माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

        कॉलेजकट्याचे अंतरंग 

(भाग १) 

कॉलेजची अॅडमिशन प्रोसेस


             


डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागून पंधरा दिवस होऊन गेले होते. डायरेक्ट सेकंड इअरची अॅडमिशनची प्रोसेस इंटरनेटद्वारे करण्यात आल्याने सुरवातीला जरासा ताण वाटत होता. कारण ही संपूर्ण प्रक्रियाच गोंधळात टाकणारी होती. परंतु मागिल वर्षी डिप्लोमाच्या प्रवेशाकरता नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या इंटरनेटद्वारे अॅडमिशनच्या प्रोसेसचे मित्रांसोबत सुट्टीत अर्ज भरले असल्याने सगळं हलंकसं वाटत होतं. एकंदरीत गेल्या तीन महिन्यापासून निकाल लागेपर्यंत दिवस फक्त फिरण्यात गेल्याने फारसं कंटाळवाणं वाटलं नाही.
सुट्टी पुण्यात मित्रांसोबत घालवली होती. पुण्यातील जवळपास सगळी कॉलेजेस पाहून झाली होती. सिंहगडच्या शाखा असो की मराठवाडा मित्र मंडळ कर्वेनगर असो, वाघोलीच्या जेसपीएम पासून ताथवडेच्या शाहू कॉलेजपर्यंत अन हडपसरच्या आवटे कॉलेजपासून अवसारीच्या इंजिनिअरींग कॉलेजपर्यंत सगळी कॉलेजेस पालथी घालून झाली होती. मी मला अॅडमिशन घ्यायला फिरत नव्हतो. सर्वच मित्रांना अॅडमिशन घ्यायचं होतं म्हणून अशीही सुट्टीच होती म्हणून पाहू म्हटलं कॉलेज म्हणून पाहिली. तसं मला इच्छा होती पुण्यातील कॉलेजलाच अॅडमिशन घ्यायचं. पण घराजवळच काष्टीला परिक्रमा इंजिनिअरींग कॉलेज होते. इतके दिवस बाहेरगावी राहून आता कंटाळा आला होता. थोडे दिवस गावी घरच्यांसह असावे असं वाटत होते आणि घरचेही इतके दिवस घराजवळ शिकण्याचा आग्रह करत असल्यानेच पसंतीक्रमात परिक्रमा नंतर फारसे पर्याय भरलेलेच नव्हते. सोबत परिक्रमाला अॅडमिशन घेतल्यावर लॅपटॉप मिळतो हे वेगळं आकर्षण होतंच.
७ सप्टेंबरला एकदाची कॉलेज प्रवेशाकरता जाहीर झाल्याची बातमी धडकली अन मी उसासा सोडला. दिवसभर याला त्याला फोन करून कोणाला कोणतं कॉलेज मिळालं या चौकशा करण्यातच गेला. सागर इंजिनिअरींग करणारच नव्हता. संतोष आणि स्वप्निलचा नंबर मराठवाडा मित्र मंडळच्या कर्वेनगरच्या कॉलेजला, नंदुचा ट्रिनीटी कॉलेजला, महेश आणि प्रचेता यांचा वाघोलीच्या कॉलेजला, आरतीचा कोंढव्याच्या सिंहगडला तर अबोली आणि प्राचीचा सिंहगडच्याच काशिबाई नवले कॉलेजला नंबर लागला होता. राहुलचा इंदापुरच्या कॉलेजला नंबर लागला होता. माझा अपेक्षेप्रमाणे परिक्रमा हा एकमेव पसंतीक्रम असल्याने तिथेच लागला होता. मी आणि राहुल सोडून सगळा मित्रपरिवार पुण्यातील नामांकीत कॉलेजला जाणार होते. 
कॉलेजच्या प्रवेशाची धावपळ, धांदल संपली मला वेध लागले कॉलेज सुरू होण्याचे. दुसऱ्याच दिवशी दादांना सोबत जाऊन अॅडमिशन घ्यायचं मनाशी नक्की केलं होत. त्या रात्री खरंतर मला झोपंच आली नव्हती. डिप्लोमाच्या पहिल्या दिवसापासून ५ मे ला अहमदनगर रेल्वे स्टेशनला सागर, राहुल, संतोष, नंदु, स्वप्निल आणि महेशचा घेतलेला निरोप सगळं क्षणभरात डोळ्यासमोरून तराळून गेलं. पाणावलेले डोळ्याने या जीवलग मित्रांचा निरोप रेल्वे प्रवासात सलील कुलकर्णीच्या “हे भलते अवघड असते” गीतच्या प्रत्येक शब्दासोबत डोळ्यातून वहात होता. मैत्री, आपुलकी, आणि बंधुप्रेम सर्वाची आठवण न विसरणारीच होती. राहुलच्या हातातून सुटलेला हात मला किंचितसा पाठीवर जाणवलाही. पदविका अभ्यासक्रमाची तीन वर्षे या मित्रांसह कशी गेली कळालंही नाही. अगदी त्यांच्या पहिल्या भेटी पासून प्रत्येक प्रसंग मनाच्या तैलचित्रावर उमटत होता. संदीप ठाणगेसोबत भांडणं झाली तेव्हा राहुलने  माझ्यावरचा झेललेला फटका अन बहिरा झालेला कान नकळत तोंडतून हुंकार सोडून गेला.
डिप्लोमा कॉलेज आणि मित्रपिवार जोडणारा अजून एक दुवा होता तो म्हणजे क्रिकेट. प्रसन्ना, अविनाश, नाना, सागर गडकर, रायकर, राहुल काकडे, गाढवे ब्रदर्स, परिक्षीत, सचिन, प्रशांत अशी बरीचशी टीम, त्यांच्यासोबत खेळलेल्या मॅचेस, सुरवातीला बॅट वरून केलेली दादागिरी, “डेव्हिड शेफर्ड” म्हणून कमावलेली पदवी, खुन्नसवर खेळलेल्या मॅचेस, साळी सर, चव्हाण सर, इढं, गुरव सर, शिंदे सर, जाधव सर यांच्या स्टाफ टीम सोबत खेळलेल्या मॅचेस, साजन ने  प्रत्येक  सिक्सला वडपाव म्हणून केलेली शतकी खेळी सगळं काही आठवून मन भरून आलं होतं. २००९ ची सुरवात आणि २००८ च्या शेवटच्या दिवशी सागर गडकरसोबत मनोज होलम आणि आम्ही केलेली करामत आठवून खळखळून हसलो. "महाराज" शब्द तर कानात भिनला होता.
शेवटच्या वर्षी सागरला विद्यार्थी प्रतिनिधी करण्याकरता केलेला आटापिटा अन अबोलीला विद्यार्थी प्रतिनिधी केल्यानंतर आमचंच राजकारण प्राचार्य केरकळ सरांनी सागर आणि  आमच्यावर उलटवल्याचा अनुभव  संमिश्र प्रतिक्रिया देणारा होता. "तुमची अक्कल म्हणजे आमचा शहाणपणा " असा संदेश प्राचार्यांपर्यंत पोहचवण्याकरता काळ्या टी शर्टवर छापलेले " Your Intelligence is Our Commonsense." ची घोषवाक्य, सिव्हिलला क्रिकेट सामन्यात हरवल्यानंतरची कवायत आणि "एकच दवंडी कोला गवंडी" म्हणत ठोकलेली आरोळी नकळत अंगात तोच जोश घेऊन आली होती. आरतीने गायलेलं "कजरा मोहब्बतवाला", नंदुने गायलेलं "गणदैवताय", आठवलं. मन्या आणि मोहन्याने साडी घालून केलेला अप्रतिम डान्स पुन्हा एकदा हसवून गेला.
कॉलेजचा प्रवास संपता संपता रात्री जागून केलेला अभ्यास, "ढॅण्डटॅढॅन" मुळं कंटाळवाण वाटणारं मॅनेजमेंट संतोषने शिकवलेल्या पद्धतीसह पुन्हा आठवले. संतोषच्या चारोळ्या, कविता, आणि गाणी विशेषत: “हा चंद्र तुझ्यासाठी” सगळं काही आठवत होतं. शेवटच्या दिवशी हॉस्टेलवर मनसोक्त केलेला डान्स पण न विसरणारा होता. अन जाता जाता शेवटच्या काही दिवसात भरलेली एकमेकांची स्लॅमबुक आठवली अन एकेका स्लॅमबुक भरतानाचे किस्से आठवायला सुरवात झाली. अगदी स्वत:च्या नावासोबत कॉलेजमधे एकतर्फी प्रेम केलेल्या मुलींची नावं टाकणयापर्यंत बरंच काही होतं त्यात. काहींची लाबंलचक यादी नको म्हणूनही सांगायला लागलं होतं. 
डिप्लोमाच्या या सगळ्या आठवणींसोबत उशी कधी ओली झाली होती कळंलंही नाही. या सगळ्या संस्मरणीय आठवणींना मनात साठवून मनात अनेक प्रश्न उभा राहिले होते. मी आणि राहुल सोडून सगळा मित्रपरिवार पुण्यातील नामांकीत कॉलेजला जाणार होते. राहुलही इंदापुरला म्हणजे तसा माझ्यापासून लांबच. जीवाला जीव देणारे सगळे मित्र दुरावल्याची खरी जाणीव तेव्हा झाली. अचानक मी एकटा पडल्याच जाणवलं. मनात प्रश्नांची वादळं उठतंच होती. नवीन कॉलेजला कसे शिकवतील, तिथलं वातावरण कसे असेल. आपण तिथं रूळून जावू का या असल्या प्रश्नांची चिंता कॉलेज घरापाशी अन तेही घरचेच असल्याने  नव्हतीच.
खरी चिंता वेगळीच होती. मनाला कायम राहून राहून एकच प्रश्न पडायाचा. 
"आयला, आपल्याला असं मित्रांच्या लवाजम्यात राहयची सवय. आता सगळे मित्र आपापल्या कॉलेजला निघून गेले. त्या जिवलग मित्रांसारखे मित्र भेटतील....?" 
हा एकच प्रश्न सारखा सारखा सतावत होता. माझी घालमेल सुरू होती. राहून राहून मीच माझ्या मनाला आधार देत होतो. 
"अरे किती दूर गेल्यात रे..? एक फोन केला तर तासात राहुल काष्टीत हजर. सागरला फक्त फोन करायचा उशीर. इथं तर आहेत सगळे तासाभराच्या अंतरावर. पुण्यात एक्सप्रेस मधे बसलं तर दीड तासात पुण्यात. इथं तर आहेत सगळे. आणि फोन नंबर आहे की, डोकोमोचा बॅलन्स असाही येतोच की ७०० मिनिटं महिन्याला. "  
नकळत माझं लक्ष त्यानिमित्ताने फोन कडं गेलं. खरंतर वाटत होतं राहुल, सागर, संतोष, नंदु एकेकाला फोन करावा. पण वेळ पाहिली तर पहाटेचे चार वाजून गेले होते. खुप उशीर झाला असल्याने सकाळ फोन करू म्हणत मोबाईल दूर सारून दिला. पंख्याच्या फिरत्या पात्यासोबत मनात विचारांचं वादळ घोंघावतच होतं. डिप्लोमाला अॅडमिशन घेताना अनेक स्वप्न पाहिली होती. कारण डिप्लोमा कॉलेजला जाण्यापुर्वी कॉलेज जीवन पाहिलं ते चित्रपटातूनच. ‘मोहबत्ते, जो जीता वही सिकंदर, मै हु ना, कुछ कुछ होता है’ मधून पाहिलेलं कॉलेज जीवन म्हणजे फक्त मजामस्ती. गाडीवर पाठीमागे बसायला एखादी मुलगी, कट्ट्यावर दादागिरी करायला मित्रमंडळींचा फौजफाटा अशा अनेक गोष्टी करण्याचा विचार करूनच पदविका अभ्यासक्रमा कॉलेजला अॅडमिशन केला होता. नंतर कळलं की चित्रपटात जे असतं तसं प्रत्यक्षात नसतं.
तीन वर्षाच्या या प्रवासात ही स्वप्न कुठल्या कुठे निघून गेली. अन न पाहिलेली अनेक स्वप्न साकार झाली. जीवाला जीव देणारे मित्र मिळाले. त्यांच्या साथीने जगलेला एक सुंदर आयुष्याचा टप्पा कधीही स्वप्नवत नव्हता. केवळ प्रेम करणाऱ्याच मुली मिळण्याची स्वप्न ही स्वप्नच रहातात. अनेक मुली भेटल्या. कोणीही त्या प्रकारातील भेटली नाही अन वाटलीही नाही. काहींशी चांगली मैत्री झाली. "हॅकर्स" आणि "व्हायरस" च्या साथीने मित्र भेटलेमैत्रीणी भेटल्या. आरती, प्रचेता, अबोली, पुजा यांच्यासारख्या मैत्रीणी मिळाल्या.
आयुष्यात सागर, महेश सारखे मोठे भाऊ मिळाले. समजून सांगणारा संतोष सारखा पाठिराखा मिळाला. राहुल सारखा जीव ओवाळून टाकावासा दोस्त मिळाला. अन हसतमुख चेहऱ्याने कायम आनंद देणारा नंदुसारखा मित्र भेटला. स्वप्निलसारखा लहान भाऊ मिळाला. भाई भाई म्हणणारी प्राचीसारखी बहिण लाभली. अनपेक्षित स्वप्नांची पुर्ती करणारा डिप्लोमाचा हा प्रवास इंजिनिअरींग कॉलेजला अॅडमिशन घेताना अनेक स्वप्न जन्माला घालणारा ठरला.
खरंतर विद्यार्थी प्रतिनिधी हा काय प्रकार असतो हे मला जोपर्यंत सागरला विद्यार्थी प्रतिनिधी करण्याकरता कॉलेजमधे सगळ्या मित्रांनी प्रयत्न केले तोपर्यंत मला माहितही नव्हते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात स्टेजवर बसणारी व्यक्ती. सागर तर विद्यार्थी प्रतिनिधी झाला नाही. परंतु त्यामुळे माझ्या मनात इंजिनिअरींग कॉलेजला जाऊन विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची इर्शा जन्माला आली. इंजिनिअरींग कॉलेजला अॅडमिशन घेऊन काय करायचं तर पहिलं स्वप्न होतं ते म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी होण्याचं. इंजिनिअरींग कॉलेजला अॅडमिशन घेऊन सागर सारखं होण्याचं स्वप्न होतं. एखादा ग्रुप स्थापन करून मोठा मित्र परिवार बनवून कॉलेजमधे नेतृत्व करण्याची इच्छा घेऊनच मी परिक्रमाला अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतला होता. डिप्लोमाला कॉलेज गाजवायचे राहून गेले होते. त्याची पुर्तता आता इंजिनिअरींग कॉलेजला करायची होती. एकप्रकारे ‘दादा’ होण्याचीच स्वप्न घेऊन मी पसंतीक्रमात परिक्रमा एकमेव नाव टाकले होते. पहाटेच्या चार पासून सकाळी आठ वाजता आईने हाक मारे पर्यंत हाच स्वप्नरंजनाचा कार्यक्रम सुरू होता.
कॉलेज प्रवेशाकरता जाहीर होण्याची तारीख अगोदरंच माहित होती आणि विशिष्ठ मुदतीत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने प्रवेशाची पूर्ण तयारी अगोदरपासूनच करून ठेवली होती. पैशाची व्यवस्था करून ठेवलेली होती. मी या अगोदर कधीही परिक्रमा पहिलं नव्हतं. जातायेता फक्त गेट पहायचो. पण नवीन कॉलेज असलं तरी डिप्लोमा इतकी चिंता वाटत नव्हती. एकटेपणा नव्हता. कॉलेजच्या गेटमधून आता आलो. अॅडमिशन प्रोसेस तळमजल्यावरच असल्याने जिना चढण्याचा त्रास वाचला. मुख्य इमारतीत इंजिनिअरींगच्या कार्यकारी कामकाजाच्या विभागात पोहचलो. सोबत वडील आलेलेच होते. कॉलेजला गर्दीही कमी होती. कॉलेज प्रवेशाकरता जाहीर झाल्यानंतर पाच दिवसाची मुदत असल्याने गर्दी नावाचा प्रकार नव्हतांच. शेवटच्या विभागामधे कॉलेज अॅलॉट झाल्याचा कागद दाखवला. सोबत कागदपत्रे जमा केली. पंधरा वीस मिनिटात पैसे भरून अॅडमिशन प्रोसेस पूर्ण झाली.
मी पावत्यांची जमवाजमव करत लॅपटॉपची चौकशी करत तिथेच थांबलो होतो. तितक्यात अॅडमिशन प्रोसेस पूर्ण एक मुलगा वडीलांसह आला होता. काही वेळ मी त्याला न्याहाळत होतो. तो अॅडमिशन प्रोसेस पूर्ण करण्याकरता शेवटच्या विभागामधे गेला. मी नोटीसबोर्डजवळ यंत्र इंजिनिअरींगला असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी वाचत होतो. काही नावं ओळखीची होती. वैभव कोकटे, रोहित जाधव ही त्यापैकीच दोन.
दोघेही माझ्या शाळेतील मित्र. रोहित आणि मी एका बाकावर बसायचो. वैभव माझा शाळेतील स्पर्धक असायचा. पहिल्या तीन क्रमांकवर आम्ही तिघे असायचो. त्यामुळे दोघांची नावं वाचल्यावर हायसं वाटलं. याव्यतिरिक्त बाकी यादीतही अनेक नावं ओळखीची होती. अभिजीत पाचपुते, सोनल गवते, अतुल पवार ही शाळेतील मित्रमंडळी कॉलेजमधे होती. त्यामुळे मित्रांचा ताण तर निघून गेला. सोबतंच माझ्यासोबत डिप्लोमाच्या काही मित्रांनाही परिक्रमा कॉलेज मिळाले होते.
प्रशांत पाचपुते, हरिभाऊ पांडुळे, उमेश निंबाळकर ही हॉस्टेलवरची मंडळी बऱ्यीपैकी ओळखीची होती. ते वगळता बाकी ओळखीचा असा किरण मोरे उर्फ पांगे होता. विकास कासर, संदीप सोलट, भूषण ही मला सिनिअर असणारी मंडळीही होती. अजून एक मेकॅनिकल इंजिनिअरींगचाच मुलगा परिक्रमाला अॅडमिशन घेणार होता. अमोल भालसिंग. डिप्लोमाला अ तुकडीत होता. हॉस्टेलवरच्या विक्रमचा मित्र म्हणून त्याच्याशी ओळख होती. पण डिप्लोमाला एका प्रसंगावरून त्याच्याशी बिनसलं ते कायचंच. तसा त्याच्याशी फारसा संबंध आला नाहीच.
माझ्यानंतर आलेला मुलगा पैसे भरून अॅडमिशन प्रोसेस पूर्ण करून बाहेर आला होता. तोही नोटीसबोर्डवरची मेकॅनिकल इंजिनिअरींगची यादी वाचत होता. थोड्या वेळ पाहून न पाहिल्यासारखं करून शेवटी मी बोलायला सुरवात केली.
"झाले का अॅडमिशन....?"
"झाले की,"
"कोणतं डिपार्टमेंट...?"
"मेकॅनिकल इंजिनिअरींग...!
मी मान हलवून फक्त होकार दिला.
"तुझं...?"
"मेकॅनिकल इंजिनिअरींगच"
"म्हणजे आपण एकाच वर्गात...!
"हो"
"कोणत्या कॉलेजला केला डिप्लोमा....?"
"गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, अहमदनगर"
मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणजे जणू लयं मोठं असल्यासारखं उगीचचा अहमपणा दाखवत उत्तर दिलं.
"मी जेएसपीएम वाघोली"
"बरं चल निघतो. नाव काय म्हटला तुझं...?"
"रोहित ननावरे"
"गणेश शितोळे"
"चल येतो, भेटू सोमवारी...!
"कधी पासून सुरू होतंय...?"
"माहित नाही, पण मी येतोय सोमवार पासून...!
"ठीक आहे, पहातो मी पण येईल सोमवार पासून...!
"बरं चल बाय, भेटू सोमवारी...!
मी त्या मुलाचा निरोप घेऊन कॉलेजबाहेर पडलो. गावात कॉलेजकरता काही खरेदी करायची होती. गावात रस्त्यालाच रोहितच्या घरी चक्कर मारून मी खरेदीला निघून गेलो.  एकंदरीत अॅडमिशन प्रोसेस पूर्ण झाली होती आणि माझा अधिकृतरित्या परिक्रमात अॅडमिशन झाला होता. कॉलेजमधे बराचसा जुना मित्रपरिवार असल्याने आता एकटेपणाचं ताण नव्हता. अॅडमिशन घेतल्याचं सगळ्या मित्रपरिवाराला कळवून मी घरी परतलो.




गणेश दादा शितोळे
(२५ फेब्रुवारी २०१७)


सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७


महेशचा साखरपुडा


                    खुप दिवसांनी जूने मित्र भेटणार म्हटलं की काल रात्री मनाला एकदम तरूण झाल्यासारखं वाटलं. म्हणजे मन म्हातारं झालं आहे असं नाही. फक्त रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातील, कामाच्या धावपळीनं विटलेलं मन जूने मित्र भेटणार हे मनातल्या मनात अनुभवताना एकदम ताजेतवाणं झाल्यासारखं वाटत होतं. अगदी काल रात्री उशिरा पर्यंत आज हा सगळा जूना मित्र परिवार आणि त्यांच्या सोबत जगलेलं एक विलक्षण आनंद देणारं आयुष्य आठवून कधी झोप लागली कळलंच नाही.
                    सकाळी सकाळी आकुर्डीच्या सिग्नलवर महेश(मामा) भेटला तेव्हा तो क्षण आमचा इंजिनिअरींगचा चार वर्षांचा प्रवास झपकन डोळ्यासमोर तरळून गेला. एकेक करत सगळे महेशच्या साखरपुड्याला निघाले तसंतसे माझ्या मनात या येणार्‍या प्रत्येकासोबतच्या आठवणींना पुन्हा पुन्हा आठवत होतो.
                    गाडी मजल दर मजल करत उल्हासनगरला पोहचण्यापर्यंत रखडलेल्या पण नव्याने लिहायला घेतलेल्या पुस्तकाबाबतीत काय काय विचारायचं हे चालूच होतं. सोबत विकास, राम आणि महेश (मामा) सोबत गप्पा सुरूच होत्या. एकमेकांचे समज, गैरसमज, एकमेकांविषयीची मतं अन मतांतरं, एकमेकांशी संपर्काच्या तर्‍हा, उधारीचे किस्से अन तुटलेल्या संवादाच्या कानगोष्टी अशा विविध विषयांवर मागे चाललेल्या रस्त्यासोबत चर्चेची गुर्‍हाळंही मागे पडत होती. खुप दिवसांनी आठवलेल्या त्या प्रत्येक प्रसंगातून एकेका व्यक्तीची वैशिष्टय़ अधिक प्रगल्भतेने बाहेर पडत होती. भाकाळगिरीच्या पलिकडचं काही या तीन तासात नक्की मिळालं. साखरपुड्याच्या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला भेटून तोच आनंद होत होता. 
"अरं तुला सांगतू........" पासून सुरू झालेला अन "तुझ्या माहितीसाठी सांगतू मह्या....." 
पर्यंतच्या संवादातील मंगेश आणि त्याची रांगडी भाषाशैली अजूनही कायम असल्याने आणि ती महेश (मामा) ने त्याच शैलीत बोलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनुभवता आला. साखरपुड्याचे मुख्य अतिथी असणारा महेश आणि त्याच्या चेहर्‍यावर असणारी निरागसता, साम्यंजसता स्वागतासोबत पाहिला मिळाली. सोबत जयदीप होताच. निरोप समारंभानंतर तब्बल तीन चार वर्षांनी भेटलेला रोहित अजूनही "डुडं"च होता. संयम, विनम्रता अन शांतता प्रत्येक शब्दासह अनुभवता आलं.
                    नुकत्याच हिमाचल, कुलू मनालीच्या ट्रीपवरून आलेला स्वप्निल, मित्र परिवाराचा आधारस्तंभ आणि अजूनही सहकारी मित्रांना जबाबदार न वाटणारा श्रीकांत (पाटील), चिरंजीवातून श्री झालेला निलेश आणि हसतमुख असणारा कृष्णा या भेटलेल्या प्रत्येकासोबत काॅलेजच्या चार वर्षांतील आठवणी मनात साठवून एकमेकांची खेचाखेची करत, ग्रुप ग्रुप खेळत अन रूम पार्टनर म्हणून वेगळा फोटो काढून घेत सगळ्यांचे दोन अडीच तास कसे उलगडले समजलं नाही. जेवणातील बाकी मेनूपेक्षा बीट खाण्यात आणि खायला घालण्याचीही सगळ्यांनी मजा घेतली. आडेवेडे घेत उगीचच केलेला उखाण्यातील नावांचा आग्रह अन लग्नापूर्वी करून घ्यायची उजळणीचे सल्ले देत महेशचा लांबवलेला निरोप घेत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
                    दुपारच्या जेवणानंतरचा प्रवास म्हणून महेश आणि राम मागच्या बाकावर कधीचेच झोपले होते. माझ्याही अधूनमधून डुलक्या चालूच होत्या. पण एका खड्ड्यात गाडी आधळल्यानंतर झोप उडालीच. यानंतरच्या प्रवासात मनात फक्त विचारांच द्वंद्व सुरू झालं होतं. अगदी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यातच कठीण जात होतं. माणसाला जगाशी खोटं बोलता येईल पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलता येत नाही. साखरपुडा, लग्न अमुक तमुक विधी व तत्सम गोष्टी आवडत नसूनही जाण्याचा घेतलेला निर्णय हा एका विशिष्ट वेळेपर्यंत रूचणारा नव्हता. पण खूप दिवसांनी सगळ्या मित्रपरिवाराला भेटण्याची संधी सहजपणे घालवण्याचा कोणताही विचार मनात आला नाही आणि मी श्रीकांतने सांगितल्याबरोबर होकार दिला.
                    दुसरा प्रश्न होता. चहा घेण्याचा..? सहसा माझा आणि चहाचा प्रसंग जरा कमीच येतो. गेल्या सहा महिन्यांत अपवादात्मक परिस्थितीत पण न घेतलेला कपभर चहा आज मित्रांसोबत काॅलेजच्या दिवसांची आठवण करून देणारा वाटला. जणू जब मिल बैठेंगे सब यार, हम तुम ओर एक कप चाय असंच झालं आणि मागे जात एकदम काॅलेजच्या आठवणीत मग्न होत कॅन्टीन मध्ये चहा पित बसल्याचंच जाणवलं. अगदी जीभेला चटका बसला तरी आज तो जाणवला नाही.
                    आजचा दिवसच असा संस्मरणीय अनुभव देणारा होता. आयुष्यात खूप काही बदललं. काही सवयी सुटल्या. पण मित्र अजूनही तसेच आहेत. त्यांची सवय सुटता सुटेना आणि सुटू नये हीच इच्छा आहे. कारण काही सवयी न सुटण्यासाठीच असतात. बहुतेक त्यामुळेच गहिवरलेल्या विचारचक्रात अडकलेल्या मला "दादा आज लय गप गप " असं म्हणून हटकल्यावरही स्पष्टपणे बोलण्याची सवय असूनही बोलता आलं नाही. आणि याच सगळ्या भावना भावनांना मांडण्याचं हे माध्यम मला सोयीचं अन बरं पडतं. निदान माझ्या मनाशी तरी मी हे नक्की स्पष्टपणे बोलू शकलो. हे असे दिवस पुन्हा पुन्हा यावेत हीच अपेक्षा आहे. हार्ले डेव्हिडसन घेऊन एक ट्रीप या सर्व मित्रपरिवारासोबत जावी अशाच इच्छा आकांशा ठेवत शेवटी थांबलेला परतीचा प्रवास सुरू झाला.
                    बाकी महेशचा साखरपुडा अविस्मरणीय अनुभव देणाराच होता. दिवसाच्या प्रवासाचीही सुरवात एकत्रित झाली नाही अन शेवटही याची खंत मात्र नक्की मनात राहिली. बाकी मित्रांमधील गैरसमज दूर झाले असतील तर आनंदच आहेत. झाल्या, गेल्या त्या न रूचणाऱ्या गोष्टी आठवून अबोला न ठेवता मित्र परिवारातील संवाद कायम रहावा. आज काहींशी होणार्‍या भेटी राहून गेल्या याचंही दु:ख आहेच. मैत्रीतील व्यवहार विश्वासाइतकेच जपले जावेत. पण मैत्रीत व्यवहार न आणता ती जपली जावी हीच इच्छा आहे.
                    जाता जाता जाग्या झालेल्या काॅलेजच्या आठवणी, पहिल नसलेलं प्रेम अन बरंच काही, काॅलमधल्या तिच्या गोष्टी आणि शेवटी ती सध्या काय करतेय हे आठवत घेतलेला निरोप संस्मरणीय आहेच. धन्यवाद मित्रांनो हा खुप दिवसांनी असा आनंदी दिवस घालवता आला की जेणेकरून रोजचं धावपळीचं जगणं विसरून जगता आलं. शेवटी धन्यवाद विकास आणि महेश सुखरूपपणे पुन्हा पुण्याला माघारी परत आणलं.


 (महेश भाऊ वहिनींच्या हातात साखरपुड्याची अंगठी घालताना....)







 (खुप दिवसांनी मित्र परिवार भेटल्यानंतरच्या निवांत क्षणी काढलेली सेल्फी, महेश बांडे, श्रीकांत नागवडे पाटील, महेश वारे, विकास डोंगरे, कृष्णा साठे, निलेश कोलते ( स्वहस्तछायातिचित्र हा मराठी शब्द काळायचा नाही.)....)





 (महेश भाऊंच्या साखरपुड्याला आलेल्या पाहुण्याचा सन्मान करताना अन स्विकारताना विकास डोंगरे आणि श्रीकांत नागवडे पाटील....)







गणेश दादा शितोळे
(१९ फेब्रुवारी २०१७)


बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७


प्रेम दिवस...


 
                            आज व्हॅलेन्टाईन डे म्हणजे प्रेम दिवस. कुणाला होकार तर कुणाला नकार मिळाला असेल. पण हा दिवस आला की संस्कृती रक्षणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्या पिलावळी डोकं वर काढतात.  आपली संस्कृती म्हणजे काय याचा अनेकादा प्रश्नच पडतो. संस्कृती, अमुक, तमुक या फंदात मला मुळीच पडायचंच नाही. प्रेम हे प्रेम आहे आणि ते तसंच असावं. संस्कृतीच्या नको त्या बंधनात ते अडकवू नये. रोमिओ ज्युलियट, लैला मजनू हेच फक्त प्रेम आहे असंही काही नाही.
                            पाडगावकर उगाच म्हणत नाहीत की प्रेम हे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. प्रेम हे प्रेमच असते. तुमच्यात माझ्यात तिच्यात त्याच्यात मनाच्या कुठल्याशा कोपर्‍यात असणारं. मैत्री, जिव्हाळा, आनंद, समाधान याहून वेगळं प्रेम काय असतं. एखाद्या व्यक्तीचा सहवास मैत्री, जिव्हाळा, आनंद, समाधान देत असेल तर प्रेमापलिकडे ते काय असते. मुलगा मुलगी अन नवरा बायको पलिकडेही प्रेमाची परिभाषा आहेच की. केवळ मुलाने मुलीच्या प्रेमात पडणे किंवा मुलीला मुलगा आवडणे हेच फक्त प्रेम आहे असंही नाही. आज अनेकांची दर्दभरी स्टेटस वाचायला मिळाली. लग्न झालेल्या मित्रांच्या नशीबवान असल्याचे परावेही मिळाले अन सल्लेही दिले गेले. व्हॅलेंटाईन डे आणि तोही एकट्याने साजरा करणे म्हणजे मोठा गुन्हा असल्यासारखे अनेकांना आज वाटल्याचंही जाणवलं. फिलींग सॅड ड्यु टू सिंगल. अमुक तमुक बरेच स्टेटस होते. ही मंडळी नाराज का तर व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला कुणी मिळालं नाही. मग प्रश्न पडतो की यांच्या आयुष्यात अशी एकही व्यक्ती नाही की जिचा सहवास मैत्री, जिव्हाळा, आनंद, समाधान देतो.
                            दुसर्‍या बाजूला अशीही माणसं पहायला मिळाली की ज्यांनी आपला व्हॅलेन्टाईन डे आपल्या वेगळ्या गोष्टींसोबत साजरा केला. एक कवीमित्राने आज त्याच्या भावनांना वाट करून देत आपल्या मित्रपरिवाराला त्यांच्या आयुष्यात व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी व्यक्ती मिळावी याकरता कविता लिहून दिल्या. अधूनमधून माझ्या बाबतीतही हे असेच घडले आहे. आजवर सतरा जणांनी माझ्या कवितांचा, लेखांचा वापर आपली नाती घट्ट करण्याकरता वापरल्या. काहीजण आजही फोन करून अर्थ नात्यांचा विचारत असतात.
माझ्या आयुष्यातही जसा माझा मित्र परिवार आहे तसाच पुस्तक, साहित्य परिवार आहे. शब्दांशी माझी घट्ट मैत्री आहे. त्यांच्या सानिध्यात मला आनंद,सुख, समाधान मिळते. आज व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने ह्या साहित्य परिवाराच्या सानिध्यात येण्याची संधी मिळाली.


गणेश दादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१७)




सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

 

मितवा...!!!


                        त्याच्या बद्दल काय लिहायचं आणि काय राखून ठेवायचं हा खरं तर प्रश्नच आहे. एकदम मितवा व्यक्तीमत्व.
                      कॉलेजमधील अभ्यासाव्यतिरिक्त कार्यक्रमात शिक्षकांच्या पुढे पुढे करणारा तोच कॉलेजबाहेर कट्ट्यावर मित्रांच्यात बसणारा मित्र.
                        स्वतः कोणत्याही वादात न पडता मित्रांनाही वादात न पडण्याचे तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ.
                        अनेक मित्रांना मैत्रीतून प्रेमाची वाट दाखवणारा वाटाड्या.
                     स्वतःच नाव अनेक जणींशी जोडण्याची मित्रांना संधी देणाऱ्या आमचा मित्र चि. रोहित ननावरे उर्फ मित्र परिवारात लोकप्रिय गोट्या याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
                      या आमच्या मित्राला लवकरच चिरंजीव वरून श्री म्हणण्याची संधी मिळावी हीच सदिच्छा. बघू दोन दिवसांनी येणार्‍या यावर्षीच्या व्हॅलेंटाईनला तरी मित्रांनी नाव जोडलेल्या एखादीशी बोलतोय का ते...
की नवीनच नाव ऐकायला मिळतंय.


Image may contain: one or more people and outdoor
(आकाशात झेप घेती पाखरे....‍(
(भावाची एकच नजर बास भो.....)

Image may contain: 2 people, people smiling, outdoor
(दौण्डच्या उड्डाणपुलावर रोहितभाऊंनी घेतलेली  एक सेल्फी...)

Image may contain: 8 people
(शिवराज्याभिषेकसोहळ्यात छत्रपती संभाजीराजांसह रोहीत भाऊ आणि श्रीकांत नागवडे पाटील)


गणेश दादा शितोळे
(१२ फेब्रुवारी २०१७)



रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७


 मला कवी होण्याची घाई नाही.




गेले काही दिवस बरंतसं काही लिहिण्याचं राहून गेलं. म्हणजे हे मला वाटत नाही तर माझ्या अनेक मित्रांची आता ही नेहमीची तक्रार झालीए की, "दादा आजकाल काही लिहीत नाही का... ?, आजवर कोणाचं कॉपी पेस्ट होतं का...? संपलं का कवी लेखक असणं...? " असे प्रश्न विचारल्यावर मलाही कधी कधी असा प्रश्न पडतो की खरंच आपण लिहायचं थांबवलंय का...? याच प्रश्नावर विचार करताना हा लेख लिहायला घेतला.
.
कवी सौमित्र म्हणतो ते आता मला पटतंय...
मी तर कविता लिहितोच आहे. आता माझा दुसरा कवितासंग्रह येत आहे.  बाउल नावाचा. हा आता तो दहा वर्षांनी येतोय हे खरंय. पण आपल्याकडे दरवर्षी एका कवीचा एखादा कवितासंग्रह प्रकाशित झाल्याशिवाय तो कवी आहे असे समजतंच नाहीत. मी एका पुस्तकाने सर्वांना बऱ्यापैकी माहित झालो आहे. कवी होता येत नाही. कवी असतो किंवा नसतो. मला कवी होण्याची घाई नाही.
 .
गेल्या काही काळापासून विविध अंगाच्या कविता, वेगवेगळ्या आशयाचे लेख मी लिहितोय. त्यामुळे मित्रपरिवाराच्या , वाचकांच्या अपेक्षा वाढतात हे काही चुकीचं नाही. पण  कविता लिहिण्यावरच प्रश्नचिन्ह उभा रहावं म्हणजे हे जरा अती होतं. कविता म्हणजे काय कोणाचं वाचलं आणि पाहून लिहिणे हा प्रकार नसतो.काहींना तर कविता म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे असं वाटतं की शाळेत निबंध लिहावा. मध्यंतरी मला एक प्राध्यापकांनी विचारले की तुझा छंद कोणता...? मी उत्तर दिले, लिखाण. कविता, लेख लिहिणे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती. कविता...? अरे हे तर आम्ही शाळेतच लिहायचो. " एकंदरीत त्याचा म्हणण्याचा आवाका कविता लिहिणे म्हणजे फालतुपणा आहे की जो शाळेत असताना केला जायचा. आणि त्यातून तितकासा पैसा मिळत नाही हा दुसरा उद्देश. कदाचित शाळेत कविता फालतुपणा म्हणून लिहितही असावेत. पण मला कविता ही तितकीशी सोपी वाटत नाही.
.
कविता म्हणजे काय ही मला अजूनही न उमगलेलं रहस्य आहे. मंगश पाडगावकरांच्या कविता वाचल्या की वाटतं कविता म्हणजे अगदी सुलभ आहे. विंदा, इंदिरा संत, अरुणा ढोरे यांच्या कविता म्हणजे कवितेचं वेगळं अलंकारिक रूपडं. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या की अनेकांची नाकं मुरडतात. पण त्यातील तळमळ हा कवितेचा आत्मा भासतो. अलिकडच्या काळातील म्हणायचं झालं तर संदिप खरे, किशोर कदम (सौमित्र), गुरू ठाकुर, स्पृहा जोशी यांच्या कविता म्हणजे मनावर विर्विवाद गाजवलेलं वर्चस्व. नागराज मंजुळेचं उन्हाच्या कटाविरूद्ध म्हणजे एकदम सहज अन सोप्या भाषेतील साज. दासू वैद्य, इंद्रजित भालेराव यांच्या कविता म्हणजे अस्सल ग्रामीण शैलीतलं लेखन. अशा विविधअंगी कविंच्या कवितांमधून उमजलेले कवितचं रहस्य, कवितेची व्याख्या आणि आपण मनात ग्रह करून ठेवलेली व्याख्या तपासली की नक्की कवितेची महती समजते अन फालतुपणाची व्याख्याही समजते.

.
दुसरी गोष्ट ही की आयुष्यात पैसा सोडून अनेक गोष्टी आहे. पैसा शारीरिक सुख देईन. पण आयुष्यात जोपासलेले हे छंदच मानसिक सुख, आनंद देणारे ठरतात. आनंदाची व्याख्या नेमकी काय हे जगातील कोणताही माणूस छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण ती व्यक्तीनुरूप बदलते. बाबा आमटे यांना आनंदवनातील कुष्टरोग्यांच्या सेवेत गवसलेला आनंद समजून घ्यायला पैसा, स्वार्थिपणा सोडायला लागतो. महामानव उगाच घडत नाही.
नुकतीच युटुबवर स्पृहा जोशीची "कल्याण वेध" मधील मुलाखत पाहिली. कॉलेजमधे कविता लिहीताना तीला तिच्या शिक्षकेने सांगितेलेली एक गोष्ट नक्कीच मनाला पटणारी आहे. "स्पृहा, आता लिहणं थांबव, वाचायला सुरवात कर. वाचन वाढवं. त्यातून तुझ्या अधिक अधिक सुंदर लिखाणाला वाव मिळेल. " त्याची फलनिश्पती आपण आज पहातोच. लोपमुद्रा नंतरही स्पृहाच्या दर्जेदार कविता प्रकाशित होतंच आहेत .'किती सांगायचंय मला' सारख्या काही कविता चित्रपटात गाणी म्हणूनही गायली गेल्या.
.
सध्या हीच वाचन वाढवण्याची गोष्ट मनावर घेतली. आहे. कामाच्या  व्यापात तितकासा वेळ मिळत नसला तरी जो काही वेळ मिळतो त्यातून पुस्तकं वाचतोच. काही ब्लॉगवरच्या कविता पोस्ट नक्कीच विचार करायला लावणाऱ्या असतात. ट्विटरवासीयांच्या मराठी चळवळीने देखील यात अजूनच भर पडते आहे. लिखाण पुर्णपणे थांबवलं असंही नाही. परंतु आता संख्येने जास्त नको तर वैशिष्टपूर्ण असं काही लिहिण्यावर भर आहे. तसंही कविता म्हणजे उगाच ओढून ताणून लिहिण्याची गोष्ट नाही. शब्द सुजले की कविता सहजतेने होते. त्याला थोडा वेळ द्यायला लागतो. काहीकाळ मनातील विचार कुठे एका जागी स्थिर करावे लागतात. लहाणपणी शाळेच एक धडा होता. लेखक आठवत नाहीत. पण त्यामधील गृहस्थाला दाढी करायला बसले की काही नवीन आठवायचे आणि कविता तयार व्हायची. पण म्हणून तो कविता लिहायची म्हणून दिवसदिवस दाढी करत बसत नव्हता. मीही गाडीवर एकट्याने प्रवास करत असलो की नकळत ओठांवर काहीना काही गुणगुणत रहातो. मग ओघाने कधी त्या गुणगुणण्याची चारोळी कविता होऊन जाते तेच समजत नाही.
.
काही महिन्यांपूर्वी व्हाटसअप ग्रुपवर आलेला एक छानसा लेख मी फॉरवर्ड केला होता. नेहमी माझ्या पोस्ट कडे दुर्लक्ष म्हणणयापेक्षा हेटाळणी करत न वाचताच सोडून देणाऱ्या मित्रांचे नेमके त्यादिवशी वेळ काढून फोन आले. प्रत्येकजण त्या लेखाचं कौतुक करत होते. भलेही ती मी लिहिलेला नव्हता तरीही. त्या एका लेखाने अनेक मनांना विचार करायला लावला. त्याचवेळी एक मित्राने सोबत अशीही प्रतिक्रिया दिली की, "दादा, लेख नक्कीच छान होता. पण जरा लहानशा पोस्टमधे लिहिता आला असता ना. पुढच्या वेळी पासून तरी प्रयत्न करा. नाही, खुप मोठे मेसेजस वाचणे टाळायला लागतो. " मीही त्यावेळी होकारात होकार मिळवला. पण मला आजवर हा प्रयत्नही जमला नाही. कारण कविता असो किंवा लेख संपुरण लेखनालाच शाळाकॉलेजसारखं अमुक ओळीत लिहा, तमुक शब्दात लिहा असं बंधन घालून घेणे कधी जमलंच नाही. लेखन म्हणजे मला मुक्तछंद वाटतं. मुक्त म्हणजे स्वैर निश्चित नाही. पण बंधनात अडकेल असंही नाही. कविता लिहायची म्हणजे मग उगाचाच काहीही आशय नसलेले शब्द जोडून यमक करण्याचा प्रयत्न करणे हा अट्टहासच चूकीचा आहे. नागराज मंजुळेच्या कविता वाचल्या तर कुठे यमकांची आवश्यकता पडलली दिसत नाही. नामदेव ढसाळांच्या कविता म्हणजे सरळ सोपी. त्यामुळे मुक्तपणे लिहिण्यच्या प्रयत्नातून काही चांगले लिहिले जाईल.
.
काही गोष्टींवर लिखाण सुरू आहे. काही मित्राकडून संग्रहीकरण सुरू आहे.
शासकीय तंत्रनिकेन महाविद्यालय, अहमदनगर मधील दिवसांवर आधारित कॉलेजच्या कट्ट्यावर...
हॅकर्स च्या सोबतच्या आठवणींवर आधारित  वेगळ्या वाटेवरचे मित्र...
मा. ना. श्री बबनरावजी पाचपुते ट्रस्टचे परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय, काष्टी मधील दिवसांवर आधारित अंतरंग...


गणेशदादा शितोळे
(१२ फेब्रुवारी २०१७)