माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २ मार्च, २०१८


रंग...!!!


जगण्याला रंग नसतो की
मरणाला...
पण तरीही,
पण तरीही आपण
कायमच अडकत असतो
या ना त्या रंगातंच...
इकडे आड अन
तिकडे विहीर झाल्या सारखं...

कधी जातीचा रंग डोक्यात शिरतो...
कधी धर्माचा रंग जीव घेतो...
पिवळा, हिरवा, भगवा, निळा
रंगाचाही बाजार उठतो...
नशीब त्या निसर्गाचं...
त्यानं अजून रंग बदलला नाही
सर्वांना सामावून घेण्याचा...

कधी वर्णाचा अहम चढतो...
गोरे नसण्याचा कमी पणा वाटतो...
चामड्याचा रंग बदलण्याचाही
बाजार मांडलाय...
नशीब त्या कातड्याचं
त्यानं अजून गुण सोडला नाही
मातीत मिसळून जाण्याचा..


अमुक तमुक रंग रंग करत
आयुष्यालाही ज्वर चढतो...
मरणाच्या उंबरठ्यावर टेकल्यावर
जगण्यात जीव जडतो.
नशीब त्या रक्ताचं...
अजून त्यानं तरी अजून
रंग बदलला नाही माणूसकीचा...

गणेशदादा शितोळे
२ मार्च २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा