाला पारंब्या यायला सुरवात झाली होती. आमच्या गप्पांचा विषय दोन वर्षात कधीच बदलला नाही. तो कायम एस ए पी वरंच राहिला. त्यामुळे अनेकदा एस ए पी सोडून बोलणार असलो तर भेटू असं बोलून अटीवर भेटायचो. अगदी युरोपाचं इंप्लिमेंटेशनला जाईपर्यंत हे असंच सुरू होतं. काळ जसा जसा सरतो तशी नाती घट्ट होत जातात. नात्याचा मुरांब्याची चव काय असते हे वेळोवेळी अनुभवले आहे.

गेले काही दिवस झालं आमच्यात काहीतरी बिनसलंय. तसा आमच्यात चिडावं रागवावं असं काहीच घडलं नाही. तसे आम्ही आजही मित्र आहोतंच. जसे काल ही होतो. आपण आपल्या जागी योग्य असू ही पण चुकलो होता हे स्विकारलंही पाहीजे. थोडासा अबोला आहे अन त्यात दुराव्यानं आपलं फावून घेतलं बस्स. मुळात हा दुरावा, अबोला ही मीच माझी परीक्षा घेतोय. माणसांनी एकदा मनात जागा निर्माण केली की ती इतक्या पटदीशी पुसत नाही. फुंकर मारली की धूळ उडून जावी. मतभेद नक्कीच आहेत. मनभेद.? अजून तरी तसं वाटत नाही. आशा आहे. चार महीने झाले असाच काही मित्रांचा कायमचा निरोप घेतला. अनोळखी होण्यासाठीच. आजवर या परीक्षेत चांगलं यश मिळाले आहे. आता हीसुद्धा तशीच परीक्षा. पुन्हा तेच बंध जोडणे कठीणंच. अशक्य मी कधीच मानत नाही. स्वतःचं आत्मपरिक्षण माणसाला कणखर बनवतं. शेवटी चुकलेल्या सेल्फी डिलीट कराव्यात इतकं सोपं नसतं आयुष्य !!!

कारण आपलेपणा बोलण्याइतकाच न बोलता जपायलाही लागतो. नक्षीदार जाळीसाठी कुरमुजण्याकरता आडपदर करून झाकलेलं आणि आठवणीतले फोटोही काढता न यावे इतके अवघडही नाही ना आयुष्य. चार मित्रांची गोष्ट खरंतर संपणार नाहीच आहे. पण मग ती गोष्ट ठरणारंच नाही ना...? व्यक्ती गेल्याचे दुःख अधिक नसते तर स्वतःला लागलेली त्या व्यक्तीची सवय मोडण्याचे दुःख अधिक असते. ही दोस्ती तुटायची नाही म्हणूनही लक्ष्याला निरोप घ्यायलाच लावायचाय का शेवटी....? असं नातं अर्धवट राहिलं की रूखरूख लागून राहते. तेव्हा वाटतं, मन अडकूच नये कशात. ब्लॉकमधला मोबाईल क्रमांक सहज निघेल पण मनाचं काय.? मित्र या शब्दाची व्याख्या अजून त्याची पक्की झाली नाहीय पण म्हणून तूर्तास फक्त परिचित म्हणूनच राहिलेला बराय का...?

जुना कॅसेट चा टेपवरून कधी गाणी ऐकताना मधेच कॅसेट अडकली तर गाणी थांबवतो आपण अन काढून धूळ पुसून पुन्हा पहिल्यापासून सुरू करतो. आताही तसंच करयाचं ठरवलं होतं मी. फुलस्टॉप द्यायचा. अन पुन्हा पहील्यापासून सुरवात करायची. कदाचित नवीन काही मिळेल. टाइम प्लीज. बहुतेक म्हणून उमेश कामत आवडत असेल. टाइम प्लीज, आयुष्य खूप छोटं आहे. काही वेळा मोकळा वेळ जाऊन द्यावा लागतो. तो पर्यंत त्याची मनातली जागा तशीच. अनोळखी होऊ पण नाती ताजीतवानी होतील. मलाही माहीतेय इतक्या सहज कोणतेही नाते कधी रिस्टार्ट करता येतं. पण आमच्या टेपरेकॉर्डरच्या कॅसेट मधे कधी धूळ इतकी वाढलीय की कॅसेट पुसायला गेलो तर ती खराबच होईल की काय म्हणून भीती वाटतेय.

प्रत्येकवेळी भांडून वेगळेच व्हायचे असा काही नियम असतो का ? प्रत्येक वेळी संयमित राहणं प्रत्येकालाच शक्य नसतं मान्य. पण काही घटना संस्मरणीय असतात तर काही विस्मरणीय असतात. बऱ्याच वेळेला आपण काहीतरी चुकीचे करतोय अशी जाणीव आपल्याला होते ना. टाळता येणाऱ्या गोष्टी टाळता येतात, पण न टाळता येणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत हे कळतंय. कारण गुंता सोडवण्याचा त्रास होत नाही, विनाकारण गुंतल्याच दु:ख होतंय. माणसांच्या जीवनात नेहमीच नवीन नवीन घटना घडतात. म्हणूनंच या सगळ्याच्या पलीकडचं सत्य स्विकारलंय मी.  चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य याच्याही पलीकडचं.

काही वेळेस नात्यांशी आपण जितकं लवकर जुळवून घेतो तितकंच लवकर त्यांना निरोप ही द्यावा लागतो. मनात नसूनही निरोपाची वेळ फार लवकर येते कधी कधी. असंच काहीसं. हो पण पहिल्या दिवसापासून असं नसतं, हळू हळू ते नातं तयार होतं. नातीही काही शी अशीच असतात ना. प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काही शिकवतात, अनुभुती देतात. पण एखादी गोष्ट या आधी कधीच झालेली नाही याचा अर्थ ती कधीच होऊ शकत नाही असा होत नाही. पण त्यावेळी परिस्थिती आणि आपली मनस्थिती त्या जाणीवेपेक्षा मोठी अन महत्वाची ठरते.

हक्क नि जबाबदारी यांच्या गणितात न अडकता दूरावा, अंतर काही वाढलं तरीही जागा ती अन तशीच राहिल. नाती टिकवायची असतील, तर आणखी एक गोष्ट आपल्या मनाला शिकवायला हवी. खुपदा भांडला. चिडलाही अनेकदा तो. प्रत्येकवेळी तो तसाच वागला अन वागतंच राहीला. पण मतभेद हा भांडणाचा १० टक्केच भाग असतो, बाकी ९० टक्के भांडण हे ते मतभेद मांडले कसे जातात यावर उभं असतं लक्षात घ्यावं त्याने. 'जुन्याच गोष्टींचा काथ्याकूट न करता बदल स्वीकारावा. तेव्हा 'तसं' वागणारी व्यक्ती आता 'असं' वागू शकते, माणसात नित्य बदल घडतो हे लक्षात घ्यावं.

सगळ्या इच्छा, अपेक्षा, हेवेदावे, मतभेद, मनभेद मागे सोडून आपण जे आहोत तसे राहता येईल असं नातं बनवू. प्रत्येक नात्याला त्याचा वेळ दिला गेला, मनमोकळं बोलता आलं, तर ते नातं छान बहरून येईल. खरंतर हा फरक फक्त वस्तुस्थिती आणि आपला दृष्टीकोन मिळून ठरवत असतात. आपली सोबत, साथ कायम राहील. अगदी कायम. अनोळखी असेल किंवा मैत्रीचंही. काळ वेळ जे जे चुकले होते वाटतंय तेच प्रत्येक ठरवेल.

माणसाने माणसासारखंच चुकत चुकतंच जगावं, यंत्रासारखी कृत्रिम अचूकता जगणं निरस करते. भावनांच्या आहारी न जाता आपलं मत व्यक्त करणं आणि दुसऱ्यालाही तसंच स्वीकारणं हे कौशल्य आपल्यात आलं, तर आपण नक्कीच हे नातं टिकवू शकतो. आणि हो कधी कधी आपण सगळे सगळेच आपल्याजागी बरोबर असतो, कधीकधी इतर सगळे त्यांच्याजागी चुकलेले असतात. मैत्रीत शिकावं, शिकवावं. एकमेकांना समजावून घ्यावं. खुल्या मनानं कौतुक करावं, चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं. अन आपलं काहीतरी चुकलंय हे मान्यही करावं. मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक संजीवन नातं असावं.! त्याने कधी त्याचं मत सांगितलं नाहीच.

खरंतर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं. विश्वास म्हणजे मैत्रीचा श्वास. नेमकं हेच त्याला कधी कळलं नाही. पण एक खरंय की त्याच्या मनात काहीच रहात नाही. तो चालतच राहीला. आपल्याच ढंगात अन आपल्याच रंगात. आताही त्याला काहीच फरक पडला असेल वाटत नाही. तो तसांच आहे हे सत्य आम्ही स्विकारलंय. पण आम्ही आम्हीच आहोत तो कधी स्विकारणार. उथळ पाण्याच्या खळखळाटासारखा तो कायमंच स्फुरतंच असतो. म्हणूनंच मैत्रीच्या नात्याच्या खोलीचा ठाव त्याला कधी लागलाही नाही लागणारही नाही.

“किती भांडलो आपण, वाद घातला आपण, कधी कधी तर अगदी प्रमाणाबाहेर. पण ये Sorry. माफ कर. वाटतं यापुढे कधीच भेटणार, बोलणार नाही. हा पण पण ना सगळा घोटाळा करून मोकळा होतो. असतात थोडे फारच रुसवे फुगवे. पण.? पण तरीही राहुन राहुन पुन्हा सगळं विसरून त्यादिवशी एक फोन आला की ते दोन शब्द आपण लगेच बोललोच ना. आपण दोघेही आपापल्या जागी योग्य आहोत. चुकली वेळ, चुकला क्षण, चुकला प्रसंग. तो चुकला नाही ही खात्री आहे मनात. कारण आपण एकमेकांचे स्वभाव चांगले ओळखतो. खरंतर हे सगळं मुळीच अपेक्षित नव्हतंच. कारण आपल्याला जी लोकं आपल्या आयुष्यभर सोबत राहावी अशी वाटतात. त्यांना सोबत राहाण्यासाठी कारणे ही आपोआप मिळतात. तू तर मला भेटलेला आनंदयात्री. गैरसमज असतील नव्हे आहेत. जेवढ्या लवकर संपतील तितक्या लवकर ही आनंदयात्रा पुन्हा सुरू होईल. आशा आहे लवकरंच हे सगळं संपेल.”

प्रश्न अनुत्तरित असेल.
का.? कुणी.? अन कसं.?
पण हो उत्तर खूप सोप्पं आहे.
ह्रदयातून फक्त रक्त वहातं,
मनात रहातात माणसं....


वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा महेश.

चार मित्रांची गोष्ट

B4 - AVMG

भाऊ असाच हसत रहा फक्त....






गणेश सुवर्णा तुकाराम
१५ ऑक्टोबर २०१८



गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

निरोपाचे प्रेमपत्र

तू गेल्यानंतरचा तसा इथला पहिलाच दिवस
पण आज खूप एकटं जाणवलं...
ती खुर्ची आजही तशीच रिकामी राहील असंच वाटलं होतं.
तू नसताना त्यात कुणालाच पाहिल नव्हतं...

पण सकाळी आश्चर्याचा धक्काच बसला...
अन ती खुर्ची पावन झाली होती.
एका आनंदयात्रीची जागा दुसऱ्यानं घेतली
भरभरून आनंद झाला.

इतक्या दिवस बाजूला पडलेला बापमाणूस
आज आपल्यातला होऊन गेला होता.
तसा तो कायम आपल्यातलाच होता.
एक जागा काय अन खुर्ची काय बदलू शकत नव्हती...

आपण आलोही असेच होतो ना
एकमेकाना पाठमोरेच...
कधी ओळख झाली अन कधी मैत्री
बदलत्या क्षणालाही कळंलच नाही...

दिवस तसेच गेले. जसे कॅलेंडरचे महिने बदलले,
पण भूर्रदिशी सहा महिने निघून गेल्यासारखं जाणवलं..
निरोपाच्या प्रेमपत्राचा तुला योग साधता आला..
आमची प्रेमपत्र लिहायला आटलेत बहुतेक शब्द...

तू म्हटलाय ना मग नक्की
येईल तोही काळ लवकरंच येईल...
मोसमात पाऊस पडला नाही तर 
परतीला न गरजताही कोसळतोच ना...

थोडी थंडगार वाऱ्याची झुळक यायचा अवकाश
तो अवचित येणार हे नक्की...
अन तो कोसळलेलाच एक थेंब
लिहीणार निरोपाचे प्रेमपत्र...

गणेश सुवर्णा तुकाराम
०४ ऑक्टोबर २०१८


सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८


प्रेमाची परिभाषा



भपकेबाज दिखावा मेकअप सारखा असतो...
थोडं काही झालं की गळून पडतो...
शेवटी निखरतं ते असतं सौंदर्य....
प्रेमाचं हे सौंदर्य त्या साधेपणातंच असतं...

कोणत्या ब्रॅण्ड ची कपडे घालता अन
कुठल्या हॉटेल मधे जेवता हे
कधीच प्रेमाची किंमत ठरवू शकत नाहीत....

प्रेम असतं हळूवार स्पर्शात...
प्रेम असतं नजरेच्या कटाक्षात...
प्रेम असतं पापण्यांच्या मिटण्यात..
प्रेम असतं उमलत्या गुलाबात...

प्रेम असतं किंचितशा स्मितहास्यात...
प्रेम असतं एकमेकांवरच्या विश्वासात...
प्रेम असतं एकमेकांना समजून घेण्यात...

तसं पाहिलं तर काहीही किंमत नसते या कशालाही..
तरीही ते अमुल्य ठरतं...
हीच असते प्रेमाच्या साधेपणाची व्याख्या
अन सौंदर्याची परिभाषा....




गणेश सुवर्णा तुकाराम
०१ ऑक्टोबर २०१८