माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २३ एप्रिल, २०१७

 

संस्कृती...!!!


                       नुकतेच कामानिमित्ताने मुंबईला जाण्याचा योग आला. मुंबई म्हटलं की गर्दी आणि ट्रॅफिक जाम यापलिकडेही काही आहे याचा अनुभव मुंबईत गेल्या वर येतोच. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणेकरांना शिकण्याची गरज असणारी वहातूक शिस्त. एकंदरीत मुंबईत वास्तव्यास असताना प्रत्येक वेळी मुंबई आणि पुणे यांची तुलना व्हायचीच. मुंबई आणि पुणे यामधे ठळकपणे जाणवणारा फरक म्हणजे समुद्रकिनारा. 

                      माझं काम करण्याचं ठिकाण नरिमन पॉइंट ला असल्याने रोजच टॅक्सीने जाताना मरीन ड्राईव्ह चौपाटीवरून जाण्याचा योग यायचा. टॅक्सीमधून मरीन ड्राईव्ह चौपाटीवर नजर टाकली की एक हमखास दिसणारं दृष्य म्हणजे सकाळच्या चटकणार्‍या उन्हात समुद्रकिनारी यथेच्छ रममाण होऊन गेलेली जोडपी. अशी जोडपी बसली की चर्चा आल्याच. त्यामुळे ह्यावर रोजच टॅक्सी प्रवासात चर्चा व्हायची. अनेकदा ही संस्कृती आपली नव्हे असाच सुर असायचा. पण मनातून आपलं हे करायचं राहून गेल्याचंच खटकत असल्याचं जाणवलं. या निमित्ताने परदेशी संस्कृती, कल्चर यावर खडे फेकणंही आलंच. काय तर म्हणे मरीन ड्राईव्ह वर दिसणारं आपलं कल्चर नव्हे. खळखळार्‍या लाटांनी बेबंद वहाणारा समुद्र, मंद वहाणारी मुक्त हवा आणि समुद्रकिनारा यासोबत कोणी अखंड प्रेमात बुडलेलं असेल तर काय गुन्हा झाला...? 
प्रेम करणे हा कोणता गुन्हा...? 
आणि कोणत्या संस्कृतीच्या गप्पा...? 
गोव्यातील समुद्रकिनार्‍यासारखी विशिप्त संस्कृती तर दिसत नाही ना..? 
मग ह्या संस्कृती रक्षकांना एवढी चिंता कशाची..?
                      देशभरातील समुद्रकिनार्‍यांवरची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र आणि मुंबईने आपलं वेगळेपण जपले आहे. संस्कृती आणि वैविध्यानेही. आणि संस्कृती संस्कृती काय गप्पा मारतो... समुद्राकिनारी प्रेम करायला यायचं नाही मग काय कचरा आणि घाण टाकून प्रदूषित केलेला समुद्र किनारा पहायचा..? परदेशी संस्कृतीचा एवढा तिटकारा वाटतो तर पहिल्यांदा परदेशी लोकांकडून स्वच्छतेचे गुण शिकले पाहिजेत. हुंडाबळी, घटस्फोट, पत्रिका पुराणाच्या नावाखाली चालणाऱ्या देशी संस्कृतीने रोज काढलेले वाभाडे कोणत्या शहाणपणाने ही संस्कृती रक्षक मंडळी खपवून घेते..? 
                      आपली संस्कृती संस्कृती च्या टिमक्या मारण्याअगोदर आपल्या संस्कृती प्रथा आणि परंपरामधील घाण अगोदर काढून टाकली पाहिजे. मग दुसर्‍याला दोष दिले पाहिजेत.



गणेश दादा शितोळे
(२३ एप्रिल २०१७)



शनिवार, २२ एप्रिल, २०१७

 

काय असते नेमकी यात्रा जत्रा...!!!


                     उन्हाळा सुरू झाला की ग्रामीण भागात जिकडे तिकडे यात्रा, जत्रा प्रकार सुरू होतात. दुष्काळ असो की अजून कोणतही संकट या यात्रा/जत्रा दणक्यात साजर्‍या झाल्या पाहिजेत याचं नियोजन करण्याचं काम गावोगावी असणार्‍या यात्राजत्रा कमिटीचे सदस्य करतात. नुकतीच गावच्या यात्रेची यात्रा कमिटी वर्गणीची पावती देऊन गेली. दीड हजार रुपये फक्त. आता ती द्यायचा नाही द्यायचा हा नंतरचा भाग. पण त्या निमित्ताने या यात्रा जत्रा संस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्याची संधी मिळाली.
काय असते नेमकी यात्रा जत्रा संस्कृती...?
                    लहानपणी ह्या यात्राजत्रा म्हणजे मौज मजा वाटायची. तेव्हा फारसं कळत नव्हतं. उंचच उंच पाळण्यात बसण्याचा आनंद काही न्याराच होता. आता समजदार होण्याच्या वयात मात्र अगणित प्रश्न पडतात आणि उत्तरही मिळतात. पूर्वी यात्रा जत्रा कशा होत्या माहिती नाही. पण आता ह्या यात्रा जत्रा म्हणजे केवळ पैशाची नासाडी. यात्रा जत्रा आल्या की वर्गण्या वसूल करायच्या. देव, देवळं सजवण्याच्या नावाखाली पैसे खर्च करायचे. गुलाल उधळायचा, छबिन्याच्या मिरवणुकीत ओंगळवाणा नाच करायचा, शोभेची दारू उडवायची. मनोरंजनाच्या नावाखाली भलतेच काहीतरी ओंगळवाणे तमाशे, नवीनच आलेला ऑर्केस्ट्रा असले प्रकार आणून त्यावर पैसे उधळायचे. यातून सगळं सुरळीत पार पडत नाही तोवर जुन्या कुरापती काढून हाणामाऱ्या करायच्या या एकूण प्रकारचं सोज्ज्वळ नाव म्हणजे यात्रा जत्रा. या सगळ्या उठाठेवीकरता या यात्रा कमिटीला वर्गणी द्यायची.
                    कुस्तीचा आखाडा सोडला तर यातून फायदा लांबच राहिला. नुसती उधळपट्टीच. आणि कुस्तीचा आखाडय़ापेक्षा राजकारणाचा आखाडाच अधिक जोरात असल्याने सरासरी दोन अडीच लाख रुपयांची नासाडी करण्याच काम सर्रासपणे चालू असतं... नुकताच शेजारच्या गावात दरवर्षी प्रमाणे यंदाही या यात्राजत्रा प्रकारात जुन्या कुरापतीतून वाद विकोपाला गेले आणि अनेक तरूण न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. आणि यातील बबहुतेक नाव शिकल्या सावरलेल्या उच्च शिक्षित तरूणांची आहेत.

                    या रकमेच्या नासाडीपेक्षा गावोगावी एकत्रित येऊन सुधारणा करण्यासाठी ही रक्कम वापरली गेली तर सर्वांच्या समाधानाची आणि उपयोगाची बाब ठरेल. मागील वर्षी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण आणि संवर्धनाचे काम केलेल्या गावांनी या यात्राजत्रा प्रथापरंपरांना फाटा देत गावाच्या विकासासाठी वर्गणीतील रक्कमा दिल्या तो आदर्श बाकी गावं कधी घेणार...?  
                    शिकल्या सवरलेल्या तरूणांनी राजकारणात प्रवेश घेऊनही असे पैसे उधळण्याचे प्रकार सुरूच रहाणार असतील तर नक्कीच चिंताजनक बाब आहे.





गणेश दादा शितोळे
(२२ एप्रिल २०१७)



गुरुवार, २० एप्रिल, २०१७

 

राजन खान यांचे काही विचार...!!!


                    मला राजन खान यांचे विचार पटतात नव्हे त्याने प्रभावित आहे असं म्हटलं तरी चालेल. आता त्यांचं खान अडनाव पाहून अनेकांच्या मनातील धार्मिक पिलावळ जागी होईल. पण मला त्याचा फरक पडत नाही. त्या माणसाची जात कोणती,  धर्म कोणता यापेक्षा त्या माणसाचे विचार कसे आहेत यावरून तो माणूस मला माझा वाटतो. कारण राजन खान या व्यक्तीला मी प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही तरी त्या माणसाला विचारांनी अनेकदा भेटलो. विचारांशी समरूप झालो. म्हणूनच राजन खान यांचे हे काही विचार मला प्रभावित करून गेले.

भारतीयांच्या मनातून जात, धर्म, पंथ, वर्ण या माणसात भेद करणारे विचार ज्यावेळी निघून जातील अन एकसंध भारत खर्‍या अर्थाने #स्वच्छ_भारत होईल...
.............................................................................................................................
                    .............................................................................................................................
मी सर्वच जातींच्या विरोधात आहे, मी सर्वच धर्मांच्या विरोधात आहे, मी माणसांमधल्या सर्वच भेदांच्या विरोधात आहे, पण माणसांच्या विरोधात अजिबात नाही, अजिबातच नाही.
.............................................................................................................................
                    .............................................................................................................................

जातीधर्माच्या विचारांनी माणसाच्या मनावर इतका बलात्कार केला आहे की,
शरीरात जिवंतपणा तर आहे.
मात्र माणूसपणा निघून गेलाय....
.............................................................................................................................
                    .............................................................................................................................

फॅशनचा ट्रेण्ड आणि कपड्यांचा ब्रॅण्ड बदलण्यापेक्षा
विचारांचा ब्रॅण्ड आणि जगण्याचा ट्रेण्ड बदलून बघा.
आयुष्य सुंदर होतं आणि आहे.



गणेश दादा शितोळे
(२० एप्रिल २०१७)



सोमवार, १७ एप्रिल, २०१७

                       मागील दोन दिवसांपूर्वी हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून आमच्या एका बहीणीने आत्महत्या केल्याची बातमी वाचली आणि या समाज, संस्कृती आणि रूढी परंपरा यांची चीड आली. वाचून खरंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. यावरच भाष्य करणारा लेखिका कविता ननवरे यांचा एबीपी माझाच्या बेवसाईटवरचा ब्लॉग आमचे मित्र चंदुकाका वाजे यांनी आपल्या फेसबुकद्वारे काल शेअर केला होता. सदरचा लेख हा मराठा बांधवांना असा उद्देशून असला तरी तो जातीयवादी आहे असा नाही तर तमाम तरूणाईला, समाजातील प्रत्येक घटकाला जाब विचारणारा आहे. मीही त्याला अपवाद ठरू शकत नाही. कविता ननवरे यांचा हा लेख.....

माझ्या मराठा बांधवांनो

Image may contain: text

(नाही नाही मला मराठी नाही ” मराठाच ” म्हणायचं आहे )
विशेषतः शिवभक्तांनो, शिवप्रेमींनो’ सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारांनो आणि सोबतच सो कॉल्ड हुच्चशिक्षितांनो
आठवतय का सहा महिन्यापूर्वी नगर जिल्ह्यातल्या एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.नाही आठवत? अरे ती ती कोपर्डीतली मुलगी तुमच्या मराठा जातितली…हं आत्ता आठवलं ना…नाही म्हटलं आजच्या या अभद्र काळात कुठलीही गोष्ट ध्यानात राहायलाही जातीचाच संदर्भ द्यावा लागतो. तेही खरचय म्हणा जात हा फॅक्टर जळूसारखा तुमच्या माझ्या मनाला चिकटलाय! चिकटवलाय अगदी जन्मापासूनच.
तर असो…तुम्हांला कोपर्डीतली तुमची जिजाऊची लेक आठवली हे बरच झालं, आणि पुढे हेही आठवत असेल की, ती पिडीत मुलगी तुमच्या जातीतली आहे हे कळल्यावर’ तुम्हारा खून वगैरे खोल उठा था’. तळपायाची आग मस्तकाला गेली होती. अत्याचार करणाऱ्यांविरोधात तुम्ही तुमच्या तलवारी उपसल्या होत्या…वगैरे वगैरे. ती तुमच्या जातीतली आहे म्हणून तिच्यावरच्या अत्याचारांविरुद्ध तुमच्या रक्ताला काही काळापुरत्या तरी उकळ्या फुटल्या होत्या. तर असो…हेही नसे थोडके… त्याबद्दल तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. तुम्ही एकत्र आलात मोर्चे काढले…सरकारला निवेदनं दिली. तुम्ही तुमचं काम केलं.
तर काय झालय की, काल लातूर जिल्ह्यातील एका मुलीनं आत्महत्या केलीय. तुम्ही म्हणाल, ‘अशा आत्महत्या तर राजरोस घडतात. आम्ही काय करु?’ पण ती मुलगी तुमच्या मराठा जातीतली आहे. तिच्यावर कोपर्डीतल्या मुलीसारखा काय दुसऱ्या जातीतल्यांकडून अत्याचार वगैरे झाला नाही. किंवा कुणाच्या छेडछाडीला कंटाळून तिने जीवन संपवलेलं नाही. तर तिने तुमच्या जातीतल्या मुलीला लग्नात दिल्या जाणाऱ्या भरमसाठ हुंडापद्धतीला कंटाळून आपल्या मौल्यवान जीवनाचा शेवट केलेला आहे. विश्वास नाही बसत. तुम्ही तिची सुसाईड नोट वाचा, म्हणजे विश्वास बसण्याची शक्यता आहे.
“मी शितल व्यंकट वायाळ चिठ्ठी लिहिते की, वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले. शेतात पाच वर्षांपासून नापिकी असल्यामुळे कुटुंबाची स्थिती हलाखीची आहे. माझ्या दोन बहिणींचे लग्न  ‘गेटकेन’ (साध्या पद्धतीनं) करण्यात आलं. परंतु माझे लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कर्जही मिळत नव्हते. तरी बापावरील माझे ओझे कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी परंपरा, देवाण-घेवाण कमी करण्यासाठी मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.”
तिच्या आत्महत्येचं कारण डोक्यात न शिरण्याएवढे बाळबोध तुम्ही नक्कीच नाही आहात. मग आता उसळतय का रक्त? गेली का तळपायाची आग मस्तकात? कोपर्डीतली मुलगी तुमच्या जातीची होती. तिच्यावर अत्याचार करुन तिला संपवणाऱ्यांविरुध्द तुम्ही तलवार उपसली होती. शितलच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांविरुध्द उपसा न तलवार आता… तिच्या आत्महत्येला जबाबदार तुमच्या जातीतल्या रुढी परंपराच आहेत ना? मग करा ना… त्या आघोरी प्रथांविरूद्ध एल्गार..! कोपर्डीतल्या प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये म्हणून तुम्ही लाखोंची मोर्चेबांधणी केली, आता हजारोंनी नाहीतर गेलाबाजार शेकड्यांनी तर एकत्र या…करा उभी हुंडाविरोधी पुरूष संघटना. टाका बहिष्कार बाजारु विवाहपद्धतीवर. आहे हिंमत? की ” माझी इच्छा नाही बुवा हुंडा घ्यायची घरच्यांचाच खूप आग्रह आहे हुंड्याचा आणि हौसे-मौजेचा.”असा डायलॉग मारुन घरच्यांच्या पदराखाली जावून लपणार आहात?
तुम्ही मर्द मराठी मावळे…श�त?
तुम्ही मर्द मराठी मावळे…शिवबाचे अवतार…सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या संभाजीचे वारसदार ना? मग कुठं गेलेत तुमचे सिंहाचे दात मोजणारे हात?
गळ्यात भगव्या माळा आणि कपाळावर भगवा नाम ओढून कुणी शिवा-संभाचे अवतार होत नसतं भावांनो… त्यासाठी त्यांच्याइतकी वैचारिक उंची असावी लागते.
बापाकडे हुंड्यासाठी, देण्याघेण्यासाठी पैसे नाहीत. शेतात वर्षानुवर्षे काही पिकत नाही. पिकलं तरी सरकार पुरेसा भाव देत नाही, अशामुळे बापाला कुणी कर्ज देत नाही, म्हणून तिचं लग्न जमत नाही. (आणि लग्न म्हणजे तर एका मुलीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता.’ हे तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनीच तिच्या मनामनावर गोंदवलय. मग तिला लग्न म्हणजेच आपल्या आयुष्याचं कल्याण, असं वाटलं तर दोष तिचा नाही. तिच्या मनात तशा विचारांचं बिज रुजवणाऱ्या तुमच्या समाजाचा, तुमच्या समाजातल्या थोरा-मोठ्यांचा आहे.) म्हणून तिने बापावरचा भार हलका करण्यासाठी स्वतःला संपवलं. याला जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध तुम्ही करणार आहात का एल्गार आता? आपल्या जातीतली जिजाऊची लेक जर या कुप्रथेचा बळी जात असेल, तर तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना लटकवणार नाहीत का फासावर? जीव तर कोपर्डीतल्या तुमच्या भगिनीचाही गेलाय आणि लातुरच्या शितलचाही गेलाय. फक्त कारणं वेगळी आहेत. दोघीही तुमच्या सो कॉल्ड मराठा जातीतल्याच आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे? की तुमच्या समाजातल्या अजून काही शितलनी या अघोरी हुंडापद्धतीमुळे लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या करण्याची वाट पाहणार आहात तुम्ही ?
“कोपर्डी घटनेच्या विरोधातल्या मोर्च्यामध्ये फक्त मुक्याने चालायचं तर होतं. कचरा गोळा करायचा होता. पाणीवाटप, चहा वाटप करायचं होतं म्हणून आम्ही सहभागी झालो होतो. हुंड्याविरोधात आवाज उठवायचा म्हणजे स्वतःच्या घरावरच धोंड येणार की. इथं साध्या गुरं राख्याला लाख-लाख हुंडा येतोय आणि आम्ही तर सहज पाचसहा लाखाचे धनी. हुंड्याविरोधात बोलायचं म्हणजे लग्नातल्या मानपानाला, प्रतिष्ठेला, हौसेमौजेला आम्ही मुकायचं का? आमच्या आई-बापानं आमच्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा कुठून वसुल करणार आम्ही? काहीतरीच काय हुंडा घेवू नका म्हणे.”
आताही तुमचा मेंदू जर असाच वैचारिक दरिद्रीपणा दाखवणार असेल, तर कुठल्याच मुलीवरच्या अत्याचाराविरोधात तोंडातून ‘ब्र’ काढायचाही तुम्हाला अधिकार नाही. त्याबाबतीत तुम्ही नालायक आहात.
तुमच्या झोळीत धोंडा पडणार म्हटल्यावर नाही तुमचं रक्त गरम होणार. ना की तुमच्या तलवारी सळसळणार. जिथे एका आण्याचीही झळ तुमच्या खिशाला बसत नाही, तिथे तुम्ही समाजकार्याचा कोरडा आव आणणार. आपल्या कर्तृत्वाचे झेंडे फडकवण्याच्या पोकळ वल्गना करणार. होय ना?  पटत नाही माझं म्हणणं? एक काम करा…आरशात स्वतःचा चेहरा पाहा. शून्य मिनिटात माझा शब्द न् शब्द तुम्हांला खरा वाटेल. (आणि तेही खरच तुम्ही शिवा-संभाचे मावळे असाल तर ) आणि आरशात पाहूनही जर तुम्हाला स्वतःचा चेहरा ओळखता येत नसेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने नामर्द आहात.
सासऱ्याच्या जीवावर तुम्हाला फुकटची हौसमौज हवी आहे. चारचौघात बडेजावपणानं हुंड्याचे आणि सोन्याचे आकडे मिरवायचे आहेत.आणि शक्य झालं तर बुडाखाली बुलेटसुद्धा हवीय तुम्हाला रुखवतात…पण पोरीचा चहूबाजूंनी झोडपून निघालेला शेतकरी बाप या तुमच्या डामडौलाची तजबिज कसा करत असेल? याचा विचार तरी शिवतो का तुमच्या मनाला? “आम्ही नकोच म्हणतो पण मुलीकडचेच ऐकत नाहीत.” चिडून हा बचावात्मक पवित्राही तुम्हाला घ्यावासा वाटतो. पण तुम्ही अशा गोष्टींना ‘नको’ म्हणण्याची सवय का लावून घेत नाही स्वतःला? ” आम्ही मागणार नाही, पण जे देईल त्याला नाही म्हणणार नाही.” या तुमच्या भूमिकेमुळेही ही देण्याघेण्याच्या प्रथेला अधिकाधिक खतपाणी मिळत जात आहे.” त्या अमक्याच्या पोराला एवढा हुंडा आला… एवढं सोनं आलं… आमच्या पोराला तर याहून जास्त आम्ही घेणार ही तुमच्या आईबापाची मानसिकता तुमच्याशिवाय दुसरं कुणीही बदलू शकत नाही माझ्या भावांनो…
मला तर तुमच्यापेक्षा आदिवासी लोक अधिक वैचारिक उंचीचे वाटतात. शक्य झालं तर शिका त्यांच्याकडून काही.
आज लातूरच्या शितलने आत्महत्या केली. उद्या तुमच्या गावातली तुमच्या शेजारची  एखादी मुलगी हा चुकीचा मार्ग पत्करेल. तेव्हाही नुसत्या बातम्या वाचून असेच षंढासारखे गप्प बसणार आहात की, जिजाऊच्या लेकीवर ही वेळ का आली? यावर काही आत्मचिंतन करणार आहात माझ्या भावांनो?
(ता.क.: आमच्या जातीतल्या गोष्टीवर बोलण्याचा काय अधिकार आहे. असा प्रश्न उपस्थीत होण्याआधी मीच सांगते की, माझ्या जातीतल्या वाईट गोष्टींवर बोलण्याचा मला पूरेपूर अधिकार आहे.)
(लेखिका सोलापूरमधील शिक्षिका आहेत.)
kavitananaware3112@gmail.com


(साभार एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल.....)

एबीपी माझावरील सदरच्या ब्लॉगची लिंक
http://abpmajha.abplive.in/blog/kavita-nanvers-blogt-on-sheetal-wayal-subside



रोकडरहीत ऑनलाईन खरेदी केली म्हणुन लातुरच्या एका लेकीला एक कोटी रुपये बक्षिस मिळते तेव्हा वाटतं मेरा भारत बदल रहा है !
पण दुसऱ्या बाजूला  हुंड्याला पैसा नसल्यामुळे लातुरच्या दुसऱ्या कन्येची आत्महत्या सगळं सुन्न होतं...
कसल्या जातीचा गमजा आम्हाला....?
कोणत्या धर्माचे ढोल पिटतो आम्ही....?
अन कोणत्या संस्कृतीच्या गप्पा मारतो....?
अजून किती दिवस ही रूढी परंपरांच्या जळमटांना चिकटून रहायचं....?
प्रत्येकवेळी कोणी फुले शाहू आंबेडकरच जन्मला यायला हवा का....?
काय बोलणार महापुरूषांच्याही जातीसारख्याच रंगात वाटण्या करून टाकल्या आहेत....




गणेशदादा शितोळे
१६ एप्रिल २०१७



रविवार, १६ एप्रिल, २०१७

                           नुकतीच शासकीय तंत्रनिकेनमधे असताना आम्हाला प्राचार्य असणाऱ्या प्रा. सतीश केरकळ यांचा एक लेख वाचनात आला आणि मनात असंख्य विचारांना वाट फुटली. तोच लेख वेसन म्हणून इथे प्रकाशित करून ठेवत आहे. की वेळोवेळी तो मला भानावर आणेल .


*होतं असं कधी कधी......*




*होतं असं कधी कधी......*
खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...
टाळतो आपण कॉल करायचा....
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...
_'तुझ्या ऑफिस बाहेर होतो..._
_भेटलो असतो...'_
जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच...
*स्वतःला खोटं खोटं समजावत...!*
*
कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली...
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...
माया,कणव दाटून येते मनात आपल्या...
_'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??'_
पाकिटात हात जातो...
शंभराची नोट लागते हाती...
व्यवहार जागा घेतो ममतेची...
समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...
_"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."_
तो सुटका करतो आपली पेचातून...
*आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...*
*
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी...
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
ती येते...
काम आटोपते...
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
चिवडा लाडू असतो त्यात...
_"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."_
*'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...*
*
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर...
अंगात ताप असतो तिच्या...
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
दिवस उलटतात...
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
_"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."_
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
चडफडत फेसबुकच्या आभासी मित्रांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आठवतात.....
लाजत तिला फोन करतो...
_"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."_
ती बोलते...
*कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...*
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
काहीतरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
*खरंच,*
*होतं असं कधी कधी....!!!*
*******





(साभार प्रा. सतीश केरकळ यांच्या फेसबुक वॉलवरून.....)




                           एका टप्प्यावर या सगळ्याचा विचार करावा वाटतो. अनेक उत्तरं तर मिळतात. पण बहुतेकदा दोष स्वत:कडे जातो म्हणून ती पचवण्याऐवजी मान्य न करण्यावरच भर असतो. आत्मपरीक्षण करणेही तितकसं सोपं वाटतही नाही अन नसतंही. आणि मग एखाद्या दिवशी आभासी जगात रमत बांधील आयुष्य जगताना भानावर आणणारे असे काही वाचले की स्वत:चीच स्वत:ला लाज वाटते.






गणेशदादा शितोळे 
१५ एप्रिल २०१७






शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७


वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा पाटील...!


मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे  आयुष्यातील असं रक्ताचं नसलेलं नातं की जे आयुष्यातील सगळ्या भूमिका यशस्वीपणे पार पाडतो. आयुष्यात असे सच्चे मित्र लाभणे म्हणजे परिसासारखी दूर्मिळ गोष्ट नसली तरी परीसाइतकी मौल्यवान नक्कीच असते.
आयुष्याच्या एका महत्वपूर्ण टप्पातून जाताना आयुष्याला  निर्णायक वळण मिळताना अशाच एका दूर्मिळ परीसाची भेट झाली अन अभियांत्रिकीच्या पहिल्या दिवसाच्या पूर्वसंधेला पडलेल्या प्रमुख प्रश्नांपैकी एक असणारा प्रश्न म्हणजे मित्रांच्या लवाजम्यात वावरणाऱ्या मला या वळणावर पदविका अभ्यासक्रमासारखेच जिवलग मित्र भेटतील का....? याचं उत्तर मिळालं. श्रीकांत अशोक नागवडे उर्फ मित्र परिवारात प्रसिद्ध असलेले "पाटील".
मी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्यांदा जेव्हा नागवडे हे नाव ऐकलं तेव्हाच वाटलं होतं की याच्याशी आपलं केव्हाच पटणार नाही. कारण नागवडे म्हणजे श्रीगोंद्याच्या राजकारणातील आमची विरोधी बाकावरची माणसं.  तशी आमची पहिली भेट कशी झाली अन आमच्यात कशी मैत्री झाली हे आजवर न उलगडलेले कोडेच आहे पण आता ते सोडवण्याचीही इच्छा नाही. आमच्यात जीवाभावाची मैत्री आहे एवढंच या कोड्याला उत्तर पूरं झालं.
माझ्या आयुष्यात सर्वात जवळचा असणाऱ्‍या मित्राचं नाव श्रीकांत पाटील. पदविका अभ्यासक्रमाच्या अगदी शेवटी महाविद्यालय सोडताना आमची ताटातूट झाली. एका अपघातात श्रीकांतने या जगाचा निरोप घेतला. पण आजही तो आठवणीत तसाट आहे. अभियांत्रिकीला जेव्हा या श्रीकांतची भेट झाली आणि काही दिवसात कळालं की हे पाटील वांगदरीचे नाहीत. त्यावेळी खरंतर मनाला खूप बरं वाटलं. इतकं की परत त्याच श्रीकांत पाटीलची भेट झाल्यासारखंच वाटलं अन माझ्याशी बंधिस्त श्रीकांत नावची रेघ कधीच तुटली गेली नाही.
अभियांत्रिकीच्या दरम्यान आमचा जमलेला १०....२०...३०...४० नक्की किती जणांचा मित्रपरिवार म्हणावा हा प्रश्न असला तरी ज्या काही जणांचा मिळून असणाऱ्या मित्र परिवारात पाटील हे नाव उठून दिसणारे. घरंदाज. नावासारखे तब्बेतीनेही घरंदाज व्यक्तिमत्व. गुणवैशिष्ट म्हणजे मैत्रीकरता कोणतीही गोष्ट करण्याची तयारी. मग कोणाच्या डोक्यात नारळ फोडणे असो की अर्ध्या रात्री मित्राच्या मदतीला धावणे असो किंवा अनपेक्षितपणे मित्राच्या वाढदिवसादिवशी केक फेकून मारणे असो. विविधतेने नटलेले व्यक्तिमत्व. ओंजळीत सामावलेला अगणित मित्रपरिवार हीच त्याच्या गुणवैशिष्टांची ओळख.
पण तब्बेतीने घरंदाज  असणारे हे व्यक्तिमत्व आपल्या मनातील भावना बोलताना जरासं माघारतं याचं गणित काही कळलं नाही. महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे मैत्रीसोबत प्रेम हे आलंच. मित्रांइतक्या मैत्रीणी कदाचित आमच्यासारख्या पाटलांनाही नव्हत्याच. त्याबाबतीत आम्ही सगळे एका पट्टीतले. पण कोणत्या मुलीशी मनातील भावना बोलण्याची संधी कधीच साधता आली नाही. आणि त्या भावना मनातल्या मनात तशाच कोमजून गेल्या.
नागवडे पाटलांबातीत अजून एक गोष्ट म्हणजे गांभिर्य नावाच्या प्रकाराची यांना आयुष्यात कधी लागण व्हायची ती होवो. कोणताही प्रसंग असो पाटील कधीच धीरगंभीर होत नाहीत. मग समोरची व्यक्ती रागात बोलतेय की हसून याचं काहीही घेणदेणं नाही. पण आयुष्यात काही गोष्टी गांभिर्याने घ्यायच्या असतात याचा त्याला विसर पडल्याचंच जाणवतं. आख्या महाविद्यालयीन कारकीर्दीत त्याच्याबाबतीत गांभिर्य हा विषय कधी निघालाय असं झालंच नाही. कदाचित त्याने त्याचाच एकदा तरी विचार केला तर त्याला स्वत:लाच उत्तर मिळेल.
अभियांत्रिकीच्यादरम्यानचं अंतरंग हे सगळ्याच बाबतीने लक्षात राहिले असले तरी पाटलांनी त्याची एक वेगळी आठवण मनात जपायला लावली. स्नेहसंमेलन आणि वाद यापलिकडे जाऊन स्नेहसंमेलन आणि पाटील ही जोडी माझ्यासोबतच इतरांच्याही लक्षात राहिली. स्नेहसंमेलनाची महिला प्रतिनिधीची निवड करण्यामागची भूमिका साध्य करता आली नाही याचं आजही वाईट वाटतं. दुसरं म्हणजे अंतरंग मधे नाटकाच्या माध्यमातून आम्हाला आमचे रंग दाखवण्याची संधी राहून गेली. केवळ पाटलांच्या आग्रहाखातर लिहिलेले नाटक आजही तसेच आठवण म्हणून जतन करून ठेवलेले आहे. 
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पाटलांच्यातील लपलेला कवीही परिचयाला आला. त्याच्या सात कविता आजही तशीच जपून आहेत. मित्र असो की जगावं स्वत:साठी प्रत्येक कविता मानसात लपलेल्या लेखकाची, कवीची आठवण करून देतात. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकांतच्या एक कविता इथे मांडतो आहे.






अशा जिवाभावाच्या मित्राबद्दल मी लिहीत बसलो तर माझं हे लिहिणं संपणार नाही हे नक्की. त्याच्याविषयी  असं बंधनात लिहिणे मला कितपत शक्य होईल याबद्दल शंकाच आहे. पण आमच्या या मैत्रीबद्दल, मित्राच्या दुनियादारीबद्दल त्याच्याच वाढदिवसादिवशी एवढ्या सुंदर विषयावर माझं मत मांडण्याची संधी मिळाली याचं हायसं वाटलं.
आमच्या मैत्रीच्या अंतरंगापैकी एक रंग आईवडीलांच्या आशिर्वादासह मित्रपरिवाराच्या शुभेच्छांनी आज आयुष्याच्या पुढच्या वर्षात पाऊल टाकतो आहे याचा आनंद आहे. आम्हाला पाटलांसारखं केक तोंडावर फेकून सादरीकरण करायला नाही जमलं. त्यामुळे आमचं हे शब्दफेकीचं सादरीकरण शुभेच्छा म्हणून स्विकारव्यात हीच सदिच्छा.




Image may contain: 1 person, sunglasses, outdoor and nature




गणेश दादा शितोळे
(०७ एप्रिल २०१७)