माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ३० मार्च, २०१६


तुझी नव्हती का कोणी गर्लफ्रेंड...

                            आजच्या दुपारच्या लंच टाईम नंतर सगळ्या मित्रांचा टाईमपास म्हणून असाच विषय सुरू होता. अन याच विषयावरून गर्लफ्रेंड वर गाडी घसरली. "तुला ही ट्राय करायला हरकत नसावी" असं म्हणत उगाचंच मला चिडवण्याचा एक प्रयत्न सुरू होता अन मी फक्त एक स्मितहास्य देऊन तो विषय वरच्या वरच परतावत होतो. कारण जुन्या जखमांना फुंकर घालून पुन्हा एकदा जाग्या करायच्या नव्हता. मी बर्‍याचदा असे करत राहिलो अन शेवटी लंच टाईम संपलाच. आता तरी हा विषय संपेल अशी अपेक्षा ठेवून मी कामाला सुरुवात केली पण पुन्हा एकदा एक मित्र तिथेच आला. पुन्हा तोच विषय अन विचार. भावाने एकेक फोटो दाखवत सरळ मुद्द्यालाच हात घातला.
"ही डिग्री फस्ट यीअरला असतानाची, ही अकरावी-बारावीच्या वेळी असणारी, ही बघ अजून एक फस्ट यीअरला दोन दोन गर्लफ्रेंड होत्या. सध्या हिच्या सोबत चालू आहे. पण आपल्याला हिच्याशी लग्न करायला आवडेल. जरा घराचा प्रॉब्लेम आहे. हाय लेव्हल स्टेटस आहे, अमक्याची पुतणी आहे, उगाच मार खायला लागायचा. तुझी नव्हती का कोणी गर्लफ्रेंड...?"
                       फोटो दाखवत घसरली ना गाडी माझ्यावर. 

"गर्लफ्रेंड असं नाही म्हणणार मी, पण हो मैत्रीणी म्हणायच्या तर मला भरपूर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आमच्या ग्रुपमधे अनेक अफेअर झाली अन तुमच्यासारखीच मोडली सुद्धा. पण माझ्या बाबतीत बोलायचं तर अजून कुणी कुणाला प्रपोज वगैरे करण्याचा प्रश्नच आला नाही. हा कोणी भेटली तरी आम्ही दोघंही निश्चत वेळ निर्णय घेऊ. " 

                       माझ्या या मतावर भाऊ खुश झाला ना. त्याला आश्चर्य वाटले सहा वर्षे एकत्र असल्याचे. नंतर मग हळूहळू तो विषय मागे पडला अन आम्ही कामाकडे वळालो. पण हा विचार डोक्यातून जाणार तो विचार कसला. भुंगा लागल्यासारखा चिकटून बसला. इतका की संध्याकाळी परतीच्या प्रवासात बाईकवर दुसरं काही डोक्यातच नाही. म्हणून हा लेखाचा खटाटोप. 
                       खरंतर जेव्हा मित्र म्हणाला ना की आपली आजवर अमुक इतकी अफेअर झाली अन इतक्या जणींवर प्रेम होतं तिथंच आपल्याला त्याच्या मनात असणारी प्रेमाची व्याख्या खटकली. प्रेम ही काही औषधी गुणधर्म असणारी गोष्ट नव्हे की ज्याला काही एक्सपायरी डेट वगैरे असते. किंवा आत्ता खाल्ली की सहा महिने त्याचा उपयोग मग पुन्हा सहा महिन्यांनी डोस घ्यायचा..?
आपण फक्त म्हणत असतो की मी अमुक एका व्यक्तीच्या प्रेमात आहे. किंबहुना ती व्यक्ती आवडते. आता आवडणार्‍या सार्‍याच गोष्टींच्या आपण प्रेमात पडतो असेही होत नाही अन प्रेम करतो असंही होत नाही. मग प्रेम म्हणजे नक्की काय...?
कधी समजावं आपण प्रेमात पडलोय...?
                             अनेक जण अगदी मोठे लेखकही म्हणतात की मला लव्ह अॅट फस्ट साईट झाले आहे. पण मला वाटतं नाही की असं कधी होत असेल. अगदी पहिल्या नजरेत कोणावर आपले प्रेम जडेल. आकर्षण असणार हे नक्की. पण प्रेम म्हणता तर त्यावर शंका आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं तर ती व्यक्ती आपल्याला आवडते. हळूहळू त्या व्यक्तीचे आकर्षण वाढत जाते. आता हे आकर्षण पण वेगवेगळ्या प्रकारचे असते. म्हणजे काहींना शारीरिक आकर्षण असते. लव्ह अॅट फस्ट साईट प्रकार यातलाच. काही व्यक्तींचे विचार आपल्याला आवडले की आपण त्या व्यक्तीकडे खेचलो जातो. काही वेळा आपल्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते अन ती भरून काढण्याचा प्रयत्न करणारी एखादी व्यक्ती आपल्याला भेटते अन आपण तिच्या कडं आकर्षित होत जातो. या तिन्ही आकर्षणाने निर्माण झालेली भावनाच आपण प्रेम समजतो. पण वास्तविक पाहता ते फक्त आकर्षण असते. एका विशिष्ट काळापुरतेच. त्यामुळे अशा आकर्षणातून निर्माण झालेली किंवा आपण समजणारी प्रेम ही भावना ही काही काळापुरतीच मर्यादित रहाते. कालांतराने ती संपून जाते. प्रेम संपत नाही तर आकर्षण संपते. आकर्षण संपले की ओढ अन ओढ संपली की आपोआपच नात्यांच्या र्‍हसाला सुरुवात झालेली असते. ब्रेकअप नावाचं फॅड याच आकर्षणातून जन्माला आलेले आहे. ब्रेकअप म्हणजे प्रेमाचा शेवट हे आपण दिलेले चूकीचं संबोधन आहे. वास्तविक ब्रेकअप म्हणजे आकर्षणातून निर्माण झालेली ओढ संपून जाणे. प्रेम नव्हे. ज्या नात्यात कधी प्रेमच नव्हते त्याला प्रेम म्हणणेही चूक अन ब्रेकअप म्हणजे अपराध. 
                         आपण प्रेमात पडतो म्हणजे आपण कोणाकडे तरी आकर्षित होतो हे नक्की. पण ही आकर्षण भावनिक अन मानसिक असेल तर आणि तरच प्रेम नावाची भावना जन्म घेते. भावनिक आकर्षण वाढलं की आपण परस्परांच्या भावनांचा विचार करू लागतो अन त्यातून फुलते ते प्रेम. मानसिक आकर्षण वाढत गेले की मनात असणारी आपल्या कोणाची तरी पोकळी भरून निघली जाते अन मनाची सांध प्रेम नावाची भावना मिटून टाकते. इथे ना प्रेमाचा कधी शेवट होतो. ना र्‍हास. आपण एखाद्याच्या प्रेमात तेव्हाच पडतो जेव्हा आपल्या मनातील असणारा आपलाच मी समोरच्या व्यक्तीच्या मी शी जुळून येत असतो. जुळून येती रेशीमगाठी उगाच म्हणत नाही. तर त्याचा अर्थ हा असा लागतो.




गणेशदादा शितोळे
(३० मार्च २०१६)


शुक्रवार, २५ मार्च, २०१६

नुकताच क्लास जॉईन केला आहे. पाचव्या मजल्यावर असल्याने रोजच जाण्यायेण्यासाठी सर्रासपणे लिफ्टचा वापर करतो. याच लिफ्टमधल्या प्रवासात सुचलेली कविता. 

लिफ्टमधला शब्दांचा प्रवास

लिफ्टमध्ये टाकताच सकाळचं पहिलं पाऊल,
माझ्या शब्दांना उगाचच उसणं अवसान येतं....
ध्यानीमनी नसतानाही मग अलगद,
दोन चार शब्दसरींना बरासावसं वाटतं...

जसा जसा लिफ्टमधला प्रवास सुरू होत जातो,
तसं तसं मनातल्या भावनांना दाटून आल्यासारखं होतं...
बदलत्या मजल दरमजलेसोबत मग,
त्यांचंही बदलत येणं जाणं सुरू होतं...

लिफ्टच्या काचेतून दिसणारं तेचतेच जुनंच बघत,
सकाळच्या एकांतात मनाला काहीतरी नवीन भासतं...
अगदी रोज ऐकून कंटाळवाणं वाटणारं संगीतही मग,
नकळत गुणगुणण्या पलिकडंचं सुमधूर वाटतं...

थांबली लिफ्ट अन घडीचा प्रवास संपला की,
शब्दासरींच येणंजाणं आठवणीतच रहातं...
अन पुन्हा एकदा लांबूनच ऑफिसचा बोर्ड पाहिला की,
मुक्या भावनांचं येणं जाणंही मनाच्या पडद्याआड दडून जातं....


गणेश दादा शितोळे
( २५ मार्च २०१६)


मंगळवार, २२ मार्च, २०१६

छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी 


                       नुकतीच फाल्गुनी आमवस्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी होऊन गेली. अनेकांना ती लक्षात होती का नाही ते माहीत नाही. पण त्या सर्वांच्या मनात बिंबवलेला अन सोबत दुसर्‍या दिवशी गुढी पाडवा नावाचा एक सणही साजरा करण्यात आला. मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा साजरा करतात आणि म्हणून मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी फेसबुक व्व्हाटसअपच्या माध्यमातून पोस्ट्स पाठवल्या. काहींनी फाॅरमॅलिटीही पूर्ण केल्या. पण माझ्या कडून वैयक्तिक कोणालाही अशा शुभेच्छा मिळाल्या नाहीत. याच शुभेच्छा देणारांमधील काहींना माझ्याकडून दरवर्षी प्रमाणे या मुद्द्यावर अपेक्षीत विरोधी पोस्ट आल्या नाहीत म्हणून भुवय्या वरही केल्या. त्यांच्या भूवया कदाचित उंचावल्या असतील की माझ्या भूमिका अन मते बदलली अशीही शंका कित्येकांच्या मनात येऊन गेली. काहींनी फोन करून तसं विचारलंही.
                        ज्या दिवशी संभाजी महाराजांचा मृत्यू आणि त्यामागची भूमिका, राजकारण आणि विविध विचारप्रवाहांचा अभ्यासू प्रभाव मनावर कोरला गेला त्या दिवसापासून आजवर कधीही गुढीपाडवा नामक सण माझ्या कडून साजरा करण्यात आला नाही. ना कोणाला शुभेच्छा देण्यात आल्या. नावाप्रमानेच आमच्याकरता फाल्गुनी आमवस्या अन चैत्राची सुरवात ही कडुलिंबा चाखल्यासारखी आजही कडवटच चव देणारी ठरली आहे. संभाजी महाराज आणि त्यांचा पराक्रमी इतिहास मनाच्या गाभाऱ्यात इतका खोलवर रूजला गेला आहे की त्यांच्या पुण्यतिथीचा आनंद बळजबरीनेही कधी साजरा होऊ शकत नाही. गुढीपाडवा आणि त्याची पार्श्वभूमी यावर चर्चा करण्यास आणि विचार मांडून फक्त वाद निर्माण झाले आहेत. माझ्या मनात एकमात्र भूमिका आहे की ज्या संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बळावर शिवरायांचे स्वराज्य वाढीस लागले आणि त्याच पराक्रमी शौर्यामुळे आज आपण आहोत आणि या आपल्याला लाडक्या युवराजाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे चैत्राची सुरवात. भले असेल ती मराठी नववर्षाची सुरवात अन अजून काही. पण त्याच्या आनंदावर औरंग्याने विरजण टाकले आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा  मृत्यू झाला. त्याचा शोक आणि दुःख केव्हाही मनाला त्रासदायक देणारे आहे. त्यामुळे दरवर्षी उपदेशाचे दोन शब्द सांगून वादविवाद करून आपली मतं दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करायचा नव्हता. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी मानून ती साजरी करत आपल्या परीने जे काही चांगले सामाजिक काम करता येईल याचा विचार करत यंदाही संभाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आपली मतं आणि आपले विचार मांडणे योग्य आहेत. पण त्यावर वादविवाद घालून ते एकप्रकारे लादणे केव्हाही चूक. अन या चूकातून सुधारण्याचा माणस यावर्षी पासून केला आहे. आमच्या घराच्यांनाही माझे विचार पटत नाहीत. त्यांना अनेकदा वास्तविकतेची जाण करून दिली. पण विचार लादण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यांना जे साजरे करायचे त्यांनी ते करावे. मी आपली वैचारिक बैठक मजबूत ठेवून त्याच भूमिकावर ठाम आहे. आमचे राजे कधीही कोणत्याही एका जाती धर्मापुरते निगडीत नव्हते. ना त्यांनी कधी एका धर्मापुरता विचार केला नाही. 
                   त्यामुळे त्यांचाच आदर्श समोर असताना कोणत्या एका धर्मापुरतं बांधून घेणे वैयक्तिक मला कधीच जमलं नाही. दाखल्यावर धर्म टाकणे माझ्या हातात नव्हतं. पण म्हणून त्या धर्माच्या बंधनात जोखडात अडकून रहाणेही मला कधी जमले नाही आणि जमणार नाही. माणसाला माणसाप्रमाणे वागवणे तोच खरा धर्म आणि त्याच माणूसकी नावाच्या धर्माचा पाईक होत शिवछत्रपतींच्या विचारांचा आणि संभाजी महाराजांचे आचरणाचा आदर्श ठेवून जगण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांना आमचे विचार पटतील अन ज्यांचे विचार आम्हाला पटतील अशा दोघासंह हा प्रवास सुरू झाला आहे. अजून ध्येय आणि वाटचाल दूरवर आहे. बाकी कोणाला काय वाटते याची फिकीर कधी वाटली नाही अन वाटणार नाही. आणि शेवटी एकच डोळ्यासमोर ठेवून जगायचे...

"मनाने कधी बंधने घालून घेतली नाहीत तर आपण ती का घालून घ्यावीत. भटकून द्यावे स्वैर त्यालाही. "


गणेशदादा शितोळे
२२ मार्च २०१६


रविवार, ६ मार्च, २०१६

मला आवडलेला चित्रपट मुंबई पुणे मुंबई - भाग २


                      नुकताच एक चित्रपट पाहिला. खरंतर खूप अगोदर बघायचा होता पण वेळ मिळाला नाही. आजवर नातेसंबंधावर भाष्य करणारा मी पाहिलेल्या चित्रपटांपैकी मला आवडलेला सर्वोत्तम चित्रपट वाटला. नात्यांचा प्रवास ओळख,  मैत्री, प्रेम अन शेवटी लग्न हा असा असावा प्रत्येकाला वाटतं अन तो तसाच असावा. पण प्रेम ते लग्न या फेजमधून जाताना अनेकांचा गोंधळ उडतो. काहींचा लग्नापूर्वी तर काहींचा लग्नानंतर. पण या दोन्ही वेगवेगळ्या काळात एक साम्य हेच की दोन्ही वेळेस एक प्रश्न कायम मनात येतो. किंवा आपल्याला विचारला जातो. बहुतेक वेळा मलींकडूनच मुलांना हा  टोमणा मारला जातो. "तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस खूप बदललास. "

                    खरंतर माणसाचा स्वभाव कधी बदलत नाही. तो तसाच असतो. फरक इतकाच की परिस्थिती नुरूप त्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडू लागले की ते आपल्याला माहीत नसल्याने रूचत नाहीत. कितीही वर्षे सहवास लाभला तरी कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराला संपूर्णपणे ओळखू शकत नाही. अन ते शक्य पण नाही.  आपण कितीही म्हणत असलो मी तूला चांगले ओळखतो तरी आपण त्या व्यक्तीचे काहीच पदर माहिती करून घेत असतो. त्यामुळेच मग हे असे बदलला असल्याचे प्रश्न पडतात. वास्तविक आपण एकमेकांना समजून घ्यायला तितका वेळ देतही नाही अन घेतही नाही. आपल्याला इथे मात्र फार घाई असते. कधी एकदा रिलेशनशिप स्टेटस बदलतेय याची भलतीच ओढ असते.  याला मीच काय कोणीही चूकत नाही. या चित्रपटात पहिल्या भागात हेच दाखवलेले आहे.

                          नाते कोणतेही असो, त्यात कमिटमेंटला खुप महत्व असते. आपण एखाद्या व्यक्तीला कमिट करतो म्हणजे आपण ते पाळायलाही हवे. तरच त्या कमिटमेंटला अर्थ असतो. नाहीतर एखादी गोष्ट ठरवायची अन आपणच त्याला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला तर नात्यातील विश्वासाहर्ता कमी होते. अनेकदा कमिटमेंट करताना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे माहीत नसल्याने त्याचा विचार पण मनात येत नाही. त्यामुळेच एखाद्या महत्वाच्या कामाने आपल्या कडून कमिटमेंट पाळले जात नाही. त्यावेळी आपण निश्चित करायचं असतं कशाला किती महत्व द्यायचे अन प्रायरोटीज द्यायच्या. कदाचित काहीदा याचा अंदाज येत नाही अन खटकले जाते. अनेक नाती तुटतात ती याच कारणासाठी. आपण प्रायरोटीज जपतानाही समोरच्या व्यक्तीला थोडा वेळ निश्चित द्यायला हवा. एखाद्या वेळी तो देता आला नाही तर ते ठीक आहे. कारण तेव्हा ते टॉलरेट होतं. पण प्रत्येक वेळी होईलच असं नाही. त्यामुळे कमिटमेंट देताना त्या पाळण्यासही प्राधान्य द्यायला हवे. चित्रपटाचा पूर्वाध खरंतर हेच वारंवार सांगत असतो.

                        नाती जपण्यासाठी कमिटमेंट पाळण्याइतकाच समजूदारपणाही हवा. नात्यांच्या रेशीमगाठीत बांधलेल्या व्यक्तींमधे समजूदारपणा असेल तर या रेशीमगाठी अजून चांगल्या पद्धतीने गुंफल्या जातात. झी मराठीची जुळून येती रेशीमगाठी सिरियलचा एकंदरीत परिपाक हाच होता. आदित्य मेघना घराघरात पोहोचले त्यामागच खरं रहस्य हेच होते की सिरियलच्या माध्यमातून त्यांनी नात्यातील उत्तम ट्युनिंग दाखवलं. त्यामुळेच नात्यात कमिटमेंट पाळण्याइतकाच समजूदारपणाही हवा. समोरच्या व्यक्तीलाही मन नावाचा प्रकार असतो अन त्यालाही त्याची मतं, प्रायरोटीज, अडचणी असू शकतात फक्त एवढं समजून विचार केला अन वागलं की सगळं सहज सुंदर होऊन जातं हेच चित्रपटाच्या दुसर्‍या भागात दाखवलेलं आहे. शेवटी चित्रपटाचा अपेक्षित शेवट हा गोड असतो आणि होतो. पण या चित्रपटातून नात्यांच्या अंतर्मनातल्या काही गोष्टी उलगडल्या समजल्या याचा जास्त आनंद होतो. नात्यांची नवीन परिभाषा समजून घ्यायला मदत झाली एवढं मात्र नक्की.

गणेशदादा शितोळे
(६ मार्च २०१६)


शनिवार, ५ मार्च, २०१६

प्रो कबड्डी पर्व ३ रे

                        महाराष्ट्राच्या हा रांगड्या खेळाने जगात एक वेगळा ठसा निर्माण करण्याबरोबरच क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांच्या ह्रदयात क्रिकेट सोबतच तोडीची जागा निश्चित केली. नुकताच प्रो कबड्डीचा तिसरा सिझन यशस्वीपणे पार पडला. भारताच्या पूर्व भागातील "पटना पायरईट्स" संघाने विजेतेपद मिळविले याचा आनंद आहे. खरंतर महाराष्ट्राच्या पुणे आणि मुंबई या दोन्ही संघांनी सेमी फायनल मधे धडक दिली तेव्हा मनात एकच इच्छा होती की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतच विजेतेपद राहिल. पण सेमीफायनलला पुण्याच्या संघाने जो एकतर्फी पराभव स्वीकारत पटना पुढे हात टेकले तेव्हाच मनात फायनलच्याबाबत धडकी भरली होती. पण शांत आणि आक्रमक पवित्रा घेऊन खेळ करत अनुप कुमार पुन्हा एकदा यु मुंबाला विजेतेपद मिळवून देईल याची खात्री वाटत होती.

                       पण पटना ने फायनलमधे आपला आक्रमक आणि नेत्रदीपक कामगिरीचा आलेख कायम ठेवत पुर्वाधात वर्चस्व गाजवले तरीही माझ्या सारख्याच यु मुंबाच्या प्रेक्षक वर्गाला पिछाडीवरूनही अनुप कुमार विजयरथावर नेईल आशा होती. उत्तरार्धात अनुपने शब्बीर बापूच्या साथीने अप्रतिम चढाया करत आणि त्याला मोहित चिल्लर व सुरिंदर नाडाने यशस्वी पकडी करत शेवटच्या काही मिनिटांच्या खेळात बरोबरी केली. शेवटच्या मिनिटाला एक क्षणी यु मुंबाचा विजय निश्चित वाटत होता. पण दिपक नरवालची यशस्वी चढाई यु मुंबाच्या तोंडातला घास खेचून पटना पायरेईट्सला विजेतेपद मिळवून देणारी ठरली. 

                       दोन क्षण यु मुंबा पराभूत झाल्याने वाईट वाटलं पण दुसर्‍याच वेळी अप्रतिम खेळाचा आनंद झाला. शेवटी हा खेळ होता अन कोणी एक हरल्याशिवाय दुसरा जिंकत नसतो. मैदानावर खेळलेला संघच शेवटी विजय मिळवत असतो. आणि पटनाने सर्वोत्तम कामगिरी करत विजेतेपद मिळविले. अनुमकुमारनेही खिलाडीवृत्तीचं दर्शन देत पराभवही आनंदात स्विकारला. पटनाच्या खेळाडूंनीही विजयाचा उन्माद न करता सामन्यातील बाचाबाची चढाओढ तिथेच सोडून दिली. मनप्रित सिंगने रिशांकला दिलेली शाबासकी याचंच प्रतिक होतं. प्रो कबड्डीचा पहिला सिझनची फायनल आठवली की त्यावेळीस झालेला यु मुंबाचा पराभव लक्षात रहाण्यापेक्षा जयपूरच्या संघाचा विजयी उन्माद, यु मुंबाच्या खेळाडूंवर केलेली टिप्पणी लक्षात रहाते. ती आणि या सिझनची फायनल परस्पर विरोधी वाटते. त्याच जयपूर च्या संघाची या सिझनची कामगिरी हेच सांगत आहे. विजयानंतर जयपूरचे तारे जमिनीवर यायला दोन सिझन लागले. या उलट मुंबईच्या संघाने विजय पराजया दोन्ही मधे आपले पाय जमिनीवर ठेवले. त्याचाच परिपाक म्हणून सलग तीन फायनल खेळता आल्या. 

                           यंदाचा सिझन जरी संपला असला तरी रोज संध्याकाळी आठ वाजता कबड्डी अन यु मुंबाची आठवण होणार हे नक्की. मी क्रिकेट, कुस्ती अन कबड्डीचा खेळ मी फक्त प्रेक्षक म्हणून कधीच पाहिला नाही. तो माझ्या रक्तातच भिनलेला असल्याने त्यात इतकं अडकून जातो की एकदा पराभव सुतकासारखाच वाटतो. पण यंदाच्या सिझनमधला यु मुंबाचा पराभव विजयाइतकाच आनंद देऊन गेला.

आता प्रतिक्षा 25 जूनची.

प्रो कबड्डीच्या नव्या सिझनची. 

सोबत जुन्याच अंदाजात नव्याने यु मुंबाचा खेळ पहाण्याची.

त्यावेळेस आनंदाची दोन वेगळी निमित्तंही असतील. 

भारत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक पुन्हा एकदा जिंकलेला असेल.

अन हिटमॅन रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ आयपीएलचं सलग तिसरं विजेतेपद मिळवेल.


TeamIndia
MumbaiIndians
UMumba

गणेशदादा शितोळे
(५ मार्च २०१६)