सुहास क्षीरसागरचं लग्न...
नुकतेच एका मित्राच्या लग्नाला जाऊन आलो. अपेक्षा होती की जुने सगळे क्लासमेट पुन्हा एकदा भेटतील. पण तिथे गेल्यावर धक्का बसला. आम्ही फक्त पाच ते सहा जण हजर होतो. काहींना फोनवरून न येण्याचं कारण विचारलंही. एकमेकांच्या चर्चेतून समजलं की अनेकजण पर्सनल निमंत्रण दिले नाही म्हणून आले नव्हते, काही जण त्यांच्या लग्नाच्या वेळी हा उपस्थित नव्हता म्हणून आले नव्हते. लग्नाला येऊच न शकणारे फार थोडे लोक असावेत. बाकी काही तर लग्नाच्या स्थळापासून पाच दहा किमी अंतरावर असूनही आले नव्हते. तेव्हा एका मित्राला फोन करून हेच सांगत होतो की, काम प्रत्येकाला असते. अडचणी असू शकतात. पण आपल्याला शक्य होत असेल तर केवळ आपल्या इगोमुळे एखाद्या ठिकाणी येणे टाळणे उचित नाही. तेव्हा प्रत्येकाला हेच सांगायचे होते. माझेच म्हणणे मांडणारी ही अप्रतिम पोस्ट वाचनात आली. तीच पोस्ट माझ्या मित्रांकरता...
"माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो. अचानक तोल गेला. कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही. सोडुन द्या हो! सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल. सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं. तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे..."
गणेशदादा शितोळे
(२१ एप्रिल २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा