माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

✍✍✍  फ्लेक्स आणि विद्रूपीकरण ✍✍✍


राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एक वाक्य कायम असते 

आमचे मार्गदर्शक अमुक अमुक....

प्रश्न पडतो की या राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना नेमके काय मार्गदर्शन केलेले असते..?

निवडणुकीला पैसे कसे वाटायचे...?

गावपातळीवर समोरच्याशी भांडणं कशी करायची...?

पातळी सोडून आरोप कसे करायचे..?

लोकांच्या पैशावर कसा डल्ला मारायचा...?

शासकीय मालमत्तेची तोडफोड कशी करायची...?

मतदारांची पळवापळवी कशी करायची...?

लोकांना थापा कशा मारायच्या...?

अशी भरपूर मोठी यादी असावी बहुतेक म्हणूनच मोठ मोठ्या फ्लेक्स द्ववारे विद्रूपीकरण करत 
मार्गदर्शक झळकत असतात....





गणेशदादा शितोळे
(३१ ऑक्टोबर २०१६)


✍✍✍ दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टी ✍✍✍


माणुसकीचे दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी माझा माणूस म्हणून कोणताही संबंध नाही. ना याचा आनंद ना सुख शांती. 

                          माझा मेळघाट अन्नावाचून उपाशी पोटी झोपतोय अन मी इथे त्या आनंदात फटाके फोडून तृप्त होतोय हे शक्य नाही. त्या माझ्या बांधवांना दोन वेळचं अन्न मिळेल त्यादिवशी खरी दिवाळी. बाकी प्रथा परंपरा केवळ निरर्थक. ज्या दिवशी घराचा उद्धार करणार्‍या लक्ष्मीला गुलामाप्रमाणे वागवणार्‍या पुरूष प्रधान संस्कृतीची होळी होईल आणि घराघरात मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात येईल त्यादिवशी खरे लक्ष्मीपुजन. बळी राजाला पातळात (या गोष्टीवर विश्वास नाही. परंतु असे घडलेच असेल तर) घातले त्याच दिवशी राजा असणारा शेतकरी गुलाम झाला. बळीला पर्यायाने शेतकऱ्यांना आत्महत्येच्या पातळात ढकलणार्‍या प्रवृत्ती संपून हा शेतकरी ज्या दिवशी राजा होईल अन खरंच बळीच राज्य येईल तोच दिवस खरी बालप्रतिपदा. ज्या दिवशी स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू न समजता मानाने सन्मानाने माझ्या प्रत्येक भगीनीला सुरक्षिततेने जगता येईल तीच खरी भाऊबीज. तोपर्यंत माणुसकीचे दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी माझा माणूस म्हणून कोणताही संबंध नाही. ना याचा आनंद ना सुख शांती.

                                माणुसकीचे दिवाळे काढणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी माणसाचा संबंध नाही. माझ्या बांधवांकडे शरीराला झाकण्याइतपत कपडे नाहीत म्हणून मला सुटाबुटात रहाण्याचा अधिकार नाही म्हणून केवळ पंचा गुंडाळून राहणारे असा गांधीबाबा होणे आपल्याला शक्य नाही. माझ्या बांधवांना दोन वेळचं अन्न मिळत नसताना मला तृप्तीचा ढेकर देण्याचा अधिकार नाही म्हणत एकवेळ जेवण करणारा भीमराव होणे आपल्याला शक्य नाही. परंतु या महामानवांचे विचार घेऊन जगणे सहज शक्य आहे. 

एक दिवा माणुसकीकरता...

एक दिवा माणूस होण्याकरता.

स्वतःमधला माणूस तसाच तळपत ठेवा.

गणेशदादा शितोळे
(३१ ऑक्टोबर २०१६)


✍✍✍ राष्ट्रीय एकता दिवस ✍✍✍


आज राष्ट्रीय एकता दिवस. आजच्या दिवशी अनेकांना आपण सगळे बांधव असल्याचे पार उचंबळून येईल. रोज प्रतिज्ञा म्हणून आम्हाला फरक पडला पडला नाही तर एका दिवसाने काय फरक पडणार आहे. पण याचा मला फरक पडतो. आम्ही बांधवच होतो आहोत आणि रहाणार. आमच्या सर्वांच्या शरीरात रक्त आहे आणि त्याच रक्ताने आम्ही बांधव आहोत. (हे बरंय की अजून रक्ताने तरी रंग बदलला नाही. भगवा, हिरवा निळा पांढरा या गर्दीत न जाता लालपणा टिकवून आहे.) परंतु वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत या सारख्या अनेक गोष्टींनी आम्ही आमच्याच बांधवांना दूर लोटले आणि आमची प्रतिज्ञा केवळ म्हणण्यापुरती उरली. मुखातून जन्मलो म्हणून अमक्या वर्णाचा, अजून अमूक तमूक म्हणून अमक्या वर्णाचा याचा शोध लावणारांना खरंतर नोबेलहून अधिक मोठं बक्षीस मिळायले हवे होते. पण आमच्या सारख्या बुद्धीप्रामाण्यवाद अन वैज्ञानिक दृष्टिकोन मानणार्‍यांना मात्र हे पटूच शकत नाही. प्रत्येक माणूस आईच्या पोटी जन्म घेतो. प्रत्येकाला शरीर असते, अवयव असतात, ज्ञानेंद्रीय असतात. अमुक वर्णात जन्माला आलो, तमक्या धर्मात जातीत जन्माला आल्याने तोंडाऐवजी दुसरीकडून खाण्याची सोय आहे असं काही नाही. वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत या सारख्या अनेक गोष्टी फक्त माणसाला गुलाम करण्याची सोय म्हणून करण्यात आलेल्या उठाठेवी आहेत. रस्त्यावर अपघातात तडफणारी व्यक्ती बघून माझ्यातला माणूस जागा होत नसेल तर माझ्या माणूस असण्याला अर्थ नाही. कारण माणूस होण्याकरता अडसर येतो तो याच गोष्टीचा. वर्ण, जात, धर्म, पंथ, प्रांत. या माणसात भेद करणार्‍या प्रत्येक जळमटांना झुगारून झटकून माणूस व्हा. त्याच दिवशी आम्ही सगळे बांधव असल्याची भावना मनात जन्माला येईल.

माणूस व्हा अन माणूस म्हणून जगा.



गणेशदादा शितोळे
(३१ ऑक्टोबर २०१६)


शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

एक वेडी मैत्रीण...!!!



ती आहे एक वेडी मैत्रीण,
माझ्यावर कविता कर कर म्हणणारी...
पण तिच एक कविता आहे,
कधीही समजूच न शकणारी..

ती आहे एक सोशल नेटवर्किंग साईट,
कायम ऑनलाईन राहत टचमधे रहाणारी...
निवडक माणसांशी चॅटिंग करत,
दुसर्‍यांना कायम बिझी दाखवणारी...

ती आहे एक अल्लड मैत्रीण,
जराशी लाजरी अन नाजूक हसणारी...
तिचं हसूच एक स्मित आहे,
जणू किंचितशा गालावरच्या खळीत सामावणारी...

ती आहे एक कुरमुजलेलं मैत्रीच पानं,
आठवणींच्या वहीत जपून राहणारी...
मैत्र परिवारात असते इतकी मग्न,
जणू भेटलेल्या कित्येकांच्या मनात घर करणारी...

ती आहे एक वेगळ्याच स्वभावाची  मैत्रीण,
प्रत्येकाशी मोकळेपणाने वागणारी...
हीच तर खरी तिची ओळख आहे
जणू नावाप्रमानेच सगळ्यांशी स्नेह ठेवणारी...







गणेश दादा शितोळे
(७ ऑक्टोबर २०१६)



मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

सांगा मी काय कमावलं...!!!

 

नोकरी लागली अन मुक्त आयुष्य,
वेळेच्या बंधनात अडकून गेलं...
करीअरच्या नावाखाली सगळं सेटलं झालं पण,
सांगा मी काय कमावलं...
.
पैसा यायला लागला पण,
मी रोजचं समाधान गमावलं...
नोकरी लागली चांगलं झालं पण,
सांगा मी काय कमावलं...
.
पोझिशन वाढली तसं तसं,
आपलं वाटणारं एकेक सुटत गेलं...
स्टेटस पोझिशन्सची प्रगती झाली पण,
सांगा मी काय कमावलं...



गणेश दादा शितोळे
(४ ऑक्टोबर २०१६)