माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १६ जून, २०१५

खरंच कधी कधी या मनाचं काही कळत नसतं...

खरंच कधी कधी
या मनाचं काही कळत नसतं...
आपण काय करतोय,
त्याचं त्यालाच कळत नसतं...

ओढ असते की अजून काही पण,
नकळत कुणीकडे धाव घेत असतं..
दुसर्‍याच्या विश्वात रमण्यासाठी,
सारखा सारखा हट्ट धरत असतं...

ते विश्व आपलं नाही अन नसणार,
खरंतर मनालाही ते ठावं असतं...
पण न राहूनही का कळेना,
मन तिकडेच धाव घेत असतं...

काय म्हणावे या मनाला,
स्वतःलाच काही सुचत नसतं,
काय सांगावे त्याला समजावत
आपल्यालाही समजत नसतं...

खरंच कधी कधी
या मनाचं काही कळत नसतं...
खरंच कधी कधी
या मनाचं काही कळत नसतं......


गणेश दादा शितोळे
(१६ जून २०१५)


रविवार, ७ जून, २०१५


आज इंजिनियरींगच्या प्रवासाची अखेर झाली...



आज इंजिनियरींगच्या प्रवासाची अखेर झाली...
या प्रवासात अनेक जणांशी भेट झाली...

काही व्यक्ती रूपी वल्ली ही भासली...
काही जवळ असूनही परकेपणाच देऊन गेली...
काही आपली हक्काची माणसं वाटली..
काही मनात कायमचं घर करून गेली...

अनेक नवीन नाती जोडून गेली...
कोणी भाऊ कोणा दादा म्हणत गेली...
हक्काचा मित्र वाटणारी मैत्री झाली...
कोणाच्या पाठी खंबीर साथंही दिली....

या प्रवासात पैशाची श्रीमंती ना कधी दिसली..
पण हक्काच्या माणसाची श्रीमंती खूप कमावली...
काही ओळख ओंजळीत मावली..
तर काही ओंजळीच्या बाहेर विस्मरूनही गेली...

काही आजही आठवणीत जागा करून गेली..
नकळत आसवांची किमंत सांगून गेली...
प्रवास अर्ध्याहून सोडून गेली...
परी माग मनावर ठेवून गेली...

पुस्तकातले किती शिकले माहित नाही....
पण आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला नक्की शिकता आले...
या प्रवासाने नक्की काय दिले याचा हिशोब लावला तर
आयुष्याची दोन वर्षे वाया घातली
या उण्यापेक्षा भागाकार अधिक महत्वाचा वाटतो...

कदाचित या शिक्षणाने पैसा कमवता येईल...
पण पैसा कमवताना माणसं कमवायचं राहून गेले
असे नको व्हायला म्हणूनच ही संधी दिली
आयुष्यात माणसं कमवण्याची सुरवात केली की,
पैसा केव्हा ही उभा रहातोच...

या प्रवासाने आयुष्य भराची साथ करणारी शब्दांची मैत्री दिली...
या प्रवासाने एका कोवळ्या मनाला कवी लेखक केले...
आज या प्रवासाची अखेर असेल कदाचित
पण आयुष्याचा प्रवास असाच सुरू रहाणार आहे...
या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्ती वल्लीचे आभार...



गणेश दादा शितोळे
(०७ जून २०१५)