माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, ११ जून, २०१९

डॉक्टर गिरीश कर्नाड



ऑफिसमधे काम करत असताना दुपारी नोटीपिकेशन मधे आलेली बातमी वाचली अन एकदम धस्स झालं. डॉ. गिरीश कर्नाड गेले. खरंतर आमचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नव्हता. ना कधी त्यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली ना कधी कुठे संबंध आला. पण तरीही डॉक्टरांचं जाणं हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. कर्नाड माझ्या म्हणजे साहित्यक्षेत्रातील असल्याने त्य़ांच्या आठवणी माझ्या मनात कायम जिवंत राहतील.

भारतीय राजकारणसमाज व्यवस्थाजातीव्यवस्थाधर्म व्यवस्था यांच्यावर डॉक्टर साहेब कायम बोलायचे. आयुष्यात त्यांनी सतत उदारमतवादसमानता या तत्त्वांचा नेहमीच पुरस्कार केला. या तत्त्वांसाठी लढण्यासाठी ते रस्त्यावरदेखील उतरले. म्हणूनंच त्यांच्या प्रवासवाटेवरून चालताना डॉक्टर साहेब कायमंच प्रेरणेचे झरे ठरले. लेखक जे लिहितो ते प्रत्यक्ष कृतीत आणतो असं फार कमी घडतं पण डॉक्टर साहेब जे करायचे तेच लिहायचे बोलायचे. परंतु मी तो कमनशीबी माणूस आहे की ज्याने त्यांच्याविषयी फार कमी वाचलंय. भारतीय सांस्कृतिक घडामोडीतील आणि भारतीय रंगभूमीकरता योगदान दिलेला एक अतिशय विद्वान माणूस म्हणजे डॉ. गिरीश कर्नाड. अशी जगाकरता ओळख असली तरी मला डॉक्टर कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मोठा पुरस्कर्ता वाटत राहिले. मध्यांतरी गळ्यात पाटी घालून चित्रपटगृहात लेखकांच्या गळचेपीचा निषेध केला ते हेच दाखवून गेला.

माणसाने कायम बोलत राहिले पाहिजे. कधी ते स्वत:शी असेल तर कधी इतरांशी असेल. पण माणसांनं बोलायला हवं. कोणतीही गोष्ट करायच्या आधी ती का करायची हे विचारता आलं पाहिजे. हा का विचारायला मी शिकलो यात डॉक्टर साहेबांचं योगदान महत्वाचं आहे. आयुष्याचं जगण्याचं प्रयोजनकाय ? हे लक्षात आलं तर माणसाचं जीवण सत्कारणी लागते. अन्यथा त्याचं त्यालाच कळत नाही का जगतोय ते.

डॉक्टरांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी आली. पण ते कधी डगमगले नाहीत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशी अनेक विद्वान माणसं या देशात केवळ विचार पटत नाहीत म्हणून मारली गेली. त्यातून सटून डॉक्टर गेले तरी त्यांच्या मागची साथ या विद्वेषी लोकांनी सोडली नाही. सोशल मिडीयावर अशा विद्वेषी लोकांनी जे काही अकलेचे तारे तोडले ते पाहून वाईट वाटले.  माणूस हे जग सोडून गेला तरी त्याच्या विषयीचा द्वेष कायम रहातो तिथे बुद्दीची कीव वाटली. असो. गांधीना नथुरामला मारलं. संपला नथुरामंच. गांधी कायम जगाच्या मनामनात चिरतरूण राहिले. तसेच डॉक्टर पण चिरतरूण रहाणार. बाकी विद्वेषी पिलावळी जन्मला येणार आणि मरणार. त्यांना विचारतंय कोण..


गणेश सुवर्णा तुकाराम
११ जून २०१९





रविवार, २ जून, २०१९

आयुष्याची वाट चालत रहायची...!!!


नव्या या आयुष्याच्या वळणावर,
जुनीच ती पाऊलवाट आहे चालायाची,
अनोळखीच्या पाऊलखुणा शोधत
साथीने तुझ्या ही वाट अशीच चालायाची...

नव्या शब्दांची नव्या भावनांची
ओळख हुळवार तुला मला व्हायाची...
खाचखळग्यातूनही हळूवार
पानापानातून आपली वाट काढायाची...

खळखळत्या नदी नाल्यासोबती
वाट मुक्यानेच सारे समजायाची...
तुझे माझे सारू विसरून
आपली होत एकेक पाऊले टाकायाची...

मी झालो निशब्द तरी
भाषा तू माझीही व्हायाची...
प्रेम, विश्वासाचा कटाक्ष टाकत
अलगद काटा बाजूला करत वाट आपण ही चालायाची...

एखाद्या वळणाला कधी चुकामुक झाली
कधी तू कधी मी एकमेकांसाठी वाट थांबायाची...
वहात्या वाऱ्याने आण दिली कवितेला की तू
मला कविता म्हणून वाटेवरती भेटायची

दिवस सरले, कागदाची पानं बदललं तरी
आयुष्याची वाट आपण चालत राहायची...
हाती हात देऊन महिना झाले तरी,
आपण अशी वर्षे सोबतीने जगायाची....

गणेश सुवर्णा तुकाराम
(२ जून २०१९)






शनिवार, १ जून, २०१९

तो...?


तो...?

तो...?
तसं म्हटलं तर कुणीच नाही

अन समजून घेतले तर सर्वकाही...


तो...?
प्रत्येक भूमिकेत सापडेल,
कधी थोडासा कधी भरभरून...



तो...?
आयुष्याचा कोणताही निर्णय घ्यायचा असताना

कोड्यात टाकणारा...
"आज तो इथं सोबत असता तर...?"



तो...?
कवितेच्या पानात सापडतो...
पुस्तकाच्या सुंगधात लहरतो...



तो...?
तो शब्दात असतो,
तो मनात ठासतो,
तो डोळे मिटले की समोरंच भासतो...



तो...?
खरंतर आज सातासमुद्रापार असला तरीही

 कधी दूर आहे जाणवत नाही...


तो...?
सहकारी म्हणून भेटला...
मित्र म्हणून सोबत हवहवासा वाटला...
अन मितवा म्हणून चिरतरूण ठरला...



तो...?
मैत्रीच्या श्वासात
खोलवर निरंतर तसाच आहे...
ह्रदय बनून.......



गणेश सुवर्णा तुकाराम
(१ जून २०१९)





रविवार, २३ डिसेंबर, २०१८

का...?




आयुष्याच्या प्रत्येक वळणावर रस्ता
तो एकच प्रश्न विचारात होता...
का...?
तू या मार्गावर का चालतोय....?


प्रत्येकवेळी जुन्या पाऊलखुणा मिटवल्यासारखा
एकटाच पावलं टाकत रहातोय....
का...?
तू नव्या पावलांनी वाट का निर्माण करतोय....?


पुढे जाण्यास खुणावतंय का काही
की असाच वेंधळ्यासारखा निघालाय रागात
का...?
तू या शेवट माहीत नसलेल्या वाटेनं का निघतोय....?


प्रत्येक रात्रीनंतरच्या प्रसन्न सकाळचा
सूर्य तर उगवणारंच आहे ना...
का...?
तू या अंधाऱ्या वाटेने का भटकतोय....?


आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुःखानंतर
आशेचे किरण दिसतोच ना
का...?
तू या निराशेच्या वाटेने का शोध घेतोय....?


भविष्याच्या सुखाची चाहूल
स्वागत:ला दारी उभी असताना
का...?
तू या अनाठायी दुख:च्या वाटेला का जवळ करतोय....?


तुझ्या आपल्या माणसांचं प्रत्येक अस्तित्व
नात्यांचा आनंद देत असताना
का...?
तू एका दमात आर पार तोडून का मुक्त होतोय..?


आयुष्याचा मध्य शोधता शोधता
खेळ खेळायचा असतो जगण्याचा
का...?
तू एका क्षणात वेगळाच डाव मांडतोय..?



गणेश सुवर्णा तुकाराम

२३ डिसेंबर २०१८


रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

परतीच्या वाटा



ती समुद्रकिनार्‍यालगतची माती सुटत रहाते हातातून अलगद
मनाच्या अथांगतेचा ठाव घेत....
ती तळ्याकाठची खडकंही एकटीच बसतात
हळवार पाण्यात डोकावत...

ती बागेतली रिकामी बाकं विचारत रहातात प्रश्न,
मिटलेल्या पापण्यांनी सगळं साठवत
ते गजबजलेले रस्ते संपत नाहीत
हरवतात गर्दीत कुणाच्या तरी शोधात...

अन ती वेडीवाकडी वळणंही थबकून वाट पहातात
क्षणभर विश्रांतीच्या थाटात
आणि मी शोधत रहातो त्या परतीच्या वाटा
माझ्याच हरवलेल्या आयुष्यात....


गणेश सुवर्णा तुकाराम
१८ नोव्हेंबर २०१८