माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १६ एप्रिल, २०१७

                           नुकतीच शासकीय तंत्रनिकेनमधे असताना आम्हाला प्राचार्य असणाऱ्या प्रा. सतीश केरकळ यांचा एक लेख वाचनात आला आणि मनात असंख्य विचारांना वाट फुटली. तोच लेख वेसन म्हणून इथे प्रकाशित करून ठेवत आहे. की वेळोवेळी तो मला भानावर आणेल .


*होतं असं कधी कधी......*




*होतं असं कधी कधी......*
खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...
टाळतो आपण कॉल करायचा....
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...
_'तुझ्या ऑफिस बाहेर होतो..._
_भेटलो असतो...'_
जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच...
*स्वतःला खोटं खोटं समजावत...!*
*
कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली...
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...
माया,कणव दाटून येते मनात आपल्या...
_'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??'_
पाकिटात हात जातो...
शंभराची नोट लागते हाती...
व्यवहार जागा घेतो ममतेची...
समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...
_"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."_
तो सुटका करतो आपली पेचातून...
*आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...*
*
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी...
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
ती येते...
काम आटोपते...
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
चिवडा लाडू असतो त्यात...
_"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."_
*'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...*
*
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर...
अंगात ताप असतो तिच्या...
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
दिवस उलटतात...
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
_"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."_
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
चडफडत फेसबुकच्या आभासी मित्रांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आठवतात.....
लाजत तिला फोन करतो...
_"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."_
ती बोलते...
*कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...*
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
काहीतरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
*खरंच,*
*होतं असं कधी कधी....!!!*
*******





(साभार प्रा. सतीश केरकळ यांच्या फेसबुक वॉलवरून.....)




                           एका टप्प्यावर या सगळ्याचा विचार करावा वाटतो. अनेक उत्तरं तर मिळतात. पण बहुतेकदा दोष स्वत:कडे जातो म्हणून ती पचवण्याऐवजी मान्य न करण्यावरच भर असतो. आत्मपरीक्षण करणेही तितकसं सोपं वाटतही नाही अन नसतंही. आणि मग एखाद्या दिवशी आभासी जगात रमत बांधील आयुष्य जगताना भानावर आणणारे असे काही वाचले की स्वत:चीच स्वत:ला लाज वाटते.






गणेशदादा शितोळे 
१५ एप्रिल २०१७






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा