मनाला समजुन घेणारं कोणी भेटतंय का..?
आज आयुष्य एका नव्या वळणावर येऊन उभं आहे. खरंतर मन कधीच एकाजागी थांबत नाही पण एका क्षणी असं जाणवतंय की गेले कित्येक दिवस मन एकाच विषयावर येऊन थांबते आहे.आपलं उद्याचं भविष्य काय..?
काॅलेज संपून आता वर्ष उलटत आलं. रोज सोबत राहणारा मित्र परिवार आपापल्या वाटेने जायला निघून गेले. मलाही एका नवीन वाटेने प्रवास करायला सोडून. हो प्रत्येक जण करिअर करण्याच्या दृष्टीने पावले टाकत निघून गेलं. मलाही या करिअर नावाच्या वाटेवरून चालायला सांगत.
काही दिवस नोकरी कामधंदा बघण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. बहुतेक ती वाटच माझी नसावी. पण मनाशी पक्कं ठरवलेलं होतं की गेलं तर याच वाटेने गाठायचं ते शिखर. प्रयत्न नाही सोडायचा. अन हाच प्रयत्न करत असताना मी स्वतःच स्वतःच्या एका भावविश्वात गुंतून गेलो.
जून्या छंदाची नव्याने ओळख झाली. जुन्या आवडी पुन्हा मनाला चिकटल्या. मनाच्या कोपऱ्यात असंख्य साठवेलं शब्दात उतरवण्याचं वेडच जडलं. कविता, लेख सुचलं की लिहिलं जावू लागलं. फेसबुक या नव्या माध्यमातून मित्र परिवार यामध्ये शेअरींग वाढलं. कोणीची ती एक लाईक प्रचंड आनंद देऊन गेली.
कधीतरी लिहिले जाणारे हे आता रोजचंच झाले आहे. रोज नवा विषय नवीन लिखाण नित्याची बाब झाली आहे. छंदाची आवड अन आवडीच वेड कधी झालं कळलंच नाही. एकही दिवस त्याशिवाय जात नाही. मित्रांच्या फर्माईशवरून लिहणंही वाढलं. रोज नवनवीन सुचतंय, अनेक विषयांवर लिखाण करावसं वाटतं. आजवरचा प्रत्येक अनुभव शब्दात लिहावसा वाटतो.
आवड, छंद आज या वळणावर पोहचली आहे की रोज मनातल्या भावना व्यक्त करत करिअर च्या वाटेने जावं की नाही हे समजेना. कधी एक मन लिहायचं थांबवून करिअरच्या दृष्टीने केंद्रीत करावं करिअर नंतर आयुष्य पडलंय लिहायला असं सांगतं तर एक मन हे लिखाण असंच सुरू ठेवावं सांगतंय. या द्विधा मनस्थितीत रोजच मन ठप्प होतंय. उद्याची स्वप्न अनेक पडतात पण नेमकी कोणती आपली हेच उमजेना.
आज भोवताली अनेक माणसं आहेत आपली वाटणारी. मनाजवळची. पण तितकीही जवळची नाहीत जितकी मन मोकळं करावं त्यांच्या जवळ. बहुतेक ती जवळ भासत असावीत नुसती. त्यांनी मन समजून घ्यायला अजून वेळ आहे बहुतेक.
हे लिहिताना देखील मन तसंच थांबलं आहे. बघू मनाला समजून घेणारं कोणी भेटतंय का..?
की मनच देतंय त्याचं उत्तर..
आता फक्त प्रतिक्षा...
गणेशदादा शितोळे
(१५ जूलै २०१६)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा