माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २२ जुलै, २०१८


त्यादिवशी लिहायचे आयुष्याला निरोपाचे प्रेमपत्र...!!!


                    एसएपीत आल्यापासून एक गोष्ट मला कळत गेली की मी ज्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा प्रयत्न करतो आहे त्या क्षेत्राचं 'इंग्रजी संभाषण' हे अविभाज्य अंग आहे. अन नेमकं मला तेच पचवणं खूप अवघड गेलं. कारण तुम्ही मराठी माध्यामात शिकला असाल तर तुम्हाला इतर भाषेत संभाषण कशाला लागतं असं मला वाटायचं. पण या क्षेत्रात असं नाहीये.
                    इथे तुम्ही एक्टिव असलं पाहिजे, तुम्ही सतत नवनवीन शिकत असलं पाहिजे, तुमचं इंग्लिश चांगलंच असलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, तुमची वेशभूषा अ‍ॅट्रॅक्टीव्ह असली पाहिजे. आणि यातली कुठलीही गोष्ट माझ्याजवळ नव्हती, आजही बहुतेक नाहीच. कारण या सगळ्यात तुमच्या बाहेरच्या ब्रॅंडवरून तुमची ओळख ठरते. अन मी नेमकं ब्रॅंड नसणाऱ्याच गोष्टी वापरण्याचा अट्टहास करतो नव्हे तर पाळतोही.
                    कुणाचं लक्ष वेधून घेण्याकरता नव्हे तर शरीर झाकण्याकरता वेशभूषा असते. त्यावर ब्रॅंडच्या नावाखाली फुकटाचा पैसा खर्च करण्यात मला कधीच स्वारस्य वाटलं नाही. तुमचं इंग्लिश चांगलंच असलं पाहिजे अस असेलंही पण मला मात्र कायमच मराठी भाषाच चांगली येणार. कारण ती माझी मायमराठी आहे. अन आईहून सुंदर दुसरं कुणीच असू शकत नाही. तुमची पर्सनॅलिटी चांगली असण्याइतकंच विचार चांगले असणे खूप महत्वाचे. कारण तेच खोलवर मुरलेले असतात.
                    मी मध्यमवर्गीय, काळा-सावळाच दिसणारा मुलगा, मला कुणी गॉडफादर नाही, अन ते आवश्यक पण नाही. मी मराठी शाळेत शिकलेलो. त्यामुळे सफाईदार इंग्लिश येत नाही याची अजिबात खंत नाही. या क्षेत्रात आलो तेव्हा खरंच गोंधळून गेलो की आता काय करायचं ? असंही वाटायला लागलं की हे सगळं आपल्याकडून नाही होणार कदाचित. पण निर्णय ठाम होता की स्वतःला सिद्ध करायचं. मग त्या दिशेने हळूहळू कामं सुरू झालं अन आज इथे आहे.
                    आयुष्याच्या एका वळणावर अशी काही चांगली माणसं भेटली की त्यानंतर माझ्या आयुष्यात बर्‍यापैकी सकारात्मक गोष्टी घडत गेल्या. मला इथे असा मित्रवर्ग मिळाला की जो लहानशा गावातून येतोय आणि स्ट्रगल करतोय.
                    दरम्यानच्या मुंबई प्रवासात मी फार कम्फर्टेबल नव्हतोच. कारण मला ते खूप मेकॅनिकल वाटायला लागलं. रोजंच्या चीडचीड होण्यात मी काहीतरी गमावत होतो. म्हणूनच त्यापेक्षा आपले सहकाऱ्यांसह आपल्याला सामावून घेत कामं असतील तर ती काम करणंही आपल्याला जरा आनंददायक असतं असं पुण्यात आल्यावर जाणवलं.
                    आता सगळंच गंमतीशीर वाटतं. आज जेव्हा मी त्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा असं वाटतं की मी त्या सगळ्यातून बरंच काही शिकलो. मुंबईत आजारी पडल्यानंतर आशिष सरांच्या त्या कामाप्रती झोकून देणं ऐकल्यावर मला बर्‍यापैकी प्रगल्भ बनवलं.
                    आपण स्ट्रगल करतोय असं त्या काळात वाटत होतं, पण तो काळ निघून गेल्यावर असं वाटतं की अरे आपल्याला पॉलिश्ड व्हायचं होतं म्हणून तो मधला काळ होता. असं झाल्यावर पुढे मिळणारं यश छान ऐन्जॉय करता येतं हेही अनुभवलंच. सगळंच सहज मिळालं ना तर आपल्याला ते फारसं भावत नाही.
परिस्थिती खूप काही शिकवून जाते माणसाला एसएपीत मी आलो तेव्हा मलाच स्वतःला सावरायचं होतं, स्वतःचा आधार व्हायचं होतं. त्यामुळे मी खूप कणखर झालो. मला वेळेची किंमत कळली, पैशांची किंमत कळली. माझ्यात निर्णयक्षमता आली. मागचे दोन-चार महिने मी कामाचा खूप छानप्रकारे आनंद लुटला हे आता जाणवतंय.
                    मला जाणवत होतं की माझ्याकडे दाखवण्यासारखं तसं काहीच नाहीये, चेहरा, कपडे अन ब्रॅण्ड नाहीये; पण मला माझ्याकडूनच जोपर्यंत समाधानाची पावती मिळतेय तोपर्यंत हा प्रवास असाच सुरू राहिल. आयुष्याच्या इतक्या मोठ्या कॅनव्हासवर मी आजवर प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याचं फळही इतकं चांगलं मिळालं. अजून एसएपीचा हँगओव्हर उतरला नाहीये.
                    मला ज्या प्रकारचं काम करायचं आहे तसे हे क्षेत्र नव्हते. मला माझे छंद पुढे घेऊन जाता येणारं काम करायचं आहे. अन यात मी कधीच कामामधे कॉम्प्रमाईज केलं नाही. कारण माझ्यासाठी मी इथे आलोच नव्हतो, मला कामच करायचं होतं पण माझ्या छंदांना सोबत घेऊन. त्यामुळे यापुढेही माझा विचार हाच राहील की मला छंदांना सोबत घेऊन जगण्याच्या कॉम्प्रमाईज, अ‍ॅड्जस्टमेंट्स करायच्या नाहीत.
                    मला एसएपीत चांगलंच काम करायचं आहे. पण मी वाट बघतोय, माझ्या छंदांना जपून कसं अन काय करता येईल. सध्या तरी दोघांचा सोबत विचार चालू आहे. पण अजून तसं फायनल काहीच नाहीये. ज्या दिवशी वाटेल आता बस्सं. आयुष्याला लिहायचे निरोपाचे प्रेमपत्र. एसएपीतून छंदांसाठी वेळ द्यायला जमतोय का? हा शेवटचा प्रश्न असेल.


गणेशदादा शितोळे
(२२ जूलै २०१८)



गुरुवार, १९ जुलै, २०१८


विश्वासाला कीड...!!!

                          आयुष्याच्या प्रवासात अवचित काही माणसं भेटतात. अगदी सहज प्रेमाचा, मैत्रीचा एक बंध निर्माण होतो. काही वेळेस हि माणसं जितकं लवकर जुळवून घेतात तितकंच लवकर त्यांना निरोप ही द्यावा लागतो. मनात नसूनही निरोपाची वेळ फार लवकर येते कधी कधी. असंच काहीसं.
                          नात्यांमधे अविश्वास तयार व्हायला लागला की वेळीच सावध व्हायला लागते. अविश्वासावर आधारित नाती तशीच रेटत घेऊन जाण्यात काही अर्थ उरत नाही. वेळीच सावध होत अशा नात्यांच्या बंधनातून मुक्त झाले अन समोरच्या व्यक्तीला केले तर निश्चितच फायदा होतो.
                          सहा वर्षे झाली आमची ओळख होऊन. मित्र कसे झालो माहिती नाही. एकत्र येऊन धमाल केली. महाविद्यालयीन जीवन मनमुरादपणे जगलो. शिक्षण संपलं. नव्या नव्या वाटेने प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात निघून गेला. एकत्रित असलेला प्रवास एकटा उरला. तरीही मैत्री तशीच एकसंध होती.
                          आयुष्याच्या उंबरठ्यावर नवीन पाऊल टाकत एकेकाचे विवाह सोहळे पार पडायला सुरुवात झाली. कुणी बॅचलर पार्टी दिली. कुणाच्या नुसत्याच गप्पा झाल्या. कुणी नुसतेच पार्टीला जेवायला उपस्थित राहिले. कुणी लग्न अन पार्टीला यायचेच टाळले. पार्टीतर उपस्थिती ठरवूनही कुणी सरड्यापेक्षाही पटकन रंग बदलून गेले. विवाह सोहळा आनंदाने पार पडला. उत्साहाने सहभागी झाले. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक मतभेदाची पातळी ओलांडून अविश्वासाची पातळी सुरू व्हायला सुरुवात झाली. वाद झाले. विवाद झडले. जोपर्यंत मतभेदापर्यंत होते तोपर्यंतच विश्वासाचे नाते उरले. अन शेवटी झालाच कडलोट.
                          मैत्रीत व्यवहार उभा केला अन गमावून बसलो सगळंच. पण मैत्री या नात्यावरंच प्रश्नचिन्ह उभा राहिले अन संपला प्रवास तिथेच संपला. क्षणभरात सहा वर्षे जपलेल्या नात्यांची गाठ चटदिशी सुटली. नात्यांमधले बंध विलग व्हावेत तशी माणसे विभागली गेली. आज ह्रदयाजवळची माणसे कायमची सोडून दिली याचं किंचित दुःख असलं तरी आनंदही आहेच. सहनशीलतेचा कडलोट झाला की केवळ अशक्यच. अविश्वासाला जागा नाहीच. खरंतर तेव्हा अपेक्षित होतं मनातल्या व्यक्तीनेही कधीकाही मनातले बोलणे ऐकावे.
                          नात्यांमधे विश्वासाला कीड लागली ना नाती डळमळीत होतात. इतकी डळमळीत की क्षणभराचाही अविश्वास हा वर्षानुवर्षाची घट्ट ओल नाहीशी करून नाती कोसळतात. सहा वर्षांची मैत्री क्षणात संपली. एकदा कोसळलेली नाती पुन्हा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा रूजत नाहीतंच.
                          अनेकदा विचार केला. अनेकदा वाटलं. चूका होतात, गैरसमज असतात आणि ते हळूहळू दूर होतात. गेले अनेक दिवस वाट पाहिली, वेळ जाऊ दिला. शेवटी व्हायचा तोच कडेलोट झाला अन  वीज कोसळवी तशी नाती कोसळलीच. सहा वर्षांची मैत्री क्षणात संपली. खरंतर हा काळ जितका सुखद तितकाच अविस्मरणीय अनुभव देणाराही होता.
                          धन्यवाद भोईटे रेसिडन्सी मित्रमंडळ. विशेषतः आभारी आहे. आयटीसेल मधे भरतीच्या पात्रतेचे झाल्याबद्दलही अभिनंदन. अन तसंही आपलं आयटीसेलशी पटण्याचा दूर दूर प्रयत्न नाही. सुटलेले सोडून देत आपण चालत रहायचं. आयुष्य कुणासाठी थांबत नाही.


गणेशदादा शितोळे
(१९ जूलै २०१८)




रविवार, १५ जुलै, २०१८


दोन शब्द आपल्या माणसांसाठी...!!!

मनातल्या मनात कुढंत राहिलं की,
मनामनाला दुरावा वाढतच जातो...
मनाचा मनाशीच होणारा संवाद थांबला की,
आपणच आपल्याला त्रास देत रहातो...

आपण काय आहोत असतं आपल्याही माहित,
पण दुसऱ्याचं सांगण्यावरून ते आपण ठरवत जातो...
जगात कोण कसं आहे काय आहे बघताना,
आपण स्वत:लाच ओळखायला राहून जातो...

आपणंच आहोत आपली ती हक्काची माणसं,
ज्यांच्यासोबत आपण मनातलं बोलत असतो...
बोलताना संवादाचे वाद झाले तरी,
नात्यातले प्रेम आपण वाढवत जातो...

कधी  झोंबणाऱ्या खोचक शब्दांचाही,
मनाला खोलवर खूप राग जाणवत असतो,
धरला काहीकाळ आपण अबोला तरी,
परत नात्यात आपण पहिल्यासारखं रहातो...

आपलीच माणसं असतात ती हक्काची,
तोच प्रत्येकजण आपलं मन समजावून घेत असतो...
मानत असू आपली माणसं त्यांना तर विचार करावा एकदा,
थोड्याफार रागाने गमवावत तर ना नसतो...

सुधारत जायचं नातं तुटण्याआधी,
सांभाळायचं कसं आपलं आपण ठरवत असतो...
तुटली जावीत नाती वाटत नसतं कोणाला,
पण सुधरावेत संबंध प्रयत्न आपण करायचा असतो...

राग धरून मनात संपवला संवाद आपल्याच माणसांशीच तर,
कुढत्या अबोल्याने गैरसमज वाढतच जातो...
मग आपल्याच माणसांचही नेमके तेच ऐकू येतं,
जे आपण कधी बोललेलोच नसतो...

मित्र म्हणून तुला सांगण्यासाठी,
एव्हढेंच दोन शब्द लिहीत होतो...
मनावर घ्यायचं का सोडून द्यायचं,
निर्णय हा मी तुझ्यावरच सोडून देतो...


गणेशदादा शितोळे
(१५ जूलै २०१८)




आयुष्याच्या पुस्तकातलं एक कुरमजलेलं पान..


आज खूप दिवसांनी काहीतरी नविन लिहीत आहे. तसं पत्रच. हल्लीच्या या व्हाटसअप आणि चॅट अॅप्लिकेशनमुळे ना संवाद इतका वाढलाय असं वरवरं भासतं अन शंकाच येते की नात्यांमधला संवादच संपून गेलाय की काय. म्हणजे तो एकमेकांमधलाही आणि स्वत:शीही असणारा. स्वत:शी अशासाठी म्हटलं की कुणालाही पूर्वी पत्र लिहितांना आपोआपच घटनांची उजळणी व्हायची. म्हणजे तसा संवादच व्हायचा की स्वत:शी सुध्दा एका अर्थाने. आमच्या अगोदरची पिढी तशी शेवटचीच. कारण आमच्या बालपणात फोनची डबे घरी बसलेले होते. त्यामुळे फारसा पत्र लिहीण्याचा प्रसंग शाळेत आणि तेही विशेषकरून परीक्षेतच. पत्र लिहीताना पहिलं वाक्य मात्र ठरलेलं असायचं पत्र लिहिण्यास कारण की.?? खरंतर आता गंमत वाटतेय जूनं सगळंच आठवले की. कारण पत्र म्हणजे तसे ठरवलेला मजकूर असायचा. सुरवातीला आशिर्वादअभिंदनशुभेच्छा मध्यावर विषयाची मांडणी आणि शेवटाला आभार. या व्हाटसअप आणि चॅट अॅप्लिकेशनमधे असा कसलाच ठरीव प्रकार उरलेला नाही. तरीही या सगळ्यातून वेगळं असं काही लिहावसं वाटलं. आपल्या कोणा जीवलग माणसाविषयी. मनातल्या मनात कुढंत राहिलं की मनातच दुरावा जाणवत जातो. मनाचा मनाशीच होणारा संवाद थांबला कीआपणच आपल्याला त्रास देत रहातो. आयुष्याच्या पुस्तकातील मन मोकळी करणारी अशी कुरमजलेलं पान लिहीली जातात नव्हे तर ओघवतातंच.

प्रिय श्री
                     मला माहीतेय तुला हे प्रिय कधीच आवडत नाही. कारण ते लिहीले म्हणून कुणी प्रिय होत नाही अन नाही लिहीले म्हणून अप्रिय. तरीही. तू मला कायमच प्रिय आहे म्हणून. तुला आठवतंय तू मला दिलेलं पहिलं पत्रं ? हाहा तेच वहीतून दिलेलंकुणी वाचकाने तुला पाठवलं होतं. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतांना मैत्र पुरवणीकरता आपण लिहीताना ? मला आजही आठवतेय तुझे ते सदर अर्थ नात्यांचा. तुझ्या ह्याच सदरातील लेखांमधून तर आपली ओळख झाली होती. लिहीताना वेडयासारखं वाहवत जाणं कसं जमतं हे स्वत: अनुभवल्याशिवाय कळत नाहीचतुझं हे व्यवहारी वागणंपाय रोवुन उभं रहाणंच मला आवडायचं. 
तुही लिहायचास की पण खरं सांगु मला तुझं सामर्थ्य तुझ्या लिहिण्यापेक्षा तुझ्या वागण्यात जाणवायचं. तुझी एक कविता दिली होती आजही आठवतेय मलाकुठल्याशा एका स्पर्धेत तू हारल्यावर मला वाचायला दिलेली.  किती बळ दिलं त्या कवितेने मला नाही सांगू शकत. माझं हे लिहीणंही कदाचित त्यामुळेच वाढीस लागलं असेलकिती वेगळं असायचं तुझं लिखाणहळुवारपणा असायचाचपण नकळत समोरच्या माणसाच्या मनात घर करून जाणारं वास्तव शब्दात मांडलेलं असायचं.
                    मला अजूनही नाही जमत रे तुझ्यासारखं लिहायलाहा पण तुझ्या त्यावेळच्या कविता खुप आवडायच्या. तुझ्या अनेक आठवणी आहेतमनातल्या तुझ्याच कप्प्यात अन तुझ्या हिशोबाच्या वह्यांखालीतुझ्या आठवणीच इतक्या हळव्या आहेत ना की तुझ्यातलं माणुसकीचं झाड आपोआप पाखर घालीत रहातं दुसऱ्यांवर. आपलं जगायचं राहून गेलेलं सगळं आत्ता भासमय जगलो आपण. पण काही अर्थ नाही रे यात. सगळं केव्हांच सुटून गेलंय हातातून. 
                    दहा वर्षे झाली आपल्या पहिल्या भेटीला. नंतरची दोन वर्षे केवळ मला कलाटणी देणारीच होती. कॉलेज संपलं अन आपल्या नाही माझी वाट वेगळी झाली. मी छंद सोडून करीअर नावाच्या गोंडस वाटेने गेलो. पण तू छंद जपत तुझ्याच वाटेने निघून गेलास. खूप दूरवर. सगळं अगदी चुटकीसरशी उधळून. तुझा शोध का थांबवलाय आज माहितेय कारण आज खात्री झाली की आपली पुन्हा भेट नाहीच. मी हताश झालो म्हणून तुझा शोध थांबवला नाही की मला जे हवं ते सापडलं म्हणूनही नाही ? इतके दिवस मी स्वत:लाच फसवत होतो कोसळून पडू नये म्हणून. मी शोधत राहिलो कारणं खूप प्रयत्न केला सुख शोधायचा. अगदी अवघ्या आयुष्यावरंच आसुसलेपण चाल करून यावं इतका. तडफडत राहिलो मीच माझ्या आपल्या वर्तुळात एकटाच.
                    तू एकटाच गेलास कारण मित्र म्हणून तेवढा अधिकार तुला होतामला तेवढाही अधिकार नाही. होय ते स्टेशनवर सोडायला आला तेव्हा आपले हात सुटत गेले अन मुठीतल्या वाळुसारखे अलगद दुरावत गेलेनाही रे! आजही ताकद हरवून बसलो नाही सगळी. अगदी समजण्याची उमजण्याची सुध्दा. रिता होउन गेलो पुरता तरीही मधली सगळी वर्षं वाहून गेली. परत नव्याने काही घडतंय अन मलाच सगळं विचारुन माझाच अर्थ नव्याने समजावतंय. नव्याने सोडवतोय आता माझ्यातलं मी पण.
                    तुझी जुनीच सवय हीस्वत:ला हवी असलेली वाटच फक्त मोकळी ठेवायची.  मलाही सवय लावलीए तू हक्कानेबोट दाखवलेल्या वाटेवर चालायची. म्हणूनच लिहीतोयअविरत. माझेच गुज अन माझीच शब्दांची मोरपिसं. बाकी काय काय बदललंय माझ्यात गेल्या चार वर्षात मलाही नाही माहीत. पण टिकून आहे तोच पारदर्शी चेहेरा. तुझ्यासारखाचआत बाहेर सारखाच. जगण्याच्या विविध रंगछटा जपून ठेवणारा. मैत्री जीव तोडून जपायचं म्हणतो मी नेहमीच ते ठीक आहे. पण आता सगळेच मित्र हातभर अंतर राखून वाटते रे.  
                   तुझं हे असं समजल्यावर या सगळ्यातून बाहेर येतांना खूप कुतरओढ झाली माझी. मनातली दाटलेली सगळी उचंबळ गिळून टाकत सारं आसुसलेपण गोठवायला तुच शिकवल्यानं तरी जरा धीर आला. बंधनाचे सगळेच दोर तोडून टाकून स्वत:बरोबरच जगणं आजकाल चालू आहे. थोडक्यात काय तर स्वत:ला प्रॅक्टिकल बनवणं हेच हल्ली चालू आहे. लवकरंच तुझ्या वाटेने चालायचंय पुन्हा. आहे हे सगळं इथे जसंच्या तसं सोडून. जगायचं राहून गेलेलं सगळं आत्ता त्याच वाटेने. कशातच काही अर्थ नाही असं सगळंच काही निरर्थक वाटायला लागण्याअगोदर खरंतर. आयुष्य जाणीव न जाणीवेच्या धूसर सीमारेषेवर असतानाच मला माझं मीपण टिकवायचंय. 
                    सध्या मनात नुसती प्रश्नचिन्हंच नाचतायत माझ्याच प्रश्नांना प्रतिप्रश्नं विचारणारी. मी शोधतोय त्या माझ्याच प्रश्नांची उत्तरं. सापडली की या वाटेवरचा प्रवास संपला. माझ्या जगण्याचे बदलेल्या संदर्भांची जाणीव होतेय हळूहळू. पूर्वीची वेगळी वाट काहीनाही साधं अन सरळ पण वळण घेणार हे नक्की.

तुझाच मित्र.
नाव सांगायची गरज नाही. तु वाचलं की समजून जाशील खात्री आहे.

(श्री ला भेटून तशी आता सातआठ वर्ष उलटली. कॉलेज संपलं अन आमची पुन्हा भेट झालीच नाही. तो त्याच्या वाटेने सरळ तसाच चालत राहिला. मी पुढचं शिक्षण घ्यायला माझ्या वाटेने निघून गेलो अन तिथंच आमचा सोबतचा प्रवास संपला. होत संपलाच. काही दिवसांपूर्वी नगरला एका मैत्रिणीच्या लग्नानिमित्ताने गेलो होतो. खरंतर लग्न हा प्रकारचं मला मुळीत न रूचणारा. तेव्हा परत येताना श्री च्या त्या घराच्या जवळ चक्कर झाली. आम्ही वेगळ्या वाटेने गेलो त्यानंतर महिनाभरातंच त्याने आपलं घर बदलून अकोल्याच्या पलिकडं हरिचंद्रगडाच्या पायथ्याला गाठलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रवास कुणालाही माहित नव्हता. वर्तमानपत्रात तो गेल्याची बातमी वाचल्यावरंच शेजाऱ्यांना माहित झालं. मला जवळपास वर्षभरांनी ते समजलं. तोपर्यंत माझा शोध चालूच होता. त्याची अन माझी मैत्री ही शब्दात मांडण्यापलिकडची होती. अशा एका मित्राची परत भेट झाली नाहीच. तो गेलाय असं अजूनही मी मानत नाहीच. लिहीत भटकत असेल सह्याद्रीच्या कुशीत कुठेतरी. कदाचित पुन्हा भेट घेण्याकरता...)
गणेशदादा शितोळे

(१५ जुलै २०१८)







पैसा आयुष्य आणि माणूस...!!!


माणूस शिकतो, सावरतो अन मोठाही होतो. पण त्याची प्रगती होतेच नाही. प्रगतीचं नेमका मापदंड काय हा प्रश्न आजच्या युगात विचारला तर एकच उत्तर बहुतेकांकडून येतं. पैसा, संपत्ती अन त्यातून आलेला मोठेपणा...
खरंतर प्रगतीचा तसा कोणताही मापदंड ठरवण्याइतका मी मोठा नक्कीच नाही. हा पण मी प्रगतीला या मापात बघतंच नाही. माणसाची प्रगती म्हणजे तो आयुष्याच्या प्रवासात कुठपर्यंत पोहचला....?
आयुष्याचं मोजमाप म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगतीचे मधुर फळ. आयुष्य म्हणजे प्रगतीच्या शिड्या चढत  चढत एकेक पायरी वर चढणेंच. संकटं घेऊन य़ेणारा पुढचा प्रत्येक रस्ताच आयुष्य कसं घडवायचं, वाढवायचं की अडवायचं ते ठरवतो !
आजकाल पैशाच्या मागे धावणारी माणसं बघून ती प्रगत आहेत की चावी दिलेली बुजगावणी हा प्रश्नच पडतो. लाखोंची संपत्ती असणारा उद्योगपती प्रगत की तितकीच संपत्ती असणारा राजकारणी....?
अंबानी, अदानी हे प्रगतीचे आदर्श की मिसाईल मॅन अब्दुल कलाम..?
तंत्रज्ञानातला जपान प्रगत की निसर्ग जपत आलेला भूतान...?
महासत्ता म्हणवणारा अमेरिका प्रगत की शांत असणारा आईसलॅण्ड...?
खरंतर कुणीचं अगदी ठाम उत्तर देऊ शकणार नाहीच याचं. मीही. परंतू एक मात्र खरं आहे की पैसा म्हणजे प्रगती नाही तर तंत्रज्ञान म्हणजे प्रगती. तंत्रज्ञानातील प्रगतीचा आयुष्याला फायदा असेल तर ती प्रगती ठरते. आयुष्य उध्वस्त करणारी तंत्रज्ञानं देखील मग माणसाला मागेच नेऊन ठेवतात.
शिक्षण म्हणजेच प्रगती का हीच आपल्या धोरणांची यशस्विता का ? तर नाही. माणूस म्हणून असणारी अंगभूत गुणवत्ता वाढली म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगती. पैशामागे धावत रहाणे म्हणजे आपणंच आपल्या आयुष्याची करून ठेवलेली वेठबिगारी. आयुष्य जगण्याकरता पैसा आवश्यक असेलही, पण पैशाकरता आयुष्य खर्ची घालताय त्याचं काय...?
आयुष्याचा कधी हिशोब केलाच तर आपण किती कमावण्याकरता किती आयुष्य व्यर्थ खर्ची घालतो ते समजेल. आयुष्य म्हणजे आपली मालमत्ता आहे. मालमत्ता वापरून जरूर कमाववे. पण तिचे अवमुल्यन कमाईपेक्षा अधिक होत असेल तर ती कमाई काय कामाची.
माणुस पैसा मिळवण्यासाठी पळतो, धडपडतो अन आरोग्य, सुख समाधान गमावतो. अन पुन्हा उतारवयात तेच परत मिळवण्यासाठी पैसा खर्च करतो. प्रगतीचा आलेख जसा चढतो तसाच उतरत संपतो देखील. आपल्याला आयुष्यात करियर, यश, पैसा हे सगळं हवं असतं.पण चांगलं आयुष्य मिळण्यासाठी आरोग्य,तणावरहीत आनंदही आवश्यक असतो. आजच्या जीवनशैलीत भरपूर पैसा मिळवण्याच्या खटपटीत खरंच आपण सुख समाधानाचं आयुष्य जगतो का ?
खुप पैसे मिळवण्याच्या नादात सुखासमाधानाची आणि आनंदाची किंमत गहान टाकतो. आयुष्यात करीयरची पुस्तके घेऊनंच भविष्यात यश आणि जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या शर्यतीत उतरतो. पण पैसा-आडका, घरदार, गाडी, कपडे इत्यादी मिळवण्याच्या कैफात आपण आपल्यालाच विसरून जातो.
एकविसाव्या शतकाच्या आपण गप्पा मारताना आपण सोयीस्कर विसरतो की आपण असे किती शोध लावले, ज्याने जगाच्या वर्तनाची दिशाच बदलवून टाकली. जगात प्रगतीच्या दिशेने कुणी कुठे काही नवे शोधले की, हे तर आमच्याकडे आधीच आहे,पुराणात सांगितलेय. शोधून पहा, असे समर्थन करत सुटतो.  जर खरंच आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती, ग्रहताऱ्यांचे ज्ञान अवगत होते. विमाने पण होती म्हणायचे. मग असे असेल तर अनेक दशके आपण बैलगाड्या, गाढव-घोडे का वापरत होतो ? आम्ही प्रगत होतो मग आम्ही आमच्याच आयाबहीणांना इतके दिवस घरात डांबून का ठेवत होतो. सती सारख्या नालायक प्रथा पोसत होतो.
प्रगती म्हणजे जगणं सुकर करणारी प्रत्येक गोष्ट. साधी सुई हेही प्रगतीचंच उदाहरण आहे. ज्यांच्या मागे पद, पैसा, प्रतिष्ठेचे वलय आहे, ते प्रगत हा निव्वळ गैरसमज आहे.  कारण ज्यांच्याकडे काहीच नाही, तेही  परिस्थितीशी दोन हात करीत उभे आहेत. उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या शोधात. करत आहेत प्रगती.
पैसा आला, तंत्रज्ञान आलं. पण आपलं  सामाजिक व्यवस्थेतील अन मनातीलंही कुपोषण दूर करणं गरजेचं आहे. आपले आयुष्याचे प्रत्येक पाऊल हे काळाच्या ओघाने आणि प्रगतीच्या दिशेने बदलणारे असावे.  पैशामागे धावणाऱ्या जगात प्रगतीची संपन्नता शोधणारे लोक आपल्या समाजात काही कमी नाहीत. फक्त त्यांच्यातील प्रगती आपल्या बेगड्या नजरेला दिसत नाही एवढेच.  आयुष्यातील प्रगती मागून अथवा लादून कधीही मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. स्वकर्तृत्वाने स्वत:हून मोठे व्हावे लागते. आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न पहाताना अगोदर आकाशाशी हितगुज करणाऱ्या शिखरांचा शोध घेता यायला हवाच.
नाहीतर पद, पैसा, संपत्ती अन प्रतिष्ठेचे वलय म्हणजेच प्रगती ही व्याख्या चालत आली आहेच अन राहिलंही. आपण फक्त लहानमोठी गोणपाटं हाती घेऊन पैशाच्या मागे पळायचं. आपलं आयुष्यही त्यातंच खर्च होत रहाणार अन जसे जन्माला आलो तसेच मरण पावणार.  आयुष्याचा विकत घेतलेला प्रगतीचा आलेख शिखरं गाठायची दूर उंचावट्यावरंच संपून जाणार. जगाच्या दूर माणूस म्हणून स्वत:च्या प्रगतीच्या आलेखातही आपलं पुसटसं नावंही शिलकीला उरणार नाही.

गणेशदादा शितोळे
(१५ जूलै २०१८)